अकोला ः राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अभ्यासक्रम कमी करताना प्रकरणांऐवजी आशय, तक्ते कमी केल्याने संपूर्ण पाठच शिकवावा लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरील कुठल्याही प्रकारचा ताण कमी होताना दिसत नसल्याने अभ्यासक्रम कपातीने शिक्षकही गोंधळात पडेल आहेत.
कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपर्यंत शाळा बंद होत्या. दिवाळीनंतर नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अल्प आहे. त्यामुळे ऑनलाइन अभ्यासक्रमावरच अधिक भर दिला जात आहे. या सर्व बाबींचा विचार करून राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने नुकत्याच जाहीर केलेल्या पत्रानुसार पुस्ताकातील पान क्रमांकानुसार विविध प्रकरणातील काहीभाग, आशय, तक्ते कमी केले आहेत.
हे करीत असताना पुस्ताकातील सर्वच धडे विद्यार्थ्यांना अभ्यासावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी असा झाला, हा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. दिलेल्या विषयातील अभ्यासक्रमाच्या एकूण प्रकरणांपैकी २५ टक्के प्रकरणे कमी करून अभ्यासक्रमतील कपात अपेक्षित होती. मात्र, पान क्रमांकाच्या आधारे कमी झालेला अभ्यासक्रमामुळे आता शिक्षकांना सर्वच धडे शिकवावे लागणार असून, विद्यार्थ्यांनाही सर्वच धड्यांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यावरील प्रत्यक्षात ताण कमी न होता तो कायमच राहणार असल्याची मतं शिक्षकांनी व्यक्त केली आहेत.
ही केवळ तांत्रिक कपात
शैक्षणिक सत्र २०२०-२१ करिता अभ्यासक्रम निश्चित करताना एका पाठातील काही भाग वगळण्यात आल्याने शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांना शिकविताना संपूर्ण पाठ शिकवावा लागणार आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात झालेली कपात ही केवळ तांत्रिक कपात असल्याचे मत शिक्षकांचे आहे. प्रत्यक्षात अभ्यासक्रम कायमच असल्याचे शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.