Akola : पार्श्वनाथाचे मंदिर खुले व्हावे

चार दशकांपासून ग्रामदैवत बंदिस्त
ग्रामदैवत
ग्रामदैवत sakal

शिरपूर : जैन धर्मीयांची काशी शिरपूर जैन येथील ग्रामदैवत भगवान पार्श्वनाथाचे अधांतरी मूर्ती असलेले पुरातन मंदिर, बंदिस्त असलेले ग्रामदैवत खुले व्हावे, अशी जनभावना आहे. शिरपूर येथील भगवान पार्श्वनाथाला शिरपूरवासी ग्रामदैवत समजतात. येथील मंदिरात भगवान पार्श्वनाथाची मूर्ती प्राचीन व अधांतरी आहे. हे मंदिर १९८१ पासून दिगंबर व श्वेतांबर या दोन पंथांच्या अंतर्गत वादामुळे, तब्बल चार दशकांपासून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकले आहे. त्यामुळे मंदिर सीलबंद अवस्थेत पडलेले आहे. साहजिकच मंदिर सीलबंद असल्यामुळे मंदिर भग्नावस्थेकडे जात आहे व हजारो वर्षे प्राचीन असलेली वास्तू नामशेष होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही.

संबंध देशभरातून येणाऱ्या भाविकांची व पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे. आजही जे श्रद्धाळू याठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येतात, त्यांना छोट्याशा झरोक्यामधून मूर्तीचे दर्शन घ्यावे लागते. मंदिराची ही अवस्था बघून भाविक उद्विग्न होऊन जातात. चार दशकांपासून चालू असलेल्या न्यायालयीन वादामुळे भाविकांची हतबलता प्रकर्षाने दिसून येते.

चार महिन्यांपूर्वी जैन धर्मियांचे संतश्रेष्ठ आचार्य विद्यासागर महाराज यांचा चातुर्मास शिरपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी देशभरातून हजारो भाविक या ठिकाणी दाखल झाले होते. महाराजांच्या प्रेरणेने व वास्तव्याने दोन्ही पंथीयांचा समन्वय घडून येईल व भगवान पार्श्वनाथाचे द्वार भाविकभक्तांच्या दर्शनासाठी खुले होईल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र तसे झाले नाही. मंदिराचा न्यायालयीन वाद मिटून मंदिर खुले झाले, तरच या तीर्थक्षेत्राचा ब दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकास होणे शक्य आहे.

येथील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद इमदाद यांनी न्यायालयामध्ये जनहित याचिका आता पुन्हा नव्याने दाखल केली आहे. सदर याचिका सध्या न्यायप्रविष्ट आहे. विकासाची अंमलबजावणी, रखडलेला मास्टर प्लॅन व पार्श्वनाथाचे बंद असलेले मंदिर हे प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत या प्राचीन तीर्थक्षेत्राचा विकास होणे कठीणच असल्याचे मत सर्वत्र व्यक्त होत आहे. एकूणच पार्श्वनाथाच्या मंदिराची चाबी हीच येथील तीर्थक्षेत्राच्या विकासाची चाबी असल्याचे दिसून येते.

दोन्ही पंथाच्या सामंजस्याच्या भूमिकेतून चार दशकांपासून बंदिस्त असलेले भगवान पार्श्वनाथाचे मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी खुले व्हावे. हीच सर्व शिरपूरवासियांची अपेक्षा आहे. प्रसंगी बेमुदत उपोषण करण्याचा मी विचार करीत आहे.

- विनायकराव देशमुख, अध्यक्ष, अखिल भारतीय नेहरू ब्रिगेड दिल्ली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com