Akola : केशवनगरचा कारखाना सुरू होणार!

‘सकाळ’ने अनेक वेळा केला पाठपुरावा
Akola Risod Taluka Keshav Nagar sugar factory
Akola Risod Taluka Keshav Nagar sugar factory

रिसोड : रिसोड तालुक्यातील केशवनगरचा कारखाना सुरू होण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत, अशी चर्चा आहे. अनेक वेळा तांत्रिक टीम येऊन कारखाना बघून गेल्याची माहिती यावेळी केशवनगर येथील ग्रामस्थांनी दिली.

बालाजी सहकारी कारखान्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे. कारखान्याच्या परिसरात व रस्त्याच्या कडेला काटेरी झाडेझुडपे आहे. बगीच्यांची नासधुस झालेली आहे. धरणाच्या बाजूला असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरवस्था झालेली आहे. काही निवासस्थानाचे दरवाजे व खिडक्याही मोडलेले आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोडही झाली आहे.

दिवंगत बाबासाहेब धाबेकर यांच्या संकल्पनेतून १९८१ साली सहकारातून रिसोड तालुक्यातील मसला येथे बालाजी साखर कारखान्याची सुरुवात करण्यात आली. याच कारखान्याकडे ३६० एकर जमीन आहे.

१९८८ मध्ये पहिले गाळप सुरू झाले. कारखान्याचे गाळप सुरू असतांना रिसोड तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजारो एकरवर उसाची लागवड केली. जवळपास २००१ पर्यंत हा कारखाना सुरळीत सुरू होता.

हा कारखाना सुरू असता तर आज रिसोड तालुक्याचा नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचा कायापालट झाला असता. संपूर्ण तालुक्यातील शेतकरी सुख समाधानी होऊन या भागात मोठ्या प्रमाणात समृद्धी नांदली असती. २१०० रुपये शेअर असलेल्या या कारखान्याचे ५००० भागधारक आहेत. अंतर्गत राजकारणामुळे कारखान्याला २००२ मध्ये उतरती कळा लागून हा कारखाना बंद झाला. त्यामुळे ७५० कर्मचारी व त्यांचे कुटुंब व शेकडो ऊसतोड कामगार यांचा रोजगार हिरावला गेला.

संचालक मंडळाच्या अंतर्गत वादामुळे कारखाना बंद

त्यावेळी या कारखान्याचे तब्बल १७ संचालक होते. काही दिवसातच ऊस गाळपाच्या बाबतीत हा कारखाना महाराष्ट्रात नंबर वन वर पोहोचला. परंतु संचालक मंडळ व कर्मचारी यांच्यात गटबाजी झाली. दिवंगत बाबासाहेब धाबेकर व दिवंगत पुंडलिकराव गवळी यांचे वाद विकोपाला गेल्याची माहिती संपूर्ण महाराष्ट्राला आहे. दरम्यान तत्कालीन अध्यक्ष सहसंचालकाचे कारखान्याकडे दुर्लक्ष झाले आणि बघता बघता लाखोंचा उद्योग बुडाला.

त्यावेळी सिंचनाची सुविधा शेतकऱ्यांकडे उपलब्ध नव्हती तरी मोठ्या कष्टाने शेतकरी ऊसाची लागवड करीत असत. कारखान्याची गाळप क्षमता जास्त असल्याने दूरवरून ऊस आणावा लागत होता. त्यामुळे वाहतुकीचा खर्च उसाचा येणारा उतारा यामध्ये फरक पडत होता. त्यातच एकूणच कारखान्याच्या तांत्रिक अडचणीत वाढ होत गेली व कारखाना डबघाईस आला.

आज ह्या साखर कारखान्यावर महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँकेचे कर्ज आहे. आज हा कारखाना बँकेच्या ताब्यात असून साई ग्रुपच्या नियंत्रणात आहे. दिवंगत बाबासाहेब धाबेकर यांनी केशवनगर येथे शेवटच्या भेटीदरम्यान परिसरातील नागरिकांना भावनिक आव्हान केले होते की कारखाना सुरू होण्यासाठी परिसरातील नागरिकांनी पुढाकार घ्यावा.

कारखाना पुन्हा सुरू झाल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळेल. शेतकरी ही पारंपरिक पिकाला फाटा देत उसाची लागवड करतील व लाखो रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळेल. परिसरातील शेतकरी कर्जबाजारी होणार नाही. यामुळे आत्महत्येचेही प्रमाण कमी होईल.

अत्यंत कमी काळामध्ये हा कारखाना भरभराटीस आला. गाळपाच्या बाबतीतही महाराष्ट्रात नंबर एक वर गेला. तरी तेव्हा आजच्या एवढी सिंचनाची सुविधा नव्हती. दूरवरून ऊस आणावा लागत होता. मध्यंतरी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. पुन्हा कारखाना सुरू झाल्यास शेतकऱ्यांचा कायापालट होईल. तसेच बेरोजगारांना रोजगारही उपलब्ध होईल. कारखाना सुरू झाल्यास या निर्णयाचे स्वागत व संपूर्ण सहकार्य करू.

- बाबाराव पाटील खडसे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

केशवनगर येथील कारखाना सुरू होण्यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासन सकारात्मक असून अनेक वेळा यासाठी पाठपुरावा देखील केला आहे. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने निवेदन देखील देण्यात आले होते. त्या संदर्भात ठराव देखील पारित करण्यात आला होता. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनासुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने कारखाना सुरू होण्याकरिता निवेदन देण्यात येणार आहे.

- सौ जरिता शिवाजीराव दळवी, सरपंच ग्रामपंचायत केशवनगर

केशवनगर चा कारखाना सुरू झाल्यास केशवनगर परिसरासह तालुक्यातील नागरिकांना फायदा होईल व कारखाना सुरू झाल्यास या परिसराला गत वैभव प्राप्त होईल.

- डॉ. दत्तात्रय देशमुख, केशवनगर

केशवनगर येथील कारखाना सुरू झाल्यास बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल व परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात सोय होईल. पारंपरिक पिकाला फाटा देत ऊस पिकाची लागवड केल्यास जास्तीतजास्त उत्पन्न होईल व शेतकऱ्याला सोन्याचे दिवस येतील

- अश्विनी पुरुषोत्तम तहकीक, जिल्हा परिषद सदस्य गोवर्धन सर्कल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com