शिरपूर (जि.वाशीम) ः मालेगाव तालुक्यातील कोठा ग्रा.पं.मधील मनरेगाच्या कामामध्ये ४१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे सामाजिक अंकेक्षणातून उघड झाले होते. त्यानंतर दीड वर्षाचा काळ लोटला परंतु, अद्यापही जिल्हा प्रशासनाकडून कोणावरच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे वैभव अवचार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आता आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सामाजिक अंकेक्षणात अनेक ग्रा.पं.चे ‘पराक्रम’ उघड झाले आहेत. काही ग्रा.पं. सध्या जात्यात आहेत तर, काही ग्रा.पं. सुपात आहेत. सामाजिक अंकेक्षणाचे अहवाल पुढील कारवाईसाठी जिल्हा प्रशासनाकडे पोहोचून दीड वर्षाचा काळ लोटला आहे. कोठा येथील मनरेगाच्या कामात सुमारे ४१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे सामाजिक अंकेक्षण अहवालातून उघड झाले होते. त्यामुळे उपोषणकर्ते वैभव सुभाष अवचार व इतर तक्रारदारांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज, विनंत्या व निवेदने देऊन दोषींवर कारवाई करण्याची वारंवार मागणी केली होती. या प्रकरणी दीड वर्षात कारवाई झाली नाही. उलट दोषींना पडद्या आडून अभय दिले गेले. म्हणून, तक्रारदार वैभव अवचार व इतरांनी निवेदन देऊन दोषींवर कारवाई करा अन्यथा आमरण उपोषण करू, असा इशारा दिला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाला जाग आला नाही. त्यामुळे वैभव अवचार यांनी ९ एप्रिलपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. |
|||
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.