ऐन हंगामात महावितरणचा शेतकऱ्यांना शॉक;  कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित करायला सुरुवात

All types of power connections are now being cut off in Akot sub-division
All types of power connections are now being cut off in Akot sub-division

अकोट (अकोला) : थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती सभागृहाच्या परवानगीने उठवण्यात आल्यानंतर अकोट उपविभागात आता सर्व प्रकारातील वीज कनेक्शन तोडायला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे ऐन हंगामात शेतात काढणीसाठी उभे असलेले पीक जळण्याच्या अवस्थेत असल्याने शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.

कोरोना महामारीच्या संकटात संपूर्ण देशभरातील दळणवळण यंत्रणा ठप्प झाली होती. सरकारी-निमसरकारी उद्योगधंदे, व्यवसाय कोलमडून पडले. देशात अनेक ठिकाणच्या कंपन्यासह कित्येक शासकीय कार्यालयास देखील टाळे लागली गेली. अशा परिस्थितीत देशात एकमात्र उद्योग दिवस-रात्र सुरु होता तो म्हणजे शेती आणि याच उद्योगाने व या उद्योगात रात्रंदिवस राबत असलेल्या शेतकऱ्याने संपूर्ण देशाला तारले. मात्र, त्याच शेतकाऱ्याच्या पाठीशी उभे न राहता महाविकास आघाडी सरकारकडून महावितरणाच्या आडून शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती फास आवळल्या जात आहे.
 
पीक काढणीच्या ऐन हंगामात शेतातील कृषीपंपाची वीज तोडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याने अनेकांनी शासनाच्या या धोरणाविषयी तीव्र नाराजी दर्शवली आहे. 

आधी उत्पन्न घटले, आता सरकार हिरवणार 

यंदा राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला. त्यातच ४० टक्केपेक्षा कमी शेतमालाचे उत्पन्न हाती आले. आता रब्बी हंगामाचा हातातोंडाशी आलेला घास सरकार हिरावून घेत आहे. 

१०४० कृषीपंप, २५० घरगुती ग्राहकांचा पुरवठा खंडित
 
शेतकऱ्यांकडे असलेल्या कृषीपंपांची थकबाकी वसूलीसाठी ट्रान्सफार्मरचा वीजपुरवठा खंडीत करण्याचे आदेश महावितरण कंपनीने दिले असून, परिणामी अकोट तालुक्यात १२ मार्चला एकाच दिवशी ८४ रोहित्र (डी.पी) वरील १०४० कृषीपंप धारक शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तथा घरगुती २५० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याचे माहिती कार्यकारी अभियंता अनिल उईके यांनी दिली. 

कृषी वीजबिल सवलत योजनेला अल्प प्रतिसाद
 
थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कृषी वीज बिल सवलत योजना आणण्यात आली. ज्यामध्ये माहे सप्टेंबर २०२० च्या वीजबिलात ५० टक्के मूळ थकबाकी भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी माफ, थकीत बाकीवरील विलंब आकार १०० टक्के माफ, माहे सप्टेंबर २०१५ पूर्वी थकबाकी वरील व्याज १०० टक्के माफ, सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकीत व्याज १८ टक्के न आकारता दिलेल्या दराने १०० टक्के चालू बिल भरल्यास वीज बिलात १५ टक्के सलवत. मात्र आता खरीप हंगामात शेतीत उत्पन्नच निघाले नसल्याने आणि त्यात वीज तोडणी केली जात असून, शेतकऱ्यांची नाराजी आहे. शेतकऱ्यांनी तीन हॉर्सपावर पंप असताना, महावितरणने अव्वाच्या सवा बील आकारत गेल्या पाच वर्षापर्यंतची वीज बिल पाठवली. हा भूर्दंड शेतकऱ्यांना का, असा सवाल शेतकरी करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com