बार्शीटाकळी तालुक्यात कपाशीचा पेरा घटला

पेरण्या आटपून आंतर मशागतीला वेग; बोगस बियाण्यांचा शेतकऱ्यांना फटका
Cotton sowing Decreased in Barshitakali taluka Akola
Cotton sowing Decreased in Barshitakali taluka Akola

बार्शीटाकळी - तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात मृग नक्षत्र कोरडे गेल्याने उशिरा आगमन झालेल्या पावसाच्या भरोषावर शेतकऱ्यांनी उशिरा का होईना पण पेरणीला सुरुवात केली. जुलैत दमदार पावसाने पेरणी लायक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणी कामला सुरुवात केली. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून यंदा तालुक्यात शेतकऱ्यांनी सोयाबीनलाच जास्त पसंती दिल्याचे समजते.

तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर पेरणीच्या क्षेत्रात वाढ होत गेल्याने तालुक्यातील सातही महसुल मंडळातील खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिके वाढीच्या अवस्थेत, असून पिके बहरलेली पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे, मात्र काही भागांत बोगस बियाणे निघाल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली, असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

गतवर्षी सोयाबीनला प्रती क्विंटल दहा हजार रुपयांच्यावर बाजारभाव मिळाल्याने, गत वर्षीच्या तुलनेत तालुक्यात यंदाही शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला सर्वात जास्त पसंती दाखवली आहे. यंदा सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक, असून कपाशी लागवडीकडे अनेक शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. विविध किडींचा प्रादुर्भाव व गुलाबी बोंडआळीचा प्रकोप या प्रमुख कारणाने कापसाच्या उत्पादनात होणारी घट लक्षात घेता कापूस उत्पादक शेतकरी यंदा सोयाबीन पेरणीकडे वळला आहे.

काही पेरणी लवकर, तर काही पेरणीला उशिरा प्रारंभ झाल्याने मूग या पिकांसह ज्वारी आणि उडीद, तीळ या पिकांचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्यास सिंचनासाठी असलेल्या विहिरी, बोरवेलमधील पाणी पातळी कमालीची वाढेल व रब्बी हंगामात शेतकरी रब्बी पिके घेऊ शकतील, अशी अपेक्षा आहे. यावर्षी पावसाचे अंदाज चुकत गेल्याने शेतकऱ्यांमध्ये खरिपाची पेरणीबाबत संभ्रम निर्माण झाला होता परंतु अवकाळी पाऊस पडल्याने जमिनीत ओलावा तयार होऊन शेतकऱ्यांनी सार्वत्रिक पावसाची वाट न पाहता पेरणीचा सपाटा सुरू केला. एका महिन्यात पेरण्या आटोपल्या, असून आता मात्र संततधार पावसाने पिकाची डवरणी, कोळपणी व फवारणीचे कामासह इतर कामे विस्कळीत झाल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

तालुक्यातील कान्हेरी मंडळातील सराव गावातील शेतकऱ्यांने घरच्या सोयाबीन बियाण्याची १६ एकर शेतात पेरणी केली. सोयाबीन बियाण्याची अंकुरन क्षमता ७० टक्के होती, मात्र पेरणी झाल्यानंतर त्यावर दडाक्याचा पाऊस पडल्याने शेतातील काही बियाणे दडसल्या गेले, तर काही शेतातील मातीसह बियाणे वाहुन गेल्याने दुबार पेरणी करावी लागली.

सहा एकर जमिनीची तिबार पेरणी

अजूनही करायची आहे. सराव गावातील आणखी सात-आठ शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांवरून खरेदी केलेल्या कंपनीच्या बियाण्यांची पेरणी केली, मात्र त्यांनाही बियाणे न निघाल्यामुळे दुबार पेरणी करावी लागली.

- वसंतराव जाधव, शेतकरी, सराव.

तालुक्यात आजपर्यत पावसाची सरासरी १९०.१० मिमी. पावसाची नोंद झाली, असून सर्व महसुल मंडळात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरिपाची १०० टक्के पेरणी आटोपली आहे. आजरोजी पीक परिस्थीती समाधानकारक आहे. क्वचित ठिकाणी अति पावसामुळे सोयाबीन पिकाची उगवण कमी झाली आहे.

- विलास वाशीमकर, तालुका कृषी अधिकारी, बार्शिटाकळी.

तालुक्यात यंदाची खरिपाची स्थिती

पीक हेक्टर

सोयाबीन ४३,५४० हेक्टर

तूर ८,२४२ हेक्टर

कापूस ४,४३० हेक्टर

उडीद २५६ हेक्टर

मूग २८९ हेक्टर

ज्वारी १७ हेक्टर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com