अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षश्रेष्ठींच्या आदेशान्वये जिल्ह्यात ‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ ही मोहीम १५ जून २५ जूनपर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मोहिमेत पक्षाचे कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकांनी आपापल्या ठिकाणी असलेल्या समस्यांचा अभिप्राय हा ‘राष्ट्रवादी पक्ष अभियान’ या अधिकृत संकेतस्थळावर टाकावा, असे आवाहनही करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला महानगराध्यक्ष राजकुमार मुलचंदानी, अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय महासचिव जावेद जकारिया, राष्ट्रवादी युवक महानगराध्यक्ष करण दोड उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या आदेशान्वये १५ ते २५ जून या कालावधित पक्षातर्फे ‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. संतोष कोरपे , माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, माजी आमदार हरिदास भदे, नवनिर्वाचित आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार तुकाराम बिरकड, माजी आमदार बळीराम सिरस्कार, ज्येष्ठ नेत्या डॉ. आशाताई मिरगे, श्रीकांत पिसे पाटील, डॉ. विश्वनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनात राबविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरोनाच्या महामारीत राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता, सदर तुटवडा भरून काढण्याकरिता पक्षातर्फे संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे घेण्यात आली होती व सध्याही काही ठिकाणी ही शिबिरे घेणे सुरू आहेत. यासोबतच जागोजागी बूथ सुद्धा तयार करण्यात आले असून, पक्षबांधणीचे काम सुद्धा सुरू आहे असेही यावेळी संग्राम गावंडे म्हणाले. लॉकडाउन काळात पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गरजूंना राशन वाटप केले. त्याबाबत आपण पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो असेही यावेळी जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे म्हणाले.
भाजपकडून राजकारणच
राज्यात भाजपचे सरकार असते तर ही परिस्थिती नसती असे उद्गार केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत काढले होते. त्यावर जिल्हाध्यक्ष गावंडे यांनी अकोल्यात महानगरपालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे, जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असून, अकोट नगरपालिकांवर सुद्धा भाजपची सत्ता आहे. तरीसुद्धा याठिकाणी कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे राज्याची चिंता सोडून केंद्रीय मंत्री व जिल्हा भाजपने आधी जिल्ह्याची चिंता करावी व योग्य त्या उपायोजना राबवाव्या, या परिस्थितीत राजकारण करू नये असा सल्लाही यावेळी जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी जिल्हा भाजपला दिला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.