बोगस बियाणे तक्रारीचा पूर, कारवाईचा मात्र हरवला सूर

Biyane.jpeg
Biyane.jpeg

अकोला : नामांकीत कंपनीचं महागडं बियाणं घेतलं साहेब अन् चांगला पाऊस पडल्यावरच पेरलं पण, उगवलच नाही; एवढच काय तर, महाबीजच्या बियाण्यानं सुद्धा यंदा दगा दिला साहेब! राज्यभरातून अशा हजारो तक्रारींचा पूर वाहत आहे. परंतु, अजूनपर्यंत कृषी विभाग, जिल्हा प्रशासनाने बियाणे निर्मिते, विक्रेते किंवा मंजूरी देणाऱ्या यंत्रणेवर कोणतीच कारवाई केली नसल्याची आश्‍चर्यजनक बाब समोर येत आहे.

गेल्यावर्षी खरिपात झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे विदर्भातील जवळपास सर्वच सोयाबीन पीक उद्‍ध्वस्त झालं होतं. त्यामुळे यंदा दर्जेदार घरगुती सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांकडे उपलब्ध होऊ शकले नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कंपन्यांचे महागडे बियाणे खरेदी करण्यापासून गत्यंतर राहाले नाही. त्यातही विश्‍वासाचे आणि खात्रीचे म्हणून महाबीजच्या महागड्या सोयाबीन बियाण्याला शेतकऱ्यांनी प्रथम पसंती दर्शविली. परंतु, बहुतांश कंपन्यांचे बियाणे पेरल्यानंतर उगवलेच नसल्याचे राज्यभरात निदर्शनास आले. त्यामुळे महाबीजसह इतरही नामांकीत बियाणे कंपन्‍यांवर कारवाई करावी, कंपन्यांनी बियाणे बदलून द्यावे, बियाण्याचे पैसे परत करावे, झालेल्या नुकसानीचे व दुबार पेरणीचे पैसे कंपनीने अदा करावी इत्यादी मागण्यासह तक्रारीचा राज्यभरातून पूर वाहू लागला आहे. मात्र अजूनपर्यंत कोणत्याही बियाणे कंपन्यांवर प्रशासनाकीय यंत्रणांकडून कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आतातरी शासनाने शेतकऱ्यांवर झालेला हा अन्याय गांभिर्याने घ्यावा व त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटना व सामाजिक संघटनांकडून होत आहे.

तक्रारींचा पाऊस
बियाणे निकृष्ट निघाले, उगवलेच नाही, बोगस निघाले, बियाणे कमी भरले, बियाण्यात खडे निघाले इत्यादी बाबत, विदर्भातून १० ते १५ हजार, मराठवाड्यातून ४५ हजार व इतर भागातूनही हजारो शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत.

शेतकरी, सामाजिक संघटना आक्रमक
यंदा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळासह इतर नामांकीत बियाण्याचे सोयाबीन बियाणे निकृष्ट निघाल्याने शेतकरी संघटना, सामाजिक, राजकीय संघटना सुद्धा आक्रमक झाल्या असून, शेतकऱ्यांना न्याय मिळावा, दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीसह काहींनी महाबीजवर धरणे आंदोलन केले तर, काहींनी बियाणे कंपन्यांवर कारवाई व्हावी म्हणून कृषी विभाग, जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी सादर केल्या आहेत.

‘महाबीज’ म्हणते, बियाणे बदलून देऊ
तक्रार निवारण समिती व कंपनीचे अधिकारी तक्रारीनुसार पाहणी करीत आहेत. ज्या ठिकाणी प्रतवारी कमी आहे तिथे बियाणे बदलून दिले जात आहेत. ज्या शेतकऱ्यांनी दुबार पेरणीत दुसरे बियाणे वापरले त्यांना बियाण्याचे पैसे परत दिले जात असल्याची माहिती ‘महाबीज’कडून देण्यात आली.

अधिकाऱ्यांचे कंपन्यांशी साटेलोटे!
निकृष्ट बियाणे देणाऱ्या कंपनीला व त्या बियाण्यांना विक्रीसाठी मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांना माफी नसावी. बियाण्याबाबत आजपर्यंत हजारो तक्रारी आल्या. कृषिमंत्र्यांनीही कारवाईचे आदेश दिल होते. परंतु, त्यांबाबत कोणावरही कारवाई झाली नाही. अधिकाऱ्यांचे संबंधित कंपन्यांची साटेलोटे असावे, म्हणून त्यांना बगल दिली जात असावी.
- कृष्णा अंधारे, संयोजक, शेतकरी जागर मंच, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com