Akola News : विलंबानंतर प्रवेश प्रक्रियेला सुरवात; ३० एप्रिलपर्यंत आरटीईसाठी अर्ज करण्याची संधी

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील गरीब घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळावा यासाठी शाळा स्तरावर नोंदणीची प्रक्रिया ४ मार्च पासून सुरु झाली होती.
RTE Admission
RTE AdmissionSakal

अकोला : आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील गरीब घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळावा यासाठी शाळा स्तरावर नोंदणीची प्रक्रिया ४ मार्च पासून सुरु झाली होती. त्यानुसार जिल्ह्यातील एक हजार २१४ शाळांनी नोंदणी केली असून आरटीई प्रवेशासाठी १३ हजार ७३२ जागा रिक्त आहेत.

प्रवेशासाठी पालक १६ ते ३० एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतील. यंदा प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू झाल्याने पालकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) २०१९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

त्याअंतर्गत समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पालक जास्त प्रवेश शुल्क असलेल्या शाळांमधून आपल्या मुलांना शिकवू शकत नव्हते; मात्र आरटीईमुळे अशा पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे.

दरम्यान यंदा शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशाच्या प्रक्रियेला तब्‍बल दोन महिने विलंबाने प्रारंभ झाला आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता महानगर पालिका शाळा, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद, स्वयंअर्थसहाय्यित, जिल्हा परिषद शासकीय, खासगी अनुदानित, स्वयंअर्थसहाय्य, पोलिस कल्याणकारी, विनाअनुदानित अशा आरटीईअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना नोंदणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते.

त्यानुसार शासनाने आरटीई प्रवेशासाठी सरकारी शाळांनाही पात्र ठरवल्याने राज्यभरात शाळा नोंदणीची लगबग सुरू होती. आता प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्याने पालकांनी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात केली आहे.

नव्या अटीमुळे हिरेमोड

नवा नियमानुसार शिक्षण विभागाने सरकारी तसेच अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात येणाऱ्या शाळांना आरटीईतून वगळले आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांना सरकारी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बालकांच्या सक्तीच्या शिक्षणहक्क कायद्यानुसार आता सरकारी, अनुदानित शाळांमध्येच बहुतांशी मुलांना प्रवेश घ्यावा लागणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे पालकांमध्ये चिंता आहे.

सूचनांचे पालन न केल्यास अर्ज होणार रद्द

  • पालकांनी अर्ज भरताना निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.

  • बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्या वरीलच जन्म दिनांक लिहावा.

  • १ कि.मी, १ ते ३ कि.मी अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० च शाळा निवडाव्यात.

  • एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे दोन अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.

  • अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.

  • अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.

  • दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र ४० टक्के आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.

  • निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे. निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com