नांदुरा (बुलढाणा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत वर्षभरापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे स्कूलबसही बंद असून स्कूलबस मालक व त्यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने स्कूलबसबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी आता स्कूलबस संघटनेच्या वतीने होत आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी गत वर्षी मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले; तर अनेक व्यवसाय ठप्प पडले आहेत. तसेच कोराचा संसर्ग पाहता राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले. शाळा बंद असल्याने स्कूलबसही बंद होत्या. अनलॉक प्रक्रियेत काही दिवसांसाठी शाळा सुरू झाल्या. मात्र पुन्हा कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढू लागल्याने शाळा बंद करण्यात आल्या. १ ते ४ पर्यंतच्या शाळा व कॉन्व्हेंट सुरू करण्यात आल्या नाहीत. परिणामी, पुन्हा स्कूलबस बंद करण्यात आल्या. अनेक स्कूलबस मालकांनी कर्ज काढून स्कूलबस खरेदी केल्या आहेत. आता फायनान्स कंपन्या कर्ज भरण्यासाठी त्यांच्याकडे तगादा लावत आहेत.
एकीकडे उत्पन्नाचे साधन बंद झाले असून कुटुंबाचे पालनपोषण करणेच कठीण होत असताना फायनान्स कंपन्यांनी तगादा लावल्याने स्कूलबसचे मालक संतप्त झाले आहेत. फायनान्स कंपन्या स्कूलबस मालकांना नोटीस पाठवत आहेत. स्कूलबस बंद असल्यामुळे चालक व यावर अवलंबून असलेल्या कामगारांवरही उपासमारीची वेळ आली आहे. एक वर्षापासून रोजगार हिरावल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. काहींनी मोलमजुरी करण्यास सुरुवात केली आहे. स्कूलबससाठी घेतलेल्या कर्जाची वसुली शाळा सुरू होईपर्यंत शासनाने थांबवावी, अशी मागणी होत आहे.
तसेच अनेकांनी परिवारचा उदरनिर्वाह व्हावा या विवंचनेतून भाजीपाला विकणे, ऑटो चालविणे, छोटा मोठा व्यवसाय करणे अशा पर्यायांना प्राधान्य दिले असल्याचेदेखील समोर आले आहे. कित्येक दिवसानंतर ही परिस्थिती सुधारत असताना पुन्हा कोरोनाने युटर्न घेतल्याने व जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. दररोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे हे शैक्षणिक सत्र तर गेलेच परंतु यापुढेही दिवस कसे राहतील, याबद्दल अनिश्चितता असल्याने अनेक स्कूलबस मालक व चालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
फायनान्स कंपनीकडून हवे सौजन्य
अनेक स्कूलबस मालकांनी फायनान्सवर गाड्या घेतल्या आहेत. मागील वर्षी लॉकडाउन घोषित होताच सरकारच्या निर्देशाप्रमाणे पहिले तीन महिने हप्ते वसुली थांबविण्यात आली होती. परंतु नंतर फायनान्स कंपनीकडून ही वसुली सुरू करण्यात आली. आता पुन्हा शाळा बंद झाल्याने व लॉकडाउन लागल्याने स्कूलबस मालकांची परिस्थिती बिकट झाली असून अशावेळी कंपनीकडून सौजन्याची भूमिका त्यांना अपेक्षित आहे.
मागील वर्षीपासून स्कूलबस जागेवरच उभ्या आहेत. लॉकडाउन शिथिल होत असताना मधात लग्न समारंभासाठी काही ट्रिप आल्या; परंतु आता लग्न समारंभदेखील बंद झाल्याने परिस्थिती बिकट झाली असून कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण झाले आहे.
- राजू वाकोडे, स्कूलबस मालक.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.