
शिरपूर (जि.वाशीम) ः रासायनिक खताच्या किमतीमध्ये येत्या खरीप हंगामापासून कंपन्यांनी भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे आता खरीप हंगामातील शेतीचे बजेट कोलमडणार असल्याचे चित्र दिसत असून, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. यावर कोणताही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीत. The prices of chemical fertilizers skyrocket, farmers are worried; Kharif agriculture budget will collapse
कंपन्यांनी रासायनिक खताच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर यावर्षी वाढ केली आहे. जवळपास ४० टक्क्यांपर्यंत ही वाढ केली आहे. गत एक वर्षापासून कोरोनाशी संघर्ष करता करता शेतकरीवर्ग पुरता मेटाकुटीस आला आहे. कंपन्यानी रासायनिक खतांच्या किमतीमध्ये एकाच वेळी जवळपास ४० टक्क्यांनी वाढ केल्याने शेतकरी वर्गासमोर नवीन मोठे संकट उभे ठाकले आहे.
गत एक वर्षापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गास अनंत अडचणींचा सामना करावा लागला आहे. शासनाने लॉकडाउन जाहीर केल्याने भाजीपाला व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. मात्र, रासायनिक खताच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे चित्र आहे.
शासन एकीकडे शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न करण्याचे धोरण असल्याचे सांगत आहे. दुसरीकडे रासायनिक खते व शेतीसाठी लागणाऱ्या इतर निविष्ठांचे भाव मोठ्या प्रमाणावर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी संपूर्ण शेतीच तोट्यात चालली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी शेती कशी करावी हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कांद्याचे व टमाटरचे भाव थोडे जरी वाढले तर विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर राळ उठविल्या जाते मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ना विरोधीपक्ष बोलायला तयार ना लोकप्रतिनिधी! शासनाचे धोरण हे पूर्णतः शेतकऱ्यांच्या मुळावर असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही. शासनाकडे शेतमाल हमीभावाने खरेदी करण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही व शासनाकडून याबाबत कोणतेही प्रयत्न केल्याचे दिसत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग पुरता हवालदिल झाल्याचे चित्र आहे.
रासायनिक खतांचे जुने व नवीन दर
खताचा प्रकार जुने दर नवीन दर
१०:२६:२६ ११७५ १७७५
१२:३२:१६ ११९० १८००
२०:२०:०० ९७५ १३५०
पोट्याश ८५० १०००
२४:२४:० १३५० १९००
२०:२०:०:१३ १०५० १६००
सूपर फॉस्फेट ४०० ५००
वरील तक्त्यावरून रासायनिक खतांच्या किमतीमध्ये जुन्या दरामध्ये व नवीन दरामध्ये किती तफावत आहे हे दिसून येते. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. शासनाने हमीभाव निश्चित करताना सदर बाबीचा विचार करणे गरजेचे आहे. सर्वच बाजूंनी शेतकऱ्यांची नाकाबंदी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. रासायनिक खतांच्या किमतीमध्ये केलेली वाढ शासनाने त्वरित मागे घ्यावी, अशी शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे.
कांद्याचे दर वाढले की ओरड होते, सिलेंडरचे दर वाढले की विरोधी पक्ष आंदोलन करतो. रासायनिक खताचे दर तब्बल ४० टक्के वाढले असताना यावर कोणीच बोलायला तयार नाही. लोकप्रतिनिधींनी तोंडावर बोट ठेवले आहे. शेतकऱ्यांचा आता कोणीच वाली उरला नाही का? केलेली वाढ ही शेतकऱ्यांवर मोठा अन्याय करणारी बाब आहे.
- डॉ. हेमंत देशमुख, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी, डोंगरकिनी
संपादन - विवेक मेतकर
The prices of chemical fertilizers skyrocket, farmers are worried; Kharif agriculture budget will collapse
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.