भाववाढीचा भार अन् वजनातही मार...महाबीजची सोयाबीन बॅग किमतीने महाग वजनाने हलकी

Mahabeej seed.jpeg
Mahabeej seed.jpeg

अकोला : शेतकऱ्यांच्या हितासाठी महाबीज काम करते असे म्हणतात आणि त्यामुळेच आम्ही मोठ्या विश्वासाने महाबीजचे बियाणे खरेदी करतो. पण ऐन संकटाच्या वेळी महाबीजने आमचीच लूट चालविली आहे भाऊ...एकतर, यंदा सोयबीनची 30 किलोची बॅक 390 रुपयांनी महाग केली आणि त्यातही 800 ग्रॅम पर्यंत बियाणे कमी भरत आहे. आता शेतकऱ्याने विश्वास ठेवायचा तरी कोणावर, अशा शब्दात जिल्ह्यातील काही सोयाबीन उत्पादकांनी त्यांची व्यथा ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी, किडींचा प्रादुर्भाव व इतरही नैसर्गिक, अनैसर्गिक संकटांमुळे राज्यातील शेतकरी नुकसान सोसत असून, आर्थिक टंचाईचा सामना करीत आहे. अशा संकटांच्या काळात शेतकऱ्यांना अल्प दरात व शाश्वत बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी शेतकऱ्यांच्या सहभागातून महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची निर्मिती करण्यात आली. सध्या कोरोना विषाणूच्या रुपात मोठे संकट जगासमोर उभे आहे आणि त्याचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मात्र या संकटवेळी महाबीजने सोयाबीन बियाण्याची किंमत वाढवून शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. गेल्या वर्षी जेएस-335 बियाण्याची विक्री किंमत 1860 रुपये होती यंदा मात्र त्याच 30 किलो बियाण्याची विक्री किंमत 2250 रुपये करण्यात आली आहे. एवढ्यावरच प्रकरण थांबले नाही तर, 30 किलोच्या बॅगमध्ये 500 ते 800 ग्रॅम वजन कमी भरत असल्याने, महाबीजकडून संकटकाळात शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

ही शेतकऱ्यांची लूटच
महाबीजने यंदा सोयाबीन बियाण्याची किंमत प्रचंड वाढवून शेतकऱ्यांना संकट काळात मोठा धक्का दिला आहे. शेतकऱ्यांची संस्था म्हणून आम्ही विश्वासाने हे महाग बियाणे सुद्धा खरेदी केले. घरी आणून त्याचे वजन केले असता मात्र, प्रत्येक बॅग मध्ये 500 ते 800 ग्रॅम वजन कमी भरले. महाबीजने शेतकऱ्यांची अशी लूट करू नये. बियाण्याची किंमत वाढविल्याने व या फसवणूकीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहेच, शिवाय उत्पादनातही याचा मोठा फटका बसू शकतो.
- सुनिताबाई गावंडे, शेतकरी बचत गट अध्यक्ष, कौलखेड जहागीर, अकोला

शेतकऱ्यांचे हित हाच उद्देश असावा
शेतकऱ्यांकडून सर्वोत्तम बियाणं 52 रुपयाने घेऊन 75 रुपये किलोने विकने म्हणजे शेतकऱ्यांकडून नफा कमावने नाही का? सर्व महामंडळ सध्या तोट्यात असताना, महाबीज मात्र नफ्यात आहे! सध्याही सोयाबीनच्या बॅगचे दर खासगी कंपन्यांपेक्षा तीनशे ते पाचशे रुपयांनी वाढविले असून, प्रतिबॅग 500 ते 800 ग्रॅम बियाणं कमी भरत आहे. या प्रकारातून निश्चितच महामंडळ मोठा नफा कमाविल परंतु, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करेल.
- मनोज तायडे, शेतकरी जागर मंच, अकोला

वजन कमी भरणे शक्य नाही
महाबीजच्या सोयाबीन बियाण्याच्या बॅगांमध्ये बियाणे कमी असणे शक्य नाही. परंतु, याबाबत चौकशी करून वास्तविकता तपासली जाईल.
- अनिल भंडारी, व्यवस्थापकीय संचालक, महाबीज, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com