तीन महिने कळा सोसून अकोलेकरांनी काय धडा घेतला?

akola city
akola city

अकोला : 24 मार्च 2020 ते 8 जून 2020... हा काळ तसा फार मोठा नाही. पण आयुष्यभराचा अनुभव देवून गेला. होय कोविड-19 विषाणूमुळे संपूर्ण जगाला जीवन जगण्याची नवीन दिशा दाखविणारा हा काळ...पण याच काळात आम्ही अकोलेकरांनी काय धडा घेतला? 8 जूनची सकाळ या प्रश्‍नाचे उत्तर देणार होती. दुर्दैवाने म्हणावे लागेल की या काळत अकोलेकरांनी काहीही धडा घेतला नाही. पुन्हा तीच गर्दी...तोच निष्काळजीपण...तिच बेशिस्त...बँक, बाजारपेठेतील गर्दी...सार काही तेच..जे आम्ही 24 मार्चला मागे टाकलं होतं. कसा रोखणार शहरातील कोरोनाचा कहर.


अकोला शहराची लोकसंख्या 7-8 लाखाच्या घरात. आजूबाजूची गावे शहराच्या अर्थव्यवस्थेचा भाग. पश्‍चिम विदर्भातील त्यामानाने समृद्ध म्हणावी अशी एमआयडीसी. 400-500 उद्योग आणि त्यातून लाख-दीड लाख कामगारांचा चालणारा उदरनिर्वाह. बाजारपेठ तशी श्रीमंतच. किरणा बाजार तर महाराष्ट्रासह मध्यप्रदेशापर्यंत व्यवहाराचे जाळे पसरलेला. आरोग्य, शिक्षणाचे तर हबचं. या सर्वांवर भारी पडला तो कोरोना. 24 मार्चपासून सारंकाही बंद करून टाकल. तरी पण कोरोनाचा एकही रुग्ण 7 एप्रिलपर्यंत अकोल्यात नव्हता. आता येथील रुग्ण संख्या हजाराच्या घरात पोहोचली. तीन महिन्यांच्या बंदने कुठे-कुठे हात पसरविण्याची वेळ आली.

खायला घरात दाना नाही...हाताला काम नाही...वरून कोरोनाची दहशत. किती-किती म्हणून हालअपेष्टा या तीन महिन्यांत अकोलेकरांनी भोगल्यात. आतातरी अकोलेकर शिस्तीत राहतील. नियमांचे पालन करायला शिकतील. पण पालत्या घागरीवर पाणी म्हणतात ना तसे सर्वं काही 8 जूनच्या सकाळपासूनच बघायला मिळालं. अकोल्यात जणू काही घडलेच नाही. कोरोना वगैरे काही होता किंवा आहे हे आम्ही अकोलेकर ‘मिशन बिगिनिंग अगेन’च्या पहिल्याच दिवशी विसरलो. ऑटोरिक्षातील ती गर्दी, बाजारपेठेतील रस्त्यांवरच्या हातगाड्या नियमांना वाकुल्या दाखवत उभ्या असलेल्या बघावयास मिळाल्या. माणसांची गर्दी नसल्याने अकोलेकरांना गुदमरल्यासारखे झाले होते की काय, असा भास पहिल्याच दिवशी आला. आता कितीही थांबवितो म्हटले तरी कोरोनाच्या समूह संसर्गाला रोखणे अशक्य, असेच चित्र बाजारात बघावयास मिळाले. 

  
शिस्त पाळली तरच जगू
कोरोना विषाणूची भिती नव्हे पण काळजी मात्र निश्‍चितच घ्यायला हवी. शिस्तीत राहलो तरच जगू हा मुलमंत्र तंतोतंत पाळला तरच कोरोनाच्या समूह संसर्गाला टाळणे शक्यत होईल. अकोलेकरांची शिस्तच त्यांचे भविष्य ठरविणार आहे. अन्यथा तुम्हा वाचवयाला कुणीही येणार नाही. तेव्हा वेळीच सावध व्हा आणि शिस्तीत वागयला शिका एवढेच सांगावे वाटते.     


प्रशासनाची जबाबदारी वाढली
व्यवहार पुन्हा सुरळित होणे हे सर्वांसाठीच हिताचे. मात्र नागरिकांनी शिस्त पाळली नाही तर प्रशासनाची जबाबदारी आणखी वाढणार आहे. प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्न करीत आहेच. पण पुन्हा संपूर्ण शहर कंटेन्मेंट झोनमध्ये बदलणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे हे एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com