खान नव्हे, मराठीच महापौर!
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचे ठाम प्रतिपादन
मुंबई, ता. १३ : ‘मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित आहे. काहीही झाले तरी मुंबईचा महापौर मराठीच होणार. कोणताही खान या पदावर नसेल,’ असे ठाम प्रतिपादन मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी गुरुवारी (ता. १३) ‘सकाळ संवाद’मध्ये केले. ‘महायुती १५०पेक्षा अधिक जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या वेळी साटम यांनी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला.
‘मुंबईत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइं अशी महायुती आहे. २२७ प्रभागांत आम्ही महायुती म्हणून लढू. २२७ पैकी १५०पेक्षा जास्त जागा महायुती जिंकेल. महापौर कुठल्याही पक्षाचा असू दे. काही फरक पडत नाही. भाजपचाच महापौर झाला पाहिजे, असा आमचा आग्रह नाही. मुंबईचा महापौर हा महायुतीचा असेल आणि मराठीच असेल, हे निश्चित आहे. कुठल्याही परिस्थितीत खान महापौर होऊ देणार नाही,’ असे साटम यांनी ठामपणे सांगितले.
जमिनीवरची परिस्थिती बघून, स्थानिकांचा कल जाणून घेऊन जागावाटपाबाबत निर्णय घेतला जाईल. आमच्या सहकारी पक्षात कुठल्याही प्रकारचा वाद नाही. आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. यात कुठल्या जागेवर कोण लढणार, या सर्व बाबी लोकांची पसंती कुठल्या काम केलेल्या उमेदवाराला आहे, तो कुठल्या पक्षाचा आहे, यावर अवलंबून निर्णय घेण्यात येतील, असे साटम म्हणाले.
-----------------
‘वंदे मातरम्’ म्हणतील ते आमचे!
‘जे मुस्लिम वंदे मातरम् म्हणतील ते आमचे आहेत. देशविघातक, समाजविरोधी शक्तींना बरोबर घेऊन कोणी चालणार असेल, पाकिस्तानचे झेंडे फडकवणार असाल किंवा बॉम्बस्फोटातील आरोपीला घेऊन प्रचार करणार असाल, तर ते कसे स्वीकारणार,’ असा सवालही साटम यांनी व्यक्त केला.
-----
ठाकरेंनी २५ वर्षे मुंबई लुटली
उद्धव ठाकरे यांनी २५ वर्षांत मुंबई लुटली अन् विकली. त्यात आम्ही वाटेकरी नाही. भाजपचा महापौर, स्थायी समितीचा अध्यक्ष कधीच नव्हता. आयुक्तापासून सर्व जण शिवसेनेच्या पसंतीचे होते. उद्धव ठाकरेंच्या निर्देशानुसार ते काम करणारे होते. त्यामुळे २५ वर्षांत मुंबई महापालिकेत वाईट घडले त्याचे श्रेय उद्धव ठाकरे यांनीच घेतले पाहिजे. पालिका निवडणुकीच्या सहा महिने आधी मराठी माणसाला साद घालायची अन् नंतर पाच वर्षे मुंबई लुटायची, एवढेच त्यांनी केले.