चिंचवड, ता. २४ : केजूदेवी बंधारा, बिर्ला घाट ते मोरया मंदिर, काळेवाडी या भागातून वाहणारी पवना नदी प्रदूषणामुळे पुन्हा फेसाळली आहे. गेल्या काही दिवसांत दर पंधरा दिवसांनी नदीपात्रात पांढऱ्या फेसाचे थर दिसत आहेत. केजूदेवी बंधारा ते बिर्ला घाटापर्यंत ही स्थिती दिसून येते. प्रदूषण रोखण्यासाठी हालचाली केल्याचा केवळ दिखावा केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर केला आहे.
बंधाऱ्याच्या उर्ध्व भागात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढली आहे. येथील रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. काही ठिकाणी मासेमारीसाठी जिलेटिन कांड्या वापरून स्फोट घडवून आणले जातात. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पाहणीसाठी येतात; मात्र पाण्याचे नमुने घेणे आणि नंतर अहवालापुरतीच कारवाई होते. पण, परिस्थिती मात्र कायम असते, असे पर्यावरणप्रेमी नागरिकांनी सांगितले. घरगुती तसेच सोसायटीची सांडपाणी व्यवस्थेची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’अशीच आहे. अनेक वेळा सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जाते. रावेत बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येतात; त्यांच्यावर निर्बंध आणले जात नाहीत.
देहूरोड परिसरातूनही सांडपाणी
देहूरोड परिसरातील सांडपाणीही पवना नदीत मिसळत असल्याने नदीचे पाणी अधिकाधिक दूषित होत आहे. नव्याने होत असलेल्या हाउसिंग सोसायट्यांचे ‘एसटीपी’ अर्थात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केवळ कागदावरच असून, सांडपाणी शुद्धीकरण न करता नदीत सोडले जात असल्याचा आरोप होत आहे.
औद्योगिक सांडपाणी थेट नदीत
‘‘रावेत पंपहाऊसच्या वरचा भाग तुलनेने स्वच्छ असतो; मात्र केजुदेवी बंधारा ते काळेवाडीपर्यंत संपूर्ण पाणी प्रदूषित दिसते. प्रशासनावरचा ताण किंवा वाढती लोकसंख्या यामुळे आवश्यक तेवढे शुद्धीकरण होत नाही. तसेच काही ठिकाणी औद्योगिक व रासायनिक सांडपाणीदेखील थेट नदीत सोडले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.
जलचरांच्या प्रजाती संपुष्टात
पवना नदीतील प्रदूषणामुळे जलचर आणि माश्यांच्या प्रजाती संपुष्टात आल्या आहेत. तसेच हे पाणी पक्षी, प्राणी तसेच काही प्रमाणात नागरिकांकडूनही वापरले जाते. त्यामुळे विविध प्रकारचे आजार बळावत आहेत. रुग्णतपासणी अहवाल सामान्य असूनही, नागरिक आजारी पडत असल्यास त्यामागे या पाण्याचे दुष्परिणाम असल्याचा आरोप होत आहे.
पवना नदीपात्रात केजूदेवी बंधारा ते बिर्ला घाटादरम्यान प्रदूषणाचे भयावह दृश्य दर पंधरा दिवसांनी दिसते. नागरी वस्ती, रसायनयुक्त पाणी आणि मासेमारीसाठी जिलेटिनच्या कांड्यांमुळे नदीचा श्वास गुदमरतो आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाची पाहणी केवळ कागदावरची कारवाई ठरते आहे. मोठ्या हाउसिंग सोसायट्यांचे एसटीपी प्लांट सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प फक्त कागदावरच आहेत. ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशी स्थिती असल्याने नदीचे प्रदूषण थांबणार कसे?”
- सिकंदर घोडके, पर्यावरणप्रेमी
पवना नदीची दयनीय अवस्था प्रशासन, पाटबंधारे विभाग तसेच राजकीय प्रतिनिधींना पूर्णतः माहिती आहे. पण, सर्वांनीच जणू डोळेझाक केली आहे. नैसर्गिक संपत्ती व नागरिकांच्या आरोग्याबाबत जबाबदारी झटकण्याचेच प्रकार वाढले आहेत. केवळ पाहणी, व्हिडिओ, फोटो, नमुने व चाचण्या यापुरतीच मर्यादित कार्यवाही नेहमीची झाली आहे. नदीकाठी पर्यटनस्थळे व देवस्थाने असताना ही नदी आज ‘गटारगंगा’ झाली आहे. या नदीला पुन्हा तिचे नैसर्गिक रूप देणे आपली जबाबदारी आहे.
- अनिल घोडेकर, नदीप्रेमी, थेरगाव सोशल फाउंडेशन
नदी प्रदूषणास कारणीभूत उर्ध्व भागातील रासायनिक कंपन्यांना यापूर्वी नोटीस बजावल्या आहेत. तसेच ज्या कंपन्यांचे रसायन थेट नदीत यायचे अशा काही कंपन्या सीलदेखील केल्या आहेत. आता सध्याची परिस्थिती पाहण्यासाठी ताबडतोब पथक पाठविले जाईल. योग्य ती कार्यवाही प्रशासकीय पातळीवरून केली जाईल.
- संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता, पर्यावरण विभाग, महापालिका
घरगुती सांडपाणी प्रक्रिया आणि रासायनिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया (एसटीपी व एटीपी) अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी आम्ही महानगरपालिकेला वारंवार पत्रव्यवहार करून सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेने यावर कार्यवाही करणे गरजेचे आहे.
- मंचक जाधव, उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
PNE25V79407
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.