आर्थिक सुधारणांतून महासत्तेकडे...

भारतीय औद्योगिक विश्वाचा विचार केल्यास, त्याचे सरळ सरळ दोन भाग करता येतील... १९९१ पूर्वीचा आणि त्यानंतरचा भारत.
Baba Kalyani
Baba KalyaniSakal

देशाला खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण बनविणाऱ्या या योजनांचा जोरकस वापर केल्यास आणि विकासाच्या प्रक्रियेत समाजातील शेवटच्या घटकाला सामावून घेतल्यास आपण पुन्हा एकदा भारताला प्रगतिपथावर नेऊ शकतो.

भारतीय औद्योगिक विश्वाचा विचार केल्यास, त्याचे सरळ सरळ दोन भाग करता येतील... १९९१ पूर्वीचा आणि त्यानंतरचा भारत. भारताच्या आर्थिक इतिहासात नव्वदीचे दशक सर्वांत जास्त आव्हानात्मक होते. देशाची अर्थव्यवस्था गंभीर संकटांनी ग्रासली होती. राजकीय अस्थिरता आणि जागतिक घडामोडींचा परिणाम देशाच्या अर्थकारणावर होत होता. देशात येणारा नवीन रुपी ट्रेडक्रेडिट प्रवाह आटला होता. भारताची निर्यात लक्षणीयरीत्या घटली होती. ऑगस्ट १९९०मध्ये इराक-कुवेत युद्ध सुरू झाल्याने त्याचाही विपरीत परिणाम आपल्या आर्थिक चक्रावर झाला होता. चालू खात्यातील वाढती तूट, विदेशी कर्जातील वाढ आणि विदेशी चलन गंगाजळीतील कपात यांमुळे विदेशी गुंतवणूक येणे कमी झाले होते. भारतासाठी हा काळ अतिशय कसोटीचा होता. केंद्राची प्रचंड तूट भरून काढण्यासाठी सरकारला कर्ज घेणे भाग पडले होते.

अशा परिस्थितीत भारताने १९९१मध्ये मुक्त अर्थव्यवस्थेचा आणि त्यानंतर २०००मध्ये जागतिकीकरणाचा स्वीकार केला आणि संपूर्ण उद्योगविश्वाला जणू संजीवनी मिळाली. तेव्हापासून आजतागायत भारतीय उद्योग आपल्या प्रतिभेची चमक दाखवत संपूर्ण जगाला कवेत घेण्यास सज्ज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबल आणि द्रष्ट्या नेतृत्वाखाली भारताच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल ५ ट्रिलियन डॉलरच्या दिशेने सुरू झाली. त्यामागे करप्रणालीतील जीएसटीचा बदल, नोटाबंदी, मेक इन इंडिया योजना अशा महत्त्वाकांक्षी निर्णयांचे पाठबळ होते. आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेला या टप्प्यावर आणायचे असल्यास आपल्याला अद्ययावत तंत्रज्ञान आणि अभिनव कल्पनांची कास धरावी लागेल.

स्टार्टअप संस्कृती रुजण्यासाठी...

फोर्जिंग उद्योगात १९९१ नंतरच्या काळात हॅमर तंत्रज्ञानाचा वापर टाळून प्रेस तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्याने भारत फोर्जची उत्पादन क्षमता अनेक पटींनी वाढली आणि व्यवसायाला नवी दिशा मिळाली देशामधील सॉफ्टवेअर, हॉटेल्स, बँकिंग अशा अनेक उद्योगांनी अभिनव प्रयोग केले, जे त्यांना यशाच्या उंच शिखरावर घेऊन गेले. नवनवीन आव्हानांचे संधींमध्ये रूपांतर करण्याबरोबरच नव्या संधी निर्माण करण्याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे, यासाठी वेगवेगळ्या स्टार्टअप्सना उत्तेजन देणे आवश्यक आहे. त्यासाठी नवे विचार, नव्या प्रक्रिया आणि अभिनव कृतींना उद्योजकांनी उत्तेजन द्यायला हवे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम दर्जाची उत्पादने व सेवा किफायतशीर दरात पुरविणारा देश म्हणून आपण आपला ठसा यापूर्वीच उमटवला आहे.

आत्मनिर्भरतेच्या दिशेने...

कोरोनाच्या काळात आपल्या देशात कधीच उत्पादित होत नव्हती, अशी पीपीई किटसारखी अनेक उत्पादने आपण देशांतर्गत स्तरावर उत्पादित केली आहेत. जागतिक औद्योगिक सृष्टीत सध्या झपाट्याने बदल होत आहेत. या बदलांची अचूक दिशा जे धरतील, तेच यापुढे यशाच्या दिशेने मार्गस्थ होऊ शकतील, हे नक्की. भारताने या बदलांशी जुळवून घेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सकारात्मक पावले टाकली आहेत. मोदीजींच्या ‘मेक इन इंडिया’सारख्या राष्ट्रातील उद्योगांना चालना देणाऱ्या प्रभावी योजनांची तितकीच प्रभावी अंमलबजावणी भारत करीत आहे. त्यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेला स्वदेशी वापराचा नारा आणखी बुलंद करीत आहे. त्या जोडीला ‘व्होकल फॉर लोकल’ म्हणजेच ‘स्वदेशी’चा नारा बुलंद करण्याकडे आता आपण लक्ष दिले पाहिजे. देशाला खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण बनविणाऱ्या या योजनांचा जोरकस वापर केल्यास आणि विकासाच्या प्रक्रियेत समाजातील शेवटच्या घटकाला सामावून घेतल्यास आपण पुन्हा एकदा भारताला प्रगतिपथावर नेऊ शकतो. आपल्याकडे बुद्धिमान व प्रतिभावंत मनुष्यबळ आहे, सेवासुविधांचे जाळे आपण विकसित करीत आहोत. आम्ही जे काही वापरू ते देशांतर्गत स्तरावरच तयार झालेले असेल, या निश्चयाची जोड आपल्या साधनसुविधांना मिळाल्यास हे बळ आपल्याला विकासाच्या अधिक उंच क्षितिजावर घेऊन जाईल.

संरक्षण सिद्धता, अन्नधान्याबाबत स्वयंपूर्णता तसेच तंत्रज्ञानाभिमुख, अभिनव कल्पनांना महत्त्व देणारी रोजगारक्षम आणि विकसित उद्योजकता यांच्या जोरावर भारत पुन्हा एकदा एक महासत्ता म्हणून प्रस्थापित होऊ शकेल, असा मला पूर्ण विश्वास वाटतो.

- बाबा कल्याणी, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, भारत फोर्ज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com