वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा विकासदराचा अंदाज 1.2 टक्क्यांनी घटवला आहे. मंदीशी सामना करणारी भारतीय अर्थव्यवस्था जेमतेम 6.1 टक्क्यापर्यंत मजल मारेल, असे नाणेनिधीने म्हटले आहे. एप्रिलमध्ये नाणेनिधीने 7.3 टक्के विकासदराचा अंदाज वर्तवला होता. नुकताच वर्ल्ड बॅंकेने भारताचा विकासदर 6 टक्के राहील, असा अंदाज वर्तवला होता.
चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकासदर 5 टक्क्यांवर आला आहे. वाहन आणि स्थावर मालमत्ता या उद्योगांना मंदीने ग्रासले आहे. त्याशिवाय बिगर बॅंकिग वित्त संस्थांवरील अनिश्चितता कमी झालेली नाही. त्यामुळे दुसऱ्या तिमाहीत विकासदर आणखी कमी होईल, असे भाकीत नाणेनिधीने "वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक' या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे.
विकासाला चालना देण्यासाठी पतधोरणातील व्याजदर कपात, कंपनी करात घट आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे अर्थचक्राला गती मिळेल, असा आशावाद नाणेनिधीकडून व्यक्त करण्यात आला आहे.
|