Investor
InvestorSakal

अर्थभान : गुंतवणूकदारांच्या मनातील बोलू काही...

सध्या सर्वच गुंतवणूकदार एका कठीण परिस्थितीतून जात आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये मंदीसदृश वातावरण आहे.
Summary

सध्या सर्वच गुंतवणूकदार एका कठीण परिस्थितीतून जात आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये मंदीसदृश वातावरण आहे.

सध्या सर्वच गुंतवणूकदार एका कठीण परिस्थितीतून जात आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये मंदीसदृश वातावरण आहे. आपल्या शेअर बाजारातपण पडझड चालू आहे. सर्व गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्यांकन कमी झाले आहे. अशा परिस्थितीत नवा गुंतवणूकदार असो वा जुना, सर्वांच्या मनात काही प्रश्न आहेत. आज मी या लेखातून काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करीत आहे.

प्रश्न - सध्या शेअर बाजारात पडझड चालू आहे. अस्थिरतेचे वातावरण आहे. म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक काढून घ्यावी आणि नंतर पुन्हा गुंतवावी, असे वाटत आहे. काय करावे?

उत्तर - जेव्हा शेअर बाजारात पडझड चालू असते, तेव्हा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक काढून न घेता आपल्या सल्लागाराशी बोलून नवी गुंतवणूक करावी. म्हणजे पडझडीमुळे खाली आलेल्या भावामुळे (एनएव्ही) आपल्याला जास्त युनिट मिळतात. जसे सोन्याच्या भावात घसरण झाल्यावर आपण गुंतवणूक म्हणून घेतलेले सोने विकतो का? उलट, घसरलेल्या कमी भावात सोने घेण्यासाठी सराफी दुकानांसमोर रांगा लावतो. हाच विचार म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबाबत ठेवायला हवा.

प्रश्न - जोपर्यंत अस्थिरतेचे वातावरण आहे, तोपर्यंत मी ‘एसआयपी’ थांबवतो आणि शेअर बाजार परत वर जायला लागल्यावर चालू करतो. चालेल?

उत्तर - हा दृष्टिकोन तर पूर्णतः चुकीचा आहे. जेव्हा बाजार पडत असतो, तेव्हा ‘एसआयपी’मुळे आपल्या गुंतवणुकीला ‘रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग’चा फायदा मिळतो. माझे तर म्हणणे आहे, की जर एखाद्याची एसआयपी दरमहा १५ हजार रुपयांची असेल, तर जेव्हा पडझड होत असते तेव्हा ती ३० हजार रुपयांची करावी. पण तसे न जमल्यास जी चालू गुंतवणूक आहे, ती तरी बंद करू नये. ‘एसआयपी’ ही शेअर बाजाराच्या प्रत्येक परिस्थितीत दीर्घकाळासाठी करावी, तर आणि तरच यातून चांगला परतावा मिळू शकतो. नुसती चढ्या बाजारामध्ये ‘एसआयपी’ केली तर चांगला परतावा मिळणार नाही.

प्रश्न - माझ्या गुंतवणुकीवर सध्या फक्त १६ टक्के सरासरी परतावा मिळताना दिसत आहे. तो खूप कमी वाटतो. त्यामुळे गुंतवणुकीतून बाहेर पडावे का?

उत्तर - हा परतावा जर कमी वाटत असेल, तर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक विकून दुसरीकडे कोठे गुंतवणूक करणार? बँकेत की पोस्ट ऑफिसमध्ये? तिथे किती परतावा मिळतो? १५-१६ टक्के सरासरी परतावा हा इतर कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीच्या परताव्यापेक्षा चांगला आहे. तेव्हा ही चूक कधीही करू नका.

प्रश्न - मी गेले एक वर्ष गुंतवणूक करीत आहे. परतावा तर सोडाच; पण मूल्यांकन गुंतवणूक रकमेपेक्षा कमी झाले आहे. हे असे कसे? त्यापेक्षा बँकेत गुंतवणूक केली असती तर काहीतरी परतावा मिळाला असता...

उत्तर - बँकेतील गुंतवणुकीवर व्याज मिळते आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर परतावा मिळत असतो. व्याज हे निश्चितअसते, पण मर्यादित असते. परतावा हा निश्चित नसतो, पण अमर्यादित असतो, हा फरक प्रत्येकाने लक्षात घेतला पाहिजे. म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीवर प्रत्येक वर्षी परतावा मिळेलच, असे नाही. पण जर ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी म्हणजे ५, ७, १० वर्षांसाठी केली असेल तर बाकी कोणत्याही गुंतवणूक प्रकारापेक्षा या गुंतवणुकीत जास्त परतावा मिळालेला आहे.

त्यामुळे बाजारातील घसरणीमुळे घाबरून न जाता, गुंतवणूकदारांनी नियमित गुंतवणूक चालू ठेवावी आणि संयम राखावा, हेच पुन्हा सांगेन.

(लेखक म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे प्रमाणित सल्लागार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com