
नवी दिल्ली : आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी रेपो दरात (Repo Rate) 0.40 टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली आहे. यामुळे बँकांसह सर्वसामान्यांना कर्ज घेणे (Bank Loan) महाग होणार आहे. महागाईमुळे आधीच कंबरडे मोडलेल्या सामान्यांना आणखी एक जोरदार फटका बसला असून, रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णयामुळे बँकेच्या कर्जांचे हप्ते महागणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचे पडसाद शेअर बाजारावरही दिसून आले. शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. दरम्यान, आरबीआयच्या या निर्णयाचा फटका सामान्यांना बसणार असून, यामुळे सर्वसामान्यांच्या कर्जांचे हप्ते वाढणार आहे. (RBI Increase Policy Repo Rates)
रेपो रेटवर, रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना त्यांच्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज देते, तर रिव्हर्स रेपो रेट अंतर्गत, बँकांना त्यांचे पैसे रिझर्व्ह बँकेकडे ठेवण्यावर व्याज मिळते. गेल्या दोन वर्षांपासून आरबीआयने उदार धोरण ठेवले होते. एप्रिल 2022 पर्यंत चलनविषयक धोरण समितीच्या मागील 11 बैठकांमधून धोरण दर अपरिवर्तित ठेवण्यात आले होते. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या बैठकीत एमपीसीने पॉलिसी रेट रेपो 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के कायम ठेवला होता.
शेअर बाजारात पडझड
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्याचा घोषणेचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला आहे. या घोषणेनंतर सेन्सेक्स 1300 अंकानी कोसळला आहे. तर, निफ्टी 387 अंकानी कोसळला आहे.