आज देशाला नेहरू आणि पटेल दोघांच्या विचारांची गरज...

Article on jawaharlal nehru and sardar vallabhbhai patel relationship
Article on jawaharlal nehru and sardar vallabhbhai patel relationship

आज भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणुन जगाने ज्यांची नोंद घेतली असे नेहरु. खरंतर आजची ही जयंती ही अनेक कारणांसाठी महत्त्वाची आहे. आज जेव्हा नेहरु अणि सरदार पटेल यांच्या नावे स्वताची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी व आम्हीच कसे त्यांच्या विचाराचे खरे वारसदार आहोत हे सामान्य मतदाराच्या गळी उतरविण्यासाठीची चढाओढ सुरू आहे. तेव्हा नेहरूंचं, त्यांच्या विचारांचं विवेचन करणं गरजेचं होऊन जातं. 

जवाहरलाल नेहरू हे नाव, हा विचार सातत्याने या देशात चर्चेला येत असतो. मग मध्यंतरी डाव्या विचारांच्या मानल्या जाणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलन असो अथवा अलीकडेच उभारण्यात आलेला सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा असो. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व पायाभरणीत भरीव असे योगदान या दोन्ही नेत्यांचे आहे. सरदार अणि नेहरु याची मैत्री सर्वश्रुत आहे अर्थात त्यांच्यात मतभेद होते पण वैर नव्हते. दोघेही एकमेकांच्या मतांचा मान राखणारे होते. पण आज दोघांनाही परस्पर विरोधी टोकावर उभे केले जात आहे.

1917 साली महात्मा गांधीना भारतात परतून दोन वर्ष होत आली होती. गांधी हळूहळू लोकांना आपलेसे वाटू लागले होते. याच काळात नुकतेच इंग्लंड वरून वकील होऊन आलेले जवाहरलाल नेहरू काँग्रेस अणि महात्मा गांधी यांच्या संपर्कात आले. त्याकाळी जवाहर जसे काँग्रेस पक्षाचे चाहते होते तसेच टीकाकार ही होते. त्यांच्यावर समाजवादी विचारांचा प्रभाव होता. आवश्यक त्या वस्तू सामन्यांपर्यंत पोहोचणार नाहीत तोपर्यंत स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही असं त्याचं मत होते. तर दुसरीकडे खेडा, बारडोली सत्याग्रहातून सक्रीय झालेले सरदार पटेल खऱ्या अर्थाने गांधी अनुयायी होते. महात्मा गांधी यांच्यावर निस्सीम श्रद्धा पटेल यांची होती.

1930 साली काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाच्या अध्यक्षपदी सरदार पटेल असावेत असे मोतीलाल नेहरू यांचे मत होते. गांधीजी मात्र वेगळा विचार करत होते. त्यांनी जवाहरलाल यांना अध्यक्षस्थानी बसवले. याच ऐतिहासिक अधिवेशनात नेहरु यांनी आक्रमकता दाखवत संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी लावुन धरली. लोकांना नेहरूंचा हा अंदाज खूप भावला अणि हाच तो क्षण होता जिथे नेहरूंनी प्रत्येक भारतीय तरुणाच्या गळ्यातील ताईत बनले यानंतर नेहरूंची लोकप्रियता वाढताच गेली.

नेहरु अणि सरदार यांचे एकमेकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. ते त्यांनी एकमेकाना लिहीलेल्या पत्रातून दिसून येते. आपण जे काही आहोत त्याचे कारण गांधी आहेत हे ते दोघं कधीच विसरले नाहीत. अनेकदा जेव्हा गप्पांचे फड रंगात तेव्हा नेहरू सरदारांना सोडण्यास त्यांच्या घरापर्यंत चालत जात पण परत दोघे बोलण्यात रमून जात अणि मग सरदार नेहरूंना सोडण्यास त्यांच्या घरापर्यंत चालत येत. इतका निस्पृहता त्या नात्यात होती. इतकंच काय पण सरदार पटेल यांनी त्यांच्या शेवटच्या काळात ज्यादिवशी माझं काही बरं वाईट होईल त्या दिवशी तुम्ही सर्वजण जवाहरला सांभाळा असे आपल्या सहकार्‍यांना सूचित केले होते. इतकी ही महान माणसं होती.

आजचे RSS पुरस्कृत सत्ताधारी ज्या पटेल यांनी संघावर बंदी घातली त्यांचा वारसा मिळवण्यासाठी नेहरू विरुद्ध पटेल अशी मांडणी करू पाहत आहेत हे खरच दुर्दैवी आहे. ही दोघेही एकमेकांना पूरक अशी व्यक्तिमत्त्व होती. ज्यांचं स्वातंत्र्य लढ्यात काहीच योगदान नाही ती लोकं हे करताहेत हेच मुळी हास्यास्पद आहे. 

स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता याच्यावरच भारताचा पाया रचला जावा हीच त्यांची धारणा होती. दोघांचीही तुलना होऊ शकत नाही इतके दोघेही थोर होते हेच खरं. आज देशाला नेहरू अणि पटेल दोघांच्या विचारांचा, त्यागाचा वारसा पुढे घेऊन गेलं पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com