235 कोटी 50 लाख लीटर पाण्याची बॅक

235 कोटी 50 लाख लीटर पाण्याची बॅक

मनाला भिडणारी वारी

वरवंडचा मुक्काम संपवून उंडवडीकडे निघालेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गस्थ झाला. वरवंडला मुक्काम असताना रात्री गेलो. गाव तस बागायती म्हणजे मुबलक पाणी. मात्र तरिही गावात भविष्याचा वेध घेवून पाणी साठवणूकीची तरतूद केल्याचे सत्य समोर आले. पाणीदार वरवडमध्ये 235 कोटी 50 लाख लीटर पाणी साठवता येईल असे बारा एकरात तळे खोदले आहे. मागील वर्षापासून त्याचे काम सुरू होते. ते पूर्ण झाले आहे. पावसाळा सुरू होईल. त्यावेळी गावाची तहान भागवण्याएवढे पाणी गावात आहेच. त्याहीपेक्षा शेतीचे पाणीही मुबलक आहे. मात्र बारा एकराच्या मुबलक तळ्यात साठणार पाणी म्हणजे भविष्यातील गरज ओळखून गावाने पाणी बॅंकच तयार केली आहे, असच म्हणाव लागेल. त्या तळ्यात पाणी एक दोन नव्हे तर चक्क 235 कोटी लिटर पाणी साठणार आहे. त्यामुळे गाव करेल ते राव काय जाणो ही म्हण येथे यर्थाथपणे सार्थ ठरते आहे..

वरवंड गावाचा उंबरा चार हजारांचा. लोकसंख्या वीस हजाराच्या आसपास. ऊस पीक गावात डौलदारपणे दिसतय, ज्यात गावाची समृद्धता जाणवते. आहे ही तसच. ऊसच मुख्य पिक असलेल्या वरवंडला पाणीही मुबलक आहे. मात्र तरिही गावान ठरवल अन ते केलेही. पालखी मुक्काम विठ्ठल मंदीरात असतो. त्याच्याच डाव्या बाजूला तळे दिसते आहे. ते गावकऱ्यांनी श्रमदानातून बांधले आहे. गावातील प्रत्येकाचा घाम त्यासाठी गाळला गेला आहे. 2015-16 मध्ये गावात पाऊस कमी झाला. त्यामुळे पाण्याच्या कमतरतेची झळ गावान सोसली. त्या झळीतच पाणी साठवणुकीचू बीज पेरली गेली. आत्ता जे तळे तयार झाले आहे. ते पूर्वी चांभार तळे म्हणून ओळखले जायचे. ते पडीक होते. दुष्काळाची झळ बसल्याने वीस एक तरूणींनी पुढाकार घेवून पड तळे पुन्नरूजीवीत करण्याचा घाट घातला. गावालाही विचार पटला. त्यांनी साथ दिली. बघता बघता श्रमदानाला गाव सारा जमला. काळी माती उपसण्यात आली. आता खोलीकरण बाकी होते. गावान गट तट बाजूला ठेवला सारी एकवटली. खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहूल कुल यांच्याकडे मदत मागितली. त्यांनीही खोलीकरणास सढळ हस्ते मदत केली. ग्रामपंचायत तयार होतीच. खासदार व आमदारही तयार झाले. यंत्र सामग्रीच्या डिझेलचा खर्च गावान उचलला. पाटबंधारे व जलसंपदा विभागही पुढे आला. अभ्यासपूर्ण आराखडा तयार झाला. त्याच्या बाजुने दुचाकी फिरवली तर त्याचा घेरा सव्वा किलोमीटरचा भरतो. खोली बारा फुटाची आहे. आत्ता पर्यंत त्यासाठी 50 लाखांचा खर्च आला आहे. विस्तीर्ण तळ्यात 235 कोटी 50 लाख लिटर पाणी साठवणुकीची क्षमता निर्माण झाली आहे. पाणीदार वरवंडच्या गावकऱ्यांनी एकत्रीत येवून केलेले काम खरच गावाची ओळख बदलण्यास कारणीभूत ठरणार आहे. वरवंडचे तळे गावासह आजूबाजूची तहान भागवणार आहेच. त्याशिवाय संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचीही तहान भागवणार आहे. वीस तरूणांनी ठरवून सुरू केलेल्या कामातून चळवळ उभा राहिली. त्यातून बारा एकराचे तळे अनेकांना आकर्षीत करत आहे. त्याचा आदर्श प्रत्येक गावान घेतला तर पाण्याचे दुर्भिक्क्ष कधीच जाणवणार नाही. यंदापासून वरवंडच्या तळ्यात पाणी साचणार आहे. पाण्याच्या 235 कोटी 50 लाख लिटरची पाणीदार संपत्तीची भरही गावात वाढणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com