मंदीतही सोन्याची झळाळी कायम

gold rate
gold rate

    देशाच्या अर्थव्यवस्थेला नवनवे हादरे बसत आहेत. प्रारंभी बेरोजगारीचा हादरा बसला. त्यानंतर आर्थिक विकासाचा दर मंदावला. ताज्या अंदाजानुसार तो ४.५ टक्के इतका घसरण्याची शक्‍यता आहे. यातच सप्टेंबर ते डिसेंबर या काळातील महागाईचा दर पाच वर्षांतील उच्चांकी ७.३५ टक्के इतका झाला. सध्या ठेवीवरील व्याजदर ७ टक्केच्या आसपास आहेत. त्यामुळे महागाईचा दर येत्या काळात कमी करण्यात सरकारला यश आले नाही तर ठेवीदार तोट्यात जातील. या पार्श्‍वभूमीवर व जागतिक अस्थिरतेमुळे सोन्याचे भाव मात्र वाढत आहेत. त्यामुळे मंदीतही सोन्याची झळाळी कायम राहिली आहे.

सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत शेतमालाची टंचाई निर्माण झाल्याने भाव मोठ्या प्रमाणात वाढले. यात प्रामुख्याने कांदा व भाज्यांच्या दरांचा समावेश होता. त्यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले तरी महागाईचा निर्देशांक पाच वर्षांतील सर्वोच्च ७.३५ टक्‍क्‍यांवर गेला. त्यामुळे आर्थिक जगतात काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली. महागाईचा वाढता दर हा गुंतवणूकदारांना अस्वस्थ करणारी बाब आहे. ७.३५ टक्के महागाईचा दर असेल तर त्यांनी केलेल्या १०० रुपयांच्या गुंतवणुकीवर एक वर्षानंतर किती परतावा मिळतो त्यावर त्यांची गुंतवणूक फायदेशीर की तोट्याची हे स्पष्ट होते. समजा, जर ७ टक्के परतावा मिळत असेल तर ती गुंतवणूक ३५ पैशांनी तोट्यातच आहे. अशा वेळी सुज्ञ गुंतवणूकदार फायदेशीर गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करेल, विविध पर्यायांचा विचार करेल, त्यामुळेच सध्या सोन्याचे दर वाढताना दिसत आहे.

आपल्याकडे सोन्याला एक खात्रीची, सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. ती कधी बुडणार नाही यावर लोकांचा विश्वासच नव्हे, श्रद्धा आहे. एक गोष्ट खरी आहे, की सोन्यात प्रदीर्घ काळ मूल्य जतन करण्याचा गुणधर्म आहे. सोन्याचे मूल्य चलनवाढीच्या वाळवीपासून सदैव सुरक्षित राहू शकते. म्हणजेच सोन्याच्या किमती महागाईच्या दरानुसार वाढत असतात. तसेच जागतिक किंवा राष्ट्रीय पातळीवर अस्थिरता किंवा अनिश्‍चितता निर्माण झाल्यास सोन्याचे भाव अधिक वेगाने वाढतात.१९८० ते २०१९ या काळात भारतातील सोन्याच्या किमती सरासरी वार्षिक ९.१ टक्‍क्‍याने वाढल्या. या काळातील सरासरी महागाई ८ ते ८.८ टक्के होती. भारतात सोन्याला तरलता(Liquidity) देखील प्रचंड आहे. आपण कधीही, कुठेही आपल्याकडील सोन्याचे पैशात रूपांतर करू शकतो. सोने कमीत कमी जागेत जास्तीत जास्त मूल्य ग्रहित करून ठेवू शकते. 

जागतिक सुवर्ण मंडळाच्या अंदाजाप्रमाणे भारतीयांनी आतापर्यंत २४ हजार टन सोन्याचा साठा करून ठेवला आहे, जो दरवर्षी २००-३०० टनांनी वाढतोच आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडे ८१३३ टन सोने आहे, तर भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडे केवळ ६०७ टन सोने आहे. भारतीय घरगुती सोनेसाठा जगातील अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स, चीन, रशिया इत्यादी देशांच्या एकत्रित सरकारी सोने साठ्याएवढा प्रचंड आहे. त्यामुळे देशात मंदीतही सोन्याची झळाळी कायम आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com