प्रियाचां ठायी सन्मान । प्रिय न पाहे समर्था जाण ।
तेवीं उच्छिष्ट काढिलें आपण । ते क्षमा कीजो ।। 575 ।। अध्याय 11 वा
ओवीचा अर्थ - असें पाहता की, स्नेह्याच्या ठिकाणी स्नेही सन्मानाची मुळीच इच्छा करत नाही. त्याप्रमाणे आपण आमच्या घरी उच्छिष्ट काढले. त्याची आपण क्षमा करावी.
असे म्हटले की, प्रेमात आणि युद्धात सर्व गोष्टी माफ असतात; पण प्रेमात सर्व गोष्टी माफ म्हणजे काय? प्रिय व्यक्तीने आपला मान राखला नाही, तरी त्याच्याकडून तशी अपेक्षा आपण कधीच करायची नसते. ती सन्मान करो न करो, आपण मात्र याबद्दल माफ करायचे असते. तरच ते प्रेम प्रेम राहते, तरच ते प्रेम टिकते आणि स्नेह वाढतो.
आपल्या प्रिय व्यक्तीने निमंत्रण दिले नाही म्हणून आपण त्याला भेटायचे नाही, त्याबद्दल मनात राग मनात धरायचा, नाराजी व्यक्त करायची, असे कदापि न करता त्याबद्दल त्याला माफ करून स्नेह कसा कायम राहील हेच पाहायचे असते. हेच खरे प्रेम असते. अध्यात्मात गुरू - शिष्य संबंध हा अशाच प्रेमावर आधारलेला आहे. पुत्राचे अपराध जसे वडील पोटात घेतात, तसे गुरू हे शिष्याचे अपराध आपल्या पोटात घेऊन स्नेह ठेवतात आणि शिष्याच्या प्रगतीवर ते लक्ष देतात.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.