आयुष्य आणि संपत्ती (शनिवारची बोधकथा)

आयुष्य आणि संपत्ती (शनिवारची बोधकथा)
आयुष्य आणि संपत्ती (शनिवारची बोधकथा)

"गुरुवर्य, आयुष्यात संपत्तीचे महत्त्व आहेच ना? हे ज्ञान तपश्‍चर्या कशासाठी?', शिष्याने प्रश्‍न केला. काय म्हणाले गुरुवर्य? वाचा:

गुरुकुलातील शिष्यांच्या एका तुकडीचा अभ्यासक्रम पूर्ण झाला होता. काही दिवसातच ही तुकडी निरोप घेणार होती. गुरुवर्यांनी एकेदिवशी सर्वांना एकत्र बोलावले. "आयुष्यात संपत्ती महत्त्वाची नाही. माणूस महत्त्वाचा आहे. माणसाच्या गरजा फार कमी आहेत. मात्र संपत्तीच्या मोहापायी माणसाने गरजा वाढून ठेवल्या आहेत. त्या मिळविण्यासाठी तो सतत धडपडत असतो. गरज कधीही संपत नाही. ती सातत्याने वाढत जाते. माणूस संपून जातो. पण गरज संपत नाही. त्यामुळे गरज भागविण्यासाठी असलेला संपत्तीचा मोह संपत नाही. माणसाने आपल्या आयुष्यात संपत्ती मिळविण्याचा प्रयत्न नक्की करावा मात्र, तिला आयुष्यात फार मोठे स्थान देऊ नका' गुरुवर्यांनी उपदेश दिला. एका शिष्याला हे म्हणणे पटले नाही. तो म्हणाला, "गुरुवर्य, आयुष्यात संपत्तीचे महत्त्व आहेच ना? हे ज्ञान, हे तपश्‍चर्या कशासाठी? संपत्तीसाठीच ना?' त्यावर गुरुजी म्हणाले, "या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी तुला उद्याची वाट पाहावी लागेल' यावर "ठीक आहे', म्हणत तो शिष्य निघून गेला.

दुसऱ्या दिवशी लवकर तो गुरुवर्यांजवळ आला. गुरुवर्यांनी सर्व तयारी केली होती. त्यांनी शिष्याला सोबत चालण्यास सांगितले. दोघे जण जंगलाच्या दिशेने जाऊ लागले. ते खूप दूरवर चालत आले. शिष्याला काही समजेना. पण तरीही तो चालत राहिला. काही वेळाने त्याला तहान लागली. गुरुवर्यांनी सोबत पाणी आणि खायचे काही पदार्थांसह अन्य काही वस्तू आणल्या होत्या. मात्र "तुला जर उत्तर हवे असेल, तर आज दिवसभर उपवास ठेवावा लागेल', असे गुरुवर्यांनी शिष्याला बजावले. दोघे जण पुन्हा चालू लागले. शिष्य थकून गेला. त्याला तहान, भूक लागली. मात्र, गुरुवर्यांची आज्ञा तो मोडू शकला नाही. सकाळ संपली. दुपार संपली. संध्याकाळही संपत आली. अंधार पडू लागला. गुरुवर्यांनी शिष्याला माघारी फिरण्यास सांगितले. दोघेही पुन्हा आश्रमाच्या दिशेने निघू लागले.

"गुरुवर्य, मला माझ्या प्रश्‍नाचे उत्तर अद्याप मिळाले नाही. मला खूप तहान, भूक लागली आहे. कृपया मला उत्तर सांगाल का?', शिष्य व्याकूळ होऊन म्हणाला. त्यावर गुरुवर्यांनी त्यांच्याकडील खाण्याचे पदार्थ आणि सोबत आणलेला एक सोन्याचा अलंकार बाहेर काढला. खाद्यपदार्थ आणि सोन्याचा अलंकार जवळ जवळ ठेवले आणि म्हणाले, "आता तुला भूक लागली आहे. तू यापैकी काय निवडशील?' शिष्याने अगदी कोणताही विचार न करता सांगितले, "गुरुवर्य अर्थातच या अलंकाराने माझे पोट भरणार नाही. मला खाद्यपदार्थ हवे आहेत.' गुरुवर्य बोलू लागले, "आयुष्यात कधीही हे अलंकार, दागिने, संपत्ती खाऊन माणसाचे पोट भरत नाही. पोट भरते ते अन्न खाऊन. आयुष्यभर माणूस सारी धडपड करतो ती केवळ पोट भरण्यासाठी. ज्ञान, तपश्‍चर्या आहे तिचा उपयोग केवळ उदरनिर्वाहासाठीच करावा. मोहाने संपत्ती मिळविण्यासाठी नव्हे. त्यामुळे या संपत्तीला आयुष्यात फार मोठे स्थान देण्याचे कारण नाही.' एवढे बोलून गुरुवर्यांनी शिष्याला खाद्यपदार्थ दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com