

Guru Purnima: History & Significance
esakal
"देता आकार गुरूने
ज्याची त्याला लाभे वाट
घट पावती प्रतिष्ठा
गुरु राहतो अज्ञानी"
असे ग. दि. माडगूळकरांनी गुरूंचे वर्णन केले आहे.
भारतीय संस्कृतीत गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले गेले आहे. गुरु हा अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखविणारा मार्गदर्शक असतो. दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला संपूर्ण भारतात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
खर तर गुरुपौर्णिमा ही एक परंपरा आहे जी सर्वआध्यात्मिक व शैक्षणिक गुरुंना समर्पित आहे. या गुरूंना उत्क्रांत व प्रबुद्ध मानव आहेत असे मानले जाते. जे आपल्या कर्मयोगावरती आधारित आपले ज्ञान आपल्या शिष्यांना देतात. आता या 'गुरु' शब्दाचा नेमका अर्थ काय ? तर गुकार म्हणजे अज्ञानरुपी अंधकार व रुकार म्हणजे अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरुपी तेज. म्हणजेच 'गुरु' या शब्दाचा अर्थ, अज्ञानरुपी अंधकार घालविणारा असा होतो. बऱ्याचदा गुरुचे स्थान सगळ्यात वरती किंवा ईश्वरापेक्षा श्रेष्ठ मानले जाण्याचे कारण असे की ईश्वर आणि भक्त हे वेगळे नाहीत. ते एकच आहेत.
ईश्वर हा निर्गुण व निराकार असल्यामुळे देहभाव असलेल्या आपल्या भक्ताशी बोलता येत नाही किंवा संवाद साधता येत नाही. अशा वेळी तो आपल्या कार्यब्रह्माशी भक्ताची गाठ घालून देतो. या कार्य-ब्रह्मालाच 'गुरु' असे म्हणतात. गुरुच्या रुपाने ईश्वर आपल्या भक्ताशी बोलतो किंवा संवाद साधत असतो. ही गुरुकृपा दोन प्रकारांनी कार्य करते. एक म्हणजे संकल्प ! जो सूक्ष्मतम असतो. दुसरं म्हणजे अस्तित्व ! जो सूक्ष्मातिसूक्ष्म असतो. संकल्पामध्ये असे घडते की, जेंव्हा गुरूंच्या मनामध्ये आपल्या शिष्याची उन्नति व्हावी असा विचार निर्माण होतो तेंव्हाच त्याची उन्नतीं व्हायला सुरुवात होते, यालाच 'गुरुकृपा' म्हणतात पण अस्तित्वामध्ये गुरुच्या मनामध्ये असा विचार आला किंवा नाही आला तरीही गुरुच्या अस्तित्वाने, त्याच्या सान्निध्याने शिष्याची उन्नती व्हायला सुरुवात होते. याचे तंतोतंत उदाहरण सांगायचे झाले तर आचार्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांचे नाते सांगता येईल.