युवकांच्या अस्वस्थतेचा सांगावा काय...?

 the discomfort of youth
the discomfort of youth

   ‘‘शिक्षण घेऊन उपयोग काय? सरकारने भरती केली नाही तर नोकरी लागणार कुठं? आणि नोकरी नाय तर छोकरी कशी मिळणार?...’’ एक तरुण दुसऱ्या तरुणाला त्याचं दुखणं सांगत होता. हॉटेलमध्ये चहा पिता पिता चाललेला हा संवाद नीट ऐकल्यावर, शिक्षणाचा उपयोग नाही असे म्हणणारा तरुण एम.ए.बी.एड. असूनही बेरोजगार असल्याचे लक्षात आले. हे झाले एक उदाहरण; पण डीएड, बीएड, बीए.बीएड. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या हजारो तरुणांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. उत्तम गुण आणि बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असलेले अनेक तरुण ‘मला शिक्षक व्हायचंय’ असे म्हणत या अभ्यासक्रमांकडे वळले.

शिक्षण झाल्यानंतर आज ना उद्या नोकरी मिळेल, या आशेवर दिवसही काढत राहिले; मात्र राज्य सरकारने दहा वर्षांपासून शिक्षक भरती केलेली नाही. आता प्रक्रिया सुरू असली तरी या मधील काळात अनेकांच्या वाट्याला बेरोजगारीचे जिणे आले. शिक्षक, प्राध्यापक पदासाठी पात्र शिक्षण घेऊनही अनेक जण शेती करताहेत. शिक्षक होण्याचं स्वप्न गुंडाळून अनेक जण एमआयडीसीची वाट धरून हात काळे करत उदरनिर्वाह करताहेत. आता तेथेही मंदीमुळे नोकरी गमावण्याची टांगती तलवार आहेच. काही जण ‘सिक्‍युरिटी’ विभागात काम करताहेत. शिक्षक नोकरीसाठी अनेकांनी संस्थेकडे ‘जमा’ केली; मात्र नोकरी तर अद्याप मिळालेली नाहीच आणि ‘जमा’ही परत नाही. नोकरीची हमी असल्याने काही वर्षांपूर्वी भराभर सुरू झालेली डीएड कॉलेज केव्हाच बंद पडली आहेत. बीएड महाविद्यालयांनाही घरघर लागली आहे. कशीबशी तग धरून आहेत ती बीए.बीएड. महाविद्यालये. तेही एकाच अभ्यासक्रमात बीए व बीएड अशा दोन पदव्या घेता येतात या वैशिष्ट्यामुळे. मात्र, अशा पद्धतीचा अभ्यासक्रम असणारी महाविद्यालये दोनच आहेत आणि तीही कोल्हापूर जिल्ह्यातच.

शिक्षक हा समाजातील महत्त्वपूर्ण घटक. चांगला शिक्षक चांगला समाज घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो; पण मुळात शिक्षकच तयार झाले नाहीत व तयार झालेल्या शिक्षकांच्या हाताला काम आणि बुद्धी, विचारांना चालना मिळाली नाही तर या तरुणांची विधायक ऊर्जा समाजासाठी वापरणार कशी आणि त्यांची अस्वस्थता दूर करायची कशी, असा सवाल महावीर बीए.बीएड. कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे उपस्थित करतात, तेव्हा या प्रश्‍नातले गांभीर्य लक्षात येते. शिक्षक प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांच्या मनात नोकरी नसल्याची खदखद आहे. शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली तरी त्यास गती देण्यासाठी व प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी शिक्षित बेरोजगारांच्या ‘अस्वस्थतेचा सांगावा’ राज्य सरकारने गंभीरपणे घ्यायला हवा; अन्यथा...

शिक्षक प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात विश्‍लेषण क्षमता, विषयाचा विस्तार व सादरीकरण, चिकित्सक वृत्ती, कार्यकारणभाव समजून घेण्याची पद्धत विकसित होते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना याचा फायदा होतो. विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षक नोकरीच्या दृष्टीने न पाहता स्पर्धा परीक्षेतील करिअरच्या अंगानेही याकडे पाहावे.
- डॉ. आय. सी. शेख, प्राचार्य, 
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com