भगतसिंग यांचे स्वप्न आजही अधुरेच!

Even after 73 years of independence  Bhagat Singh  dream of an egalitarian society remains unfulfilled
Even after 73 years of independence Bhagat Singh dream of an egalitarian society remains unfulfilled

भगतसिंग म्हणजे देशभक्तीचा दीपस्तंभ, तरुणाईच्या जागृतीचे प्रतीक. त्यांचे नाव घेतले की तरुणाईची मान अभिमानाने उंच होते. त्यांचे व्यक्‍तिमत्त्व क्रांतिकारकाचे. शूर, साहसी, निश्‍चयी हे त्यांचे स्वभावविशेष. त्यांना अवघे २३ वर्षे पाच महिने २७ दिवसांचे आयुष्य लाभले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी साथीदारांसह ते हसत-हसत बेडरपणे फासावर गेले. त्यांचे हे बलिदान केवळ गोरा साहेब जाऊन त्या जागेवर अर्थात खुर्चीवर सावळा साहेब बसेल यापुरते मर्यादित नव्हते. केवळ सत्ताधीश बदलणे हे त्यांचे ध्येयच नव्हते, तर या देशामधील सर्व क्षेत्रांतील असमानता नष्ट होऊन समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा, देशातील प्रत्येक नागरिकाला शांती मिळावी, त्यांचा विकास होऊन हा देश अधिकाधिक समृद्ध, समर्थ आणि बलवान व्हावा, हे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. स्वातंत्र्यानंतर समाजवादी विचारांवर आधारित देश निर्माण व्हावा यासाठी लेखन आणि पत्रकारिता केली. त्यांचे वाचन अफाट होते.

पार्लमेंटमध्ये बॉम्बस्फोट केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात माफी मिळण्यासाठी अर्ज करण्यास त्यांनी नकार दिला होता; मात्र तुरुंगात आपणास हवी ती पुस्तके वाचावयास मिळावीत यासाठी अर्ज केला होता. फाशीच्या काही मिनिटे आधी ते लेनिनचे पुस्तक वाचत होते. त्यानंतर ते फाशीच्या कठड्याकडे गेले. छत्रपती शिवाजी महाराज, गुरूगोविंद सिंग, महाराणा प्रताप, नेपोलियन बोनापार्ट, मार्क्‍स हे त्यांचे प्रेरणास्रोत होते. तुरुंगात असताना त्यांनी काही पुस्तकेही लिहिली. त्यापैकी ‘आयडियल ऑफ सोशालिझम’, ‘दी डोअर टू डेथ’, ‘ऑटोबायोग्राफी’, ‘दी रेव्होल्युशनरी मूव्हमेंट ऑफ इंडिया विथ शॉर्ट बायोग्राफिकल स्केचेस ऑफ दि रेव्होल्युशनरीज’ ही महत्त्वाची पुस्तके. त्यांनी आपल्या लेखनातून विवेकवादी दृष्टिकोन दिला. स्वातंत्र्याची मधुर फळे शेतकरी, कामगार, महिला, उपेक्षित वर्गाच्याही वाट्याला यावीत अशी त्यांची भूमिका होती. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला. ते कानपूरला असताना भारतील काँग्रेस कमिटी सदस्य गणेश शंकर यांनी त्यांना पत्रकारितेचे धडे दिले. ‘प्रताप’ या वर्तमानपत्रात त्यांनी धडे गिरवले. येथे ते बलवंतसिंह नावाने लिहू लागले.

त्याचबरोबर क्रांतिकारकांसोबत कामही करत होते. पोलिसांचे भगतसिंगांकडे लक्ष जाऊ नये यासाठी गणेश शंकर यांनी त्यांना शादीपूर येथे मुख्याध्यापकाची नोकरी मिळवून दिली. दिवसभर भावी पिढी घडविणे आणि रात्री क्रांतिकारकांशी चर्चा करणे, लेख लिहून बुलेटिन प्रसिद्ध करून ते वाटणे, क्रांतीसाठी पैसे उभे करणे अशी कामे ते करत. वयाच्या १८ व्या वर्षी सुखदेव, भगवतीचरण, यशपाल आदी क्रांतिकारकांच्या मदतीने त्यांनी लाहोरमध्ये नवजवान सभेची स्थापना केली. शेतकरी, कामगार, महिला यांच्या शोषणाविरोधात आंदोलने उभी केली. दिल्लीतील ‘दैनिक अर्जुन’ वृत्तपत्रामध्ये ते सामाजिक प्रश्‍नांवर बलवंतसिंह या टोपणनावाने लेखन करू लागले. पत्रकारितेद्वारे त्यांनी जातिभेद, श्रेष्ठ-कनिष्ठ अशा भेदाभेदांवर, देवाच्या नावाखाली सुरू असलेल्या अंधश्रद्धेवर प्रहार केला. ‘चाँद’ या अंकात त्यांनी देशातील हुतात्म्यांवर भरभरून लिहिले. शेतकरी पक्षाच्या ‘कीर्ती’ वृत्तपत्रातूनही त्यांनी सामाजिक अंगाने लेखन केले. स्वातंत्र्यानंतर समताधिष्ठित समाज निर्माण व्हावा, याची पार्श्‍वभूमी त्यांनी पत्रकारितेतून तयार केली. देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही समताधिष्ठित समाजाचे भगतसिंग यांचे स्वप्न अपूर्णच राहिलेले आहे.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com