जेधे बहुजनहिताची तळमळ असलेले नेते

ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचे प्रतिपादन :- पुणे विद्यापीठात जेधे स्मृती व्याख्यान संपन्न
Keshavrao Jedhe hari narke public interest Jedhe Smriti Lecture at Pune University pune
Keshavrao Jedhe hari narke public interest Jedhe Smriti Lecture at Pune University punesakal

पुणे : दिवंगत केशवराव जेधे हे महात्मा जोतिराव फुले यांच्यानंतर बहुजनहिताची तळमळ असलेले पहिले बहुजन नेते आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांनी शनिवारी (ता.३०) येथे केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा इतिहास विभाग आणि देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘केशवराव जेधे आणि सत्यशोधक चळवळ या विषयावर आयोजित केशवराव जेधे स्मृती व्याख्यानात प्रा. नरके बोलत होते. सकाळचे संपादक सम्राट फडणीस हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर, प्रा. बाबासाहेब दुधभाते, जेधे फाउंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय जेधे, सचिव अनिल पवार, विश्‍वस्त राजलक्ष्मी जेधे आदी उपस्थित होते.

प्रा. नरके म्हणाले, ‘‘महात्मा जोतिराव फुले यांनी पुण्यात १८७३ मध्ये सत्यशोधक चळवळ सुरु केली. सामाजिक विषमता नष्ट करणे, हा ही चळवळ सुरु करण्यामागचा महात्मा फुले यांचा मुख्य हेतू होता.या चळवळीच्या माध्यमातून लोकांना शिक्षित करून सामाजिक विषमता नष्ट करण्याबाबत आवश्‍यक असलेल्या पंचसूत्रीचा अवलंब करण्याचे धोरण महात्मा फुले यांनी निश्‍चित केले होते. समाजातील सर्व घटकांमध्ये ज्ञानाची निर्मिती व कौशल्य संवर्धन करणे, जात निर्मूलन करणे, नैसर्गिक संशाधनांवर सर्वांचा अधिकार असायला हवा, प्रत्येक बाबींवर संवाद व्हावा आणि त्यातून चिकित्सा केली जावी, या पंचसुत्रीवर समाजात जनजागृती व्हावी, असे विचार फुले यांनी मांडले होते.’’

देशभक्त केशवराव जेधे यांनी लोकशिक्षण, लोकजागृती आणि लोकसंघटन करून सामाजिक चळवळीच्या आणि राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळीत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. जेधे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील मैत्री आणि जेधे व काकासाहेब गाडगीळ हे निवडणुकीत प्रतिस्पर्धी असूनही एकमेकांचे स्नेही होते.

आजच्या राजकीय वातावरणात असा स्नेहभाव दिसत नाही, असेही मत प्रा. नरके यांनी यावेळी व्यक्त केले. महाराष्ट्राच्या इमानाला आणि हितसंबंधांना जगेल तोच खरा मराठा ही केशवराव जेधे यांची भूमिका होती. त्यांची ही भूमिका आजही महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि समाजकारणाला दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सामाजिक माध्यमांद्वारे अनेकदा इतिहासाबाबतची चुकीची माहिती पसरविली जात आहे.

याला आळा घालण्यासाठी इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. राज्यात अनेक ब्राह्मणेतर चळवळींचा जन्म झाला. पण येथे बहुजनवाद हा शब्द जन्म घेऊ शकला नाही. अन्य राज्यात या शब्दाचा जन्म झाला. चळवळीचा जन्म झालेल्या महाराष्ट्रात हा शब्द का जन्मला नाही, याचा एकत्रित अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना व्यक्त केले.

फाउंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय जेधे म्हणाले, ‘‘ केशवराव जेधे हे महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे नायक आहेत. त्यांनी जनसेवा केली म्हणून आम्हीही त्यांचा वैचारिक वारसा या फाउंडेशनच्यावतीने चालवत आहोत. जेधे यांच्या जीवनकार्याचा शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे. भविष्यात त्यांच्या जीवनावर आधारित वेब सिरीज तयार करण्याचा मानस आहे.’’ विभागप्रमुख श्रद्धा कुंभोजकर यांनी प्रास्ताविक केले.कंभोजकर यांनी या व्याख्यानाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. यावेळी जेधे फाउंडेशनचे विश्‍वस्त ॲड. मारुती गोळे, महेश मालुसरे, मंदार मते, सुजित ताकवणे उपस्थित होते.

चळवळींचा अभ्यास करावा - फडणीस

राज्यातील पुरोगामी आणि कामगार चळवळी सध्या लुप्त होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या ३२ वर्षांच्या काळात कोणतीही चळवळ तग धरू शकलेली नाही. या चळवळी शिल्लक राहिल्या आहेत का? या चळवळींचे काय झाले, त्या लुप्त होण्याची कारणे काय? याबाबत विद्यापीठे आणि इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे अशी अपेक्षा सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांनी यावेळी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com