Blog : नारायण मेघाजी लोखंडे; एक समर्पित सत्यशोधक

भारतीय औद्योगीकरणाला नुकतीच कुठे सुरवात झाली होती, असा तो १८५०-५५ चा कालखंड होता. कापड उद्योग मुंबईत मोठ्या तेजीत येऊ लागला होता. ठिक - ठिकाणी कापड गिरण्या उभ्या राहत होत्या.
Narayan Meghaji Lokhande
Narayan Meghaji Lokhandesakal
Updated on

-राजाराम सूर्यवंशी, बदलापूर.

सत्यशोधक कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे हे महाराष्ट्राच्या सामाजिक व कामगार चळवळीच्या इतिहासातीलच नाही तर भारताच्या व्यापक पटलावरील एक मोठे व्यक्तिमत्त्व आहे, ही गोष्ट आता अख्ख्या देशाने मान्य केली आहे. भारताच्या ट्रेड युनियन चळवळीची मुहुर्तमेढ रोवता रोवता त्यांनी कामगार चळवळ

व सामाजिक सुधारणा चळवळ एकाच वेळी हातात हात घालून लढवता येतात याचे कम्युनिस्ट, समाजवादी व दलितचळवळीपूर्व एक उदाहरण भारताच्या सामाजिक व कामगार चळवळीच्या इतिहासात ; वासाहातिक कालखंडात घालुन असा एक नविन वस्तुपाठ घालून दिला आहे की ज्याची उजळणी अजून वरीलपैकी एकाही चळवळीला करता आलेली नाही, हे ऐतिहासिक सत्य आहे !

भारतीय औद्योगीकरणाला नुकतीच कुठे सुरवात झाली होती, असा तो १८५०-५५ चा कालखंड होता. कापड उद्योग मुंबईत मोठ्या तेजीत येऊ लागला होता. ठिक - ठिकाणी कापड गिरण्या उभ्या राहत होत्या. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून पोटापाण्यासाठी आलेले हजारो पारिव्राजक अतिशय तुटपुंज्या पगारात व अत्यंत निष्कृट दर्जाच्या कामाच्या जागेत रात्रंदिवस काम करीत होते व खुराड्यांसारख्या चाळींतून राहत होते.

कामाचे तास ठरलेले नव्हते. गिरणी व्यवस्थापण मनमानेल त्याप्रमाणे पगार कापत असत. कामगारांना साप्ताहिक सुटी नव्हती. अशा विपरित परिस्थितीत कष्ट करणाऱ्या कामगारांना त्यांच्या रास्त मागण्या मान्य करुन द्याव्यात व मानवी हक्काच्या सोयी सुविधा प्राप्त करुन द्याव्यात तसेच कामगारांवर होणाऱ्या विविध

अन्यायांना वाचा फोडावी व मिल मालकांना कामगार नियमाच्या कक्षेत आणावे यासाठी 'बॉम्बे मिल हॅण्डस् असोशिएशन 'नावाची भारतातील पहिली कामगार ट्रेड युनियन नारायण मेघाजी लोखंडेंनी स्थापण केली होती. या युनियन मार्फत लोखंडेंनी कामगारांचे विविध लढे लढवले व त्यांचे जीवन सुसहा करण्याचा प्रयत्न केला. अगदी फॅक्ट्री अॅक्ट कायदा लागू व्हावा म्हणून गिरणी मालकांबरोबर तत्कालिन राष्ट्रिय सभेच्या नेत्यांशी सुध्दा त्यांना भांडावे लागले होते.

कामगारांना त्यांना हक्काची आठवड्याची सुटी अर्थात साप्ताहिक सुटी मिळावी यासाठी त्यांनी जो ऐतिहासिक लढा दिला, त्याला कामगार चळवळीच्या इतिहासात तोड नाही. सतत दहा वर्ष लढा देऊन कामगारांना तिचा लाभ मिळवून दिला होता. पुढे ही सुटी इतर सर्वांना लागू झाली होती.

आज आपण सर्वचजण जी रविवारची सुटी उपभोगतो, तीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे हे होते ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे . त्याकाळी अस्पृश्यांप्रमाणे स्त्रियांनाही गिरणीतील विव्हिंग खात्यात काम करण्यास मनाई होती. कामगार कामगारांमध्येही अस्पृश्यता पाळली जात होती. यासाठी ही ना.मे.लोखंडेंनी कामगारांचे प्रबोधन करुन व मालकांशी संघर्ष करुन हा सामाजिक भेद मिटवुन विव्हिंग खात्यात अस्पृश्य व शुद्र स्त्रियांना काम करण्याची परवाणगी मिळवून दिली होती.

नारायण मेघाजी लोखंडे हे आजच्या नेत्यांसारखे पोटार्थी नेते नव्हते तर ते कामगारांच्या हितासाठी गिरणीगेटच्या आतही व गेटच्या बाहेरही दक्ष राहत असत. याचे सर्वात मोठे व ऐतिहासिक उदाहरण म्हणजे १८९२ साली मुंबईत उद्भवलेल्ला दंगा हे होय. हा दंगा शमवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य ऐकमेवाद्वितीय व महान असे आहे.

एकीकडे बाळ गंगाधाद टिळकांसारखी मंडळी या दंग्याला प्रोत्साहन देत होती, तर लोखंडे व त्यांचे सहकारी हा दंगा शमवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत होती. या दंग्यात होरपळलेल्या दोन्ही धर्माच्या सर्वसामान्य जनतेला धीर देण्यासाठी सर्व मोहल्ले, चाळी पिंजून फिरत होते. त्यांना कामावर जाण्यासाठी प्रोत्साहीत करीत होते.

दोन्ही समाजाच्या मनातील भिती काढून त्यांच्यात पुर्वीसारखाच बंधुभाव वृध्दींगत व्हावा यासाठी त्यांनी मुंबई प्रांताचे तत्कालिन कलैक्टर मि. व्हिसेंट यांच्यामदतीने व आपल्या सत्यशोधक सहकाऱ्यांच्या सहाय्याने राणीच्या बागेत एक ऐतिहासिक असा ऐकोपा मेळावा घडवून आणला होता. असा हिदु-मुस्लिम ऐकोपा मेळावा ज्याने जगाच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे. तसेच मोहल्ला कमिटी स्थापण करण्याची कल्पनाही त्यांचीच होती .

त्या मोहल्ला कमिट्यांने १८९२-९३ चा दंगा शांत करण्यात महत्वाची भुमिका निभावली होती. अशी ही मोहल्ला कमिटी पुढील प्रत्येक दंग्यांच्यावेळी रोड मोडल म्हणून वापरली गेली आहे. या मोहल्ला कमिट्यांचे श्रेयही नारायण मेघाजी लोखंडेंच्या नावावर जमा होते. तर सांगायचा मुद्दा हा की दंगा होऊ न देणाऱ्या कारगर कल्पनेचे जनकही लोखंडे हेच आहेत.

मोहल्ला कमिट्यांनी दंगा होत नाही किंवा त्यांची मुळं खोडून काढता येतात, या सुत्रांनुसार लोखंडे यांनी त्या काळी काम करुन एक आदर्श नियमाचा वस्तुपाठ घालून दिला होता. आजही त्यांनी घालून दिलेल्या आदर्श व उपायांवर वेळोवेळी उद्भवले दंगे शांत करण्यात नंतरच्या प्रशासनास मदत झाली आहे. ऐवढी काळाच्यापुढे पहाण्याची दूरदृष्टी ना.मे.लोखंडेंकडे होती.

बाळ गंगाधर टिळक व आगरकर हे हिंदुकट्टरपंथी व मुस्लिमांचे कट्टर विरोधक आहेत हे माहित असूनही, ते जेव्हा कोल्हापूच्या राजकिय खटल्यात अडकले होते, तेव्हा दहा हजारांचा जामिन म. फुलेंनी दिला होता. व या जामीनावर ते जेव्हा डोंगरीच्या तुरुंगातुन सुटून बाहेर आले तेव्हा एक आदर्श मानवधर्माच्या नात्याने त्यांचा जाहिर सत्कार भायखळ्याला लोखंडेंनी केला होता. कारण ना मे. लोखंडे हे माणसाचे विरोधक नव्हते.

वाईट, कालबाह्य व समाजहिताच्या आड येणाऱ्या विचारांचे विरोधक होते. वैचारिक शत्रुतही आपलाच आत्मा पाहणारी बुध्दांची करुणा त्यांच्या ठायी होती.

कामगारांसाठी फॅक्ट्री अॅक्ट चा जसा त्यांनी आग्रह धरला त्याचरमाणे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवता सोडावता डेक्कन अॅग्रीक्लचर रिलिफ अॅक्ट चा ही त्यांनी पाठपुरावा केला होता. यासोबत महिलांचे केशवपना विरोधात जसे त्यांनी सावित्रीबाई फुले व न्हावी बांधवांबरोबार सत्याग्रह केला होता त्याचप्रमाणे सरकारी नोकऱ्यांमध्ये (आबकारी खात्यात) शुद्रातिशुद्र जनतेला आरक्षण मिळावे यासाठी प्रशासनाविरोधात "दीनबंधु "तून आवाज उठवून चळवळही केल्या होत्या.

कामगार कष्करी व शेतकऱ्यांच्या चळवळी चालवता चालवता त्यांनी सत्यशोधकांचे प्रथम मुखपत्र "दीनबंधु "सुरु करुन या क्षेत्रातही उल्लेखनीय कामगीरी केली होती.

मुंबईतील ही कष्टकरी जनता कुठे रहाते काय खाते याचे सोयरसुतक मालकवर्गाला नव्हते. त्यांची दशा व व्यथा यांची जाणीव फक्त ना. मे. लोखंडेंना होती. म्हणून ना. मे. लोखंडे हे पोटच्या मुलासारखे या कामगार शेतकरी-कष्टकऱ्यांना जपत असत.

त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देत असत. त्यासाठी ते 'निती शिक्षा वर्गाच्या बरोबर " सुशिक्षण गृह ही चालवत असत त्यात स्वतःसह, कृष्णराव भालेकर, विठ्ठलराव वंडेकर, अय्यावारु, केळुस्कर गुरुजी, माधवराव रोकडे गुरुजी व म. फुले मुंबईत आल्यावर त्यांची ही व्याख्याने येथे ते आयोजित करत असत.

नारायण मेघाजी लोखंडे जे "दीनबंधु "नावाचे वृत्तपत्र मुंबईतून ९ मे १८८०पासून चालवत होते, त्याच्या मुखापृष्टावर लोखंडेंनी पुढिल आशयाचे घोषवाक्य मोठ्या जाड अक्षरात छापले होते journal devoted to the interest of working class'. व त्यानंतर संपादकीय पानावर पुढिल श्लोक छापला जात आसे- अज्ञानाने महिमाजी दीन आवघे सर्वापरि गांजले! [ विद्याधर्म तया न सेव्य म्हणुनि स्वार्थी बाहू माजले !! धुर्तहि मनी मत्सरास धरुनी केली अशी दुर्दशा !! जागोमी बहुमान योग्य करुनी विद्येप्रति व्हा वंशा !!

अशाप्रकारे कामगार कष्टकऱ्यांचे हित व बहुजन समाजासाठीचा शिक्षणाचा वसा नारायणा मेघाजी लोखंडेंनी प्रत्यक्ष तर उचलला होताच, त्याशिवाय दीनबंधु च्या माध्यमातूनही कसा लावून धरला होता, हे आपणास त्यांच्या वृत्तपत्राच्या मुखपृष्टावरुन व संपादकिय पानावरच्या मुद्रेवरुन लक्षात यायला वेळ लागत नाही.

जोतिराव फुले ज्या उपाधीने जगप्रसिध्द झाले ती महात्मा ही उपाधीसुध्दा नारायण मेघाजी लोखंडे यांनी आपल्या मुंबईच्या सत्यशोधक सहकाऱ्यांच्या मदतीने मुंबईत एका जाहीर कार्यक्रमात दिली होती. त्यामुळे आज जोतिराव फुलेंना जे आपण 'महात्मा "म्हणून ओळखतो ते केवळ ना, मे. लोखंडेंमुळे ! किती मोठी गुणग्राहता त्यांच्यामध्ये होती हे एकाच उदाहरणावरुन आपणास कळून येते.

वृत्तपत्र व्यवसायाशी लोखंडे हे अल्पावधीतच कामगारांच्या प्रश्नांइतकेच एकरूप झाले होते. त्या वासाहतिक कालखंडात भारतातील वेगावेगळ्या सामाजिक, व्यावसायिक व राजकिय गट आपापले हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठी वृत्तपत्र माध्यमांचा वापर करीत असत. तेव्हा वृत्तपत्रांच्या विरोधात जेव्हा गव्हर्नर जनरल लॉर्ड लिंटन याने दडपशाहीचे धोरण अंमलात आणले होते तेव्हा ना. मे. लोखंडे यांनी दीनबंधु तुन वृत्तपत्र स्वायतत्तेसाठी जोरदार आवाज उठवला होता.

आपल्यातला एक सामान्य माणूस सत्यशोधक विचारसरणीच्या बळावर किती मोठी मजल मारु शकतो याचे नारायण मेघाजी लोखंडे हे उत्तम उदाहरण आहे. मी त्यांचे विस्तृत असे ३५० पानी चरित्र लिहून " सत्यशोधक कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांचे चरित्र " या नावाने मावळाई प्रकाशनामार्फत २०१६साली प्रसिध्द केले आहे. जिज्ञासूंनी ते मुळात वाचण्यासारखे आहे.

आज नारायण मेघाजी लोखंडेंच्या १२६व्या स्मृतीदिनानिमित्ताने हि शब्दसुमनांची श्रध्दांजली वाहतांना मन खुप भरून आले आहे.

महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीच्या इतिहासात ना.मे.लोखंडे यांचे जीवन-कार्य हे एक सोनेरी पान आहे. त्यांना जाणून घेतल्याशिवाय म. फुलेंची चळवळ व मुंबईची जडण-घडण आपल्याला उमगणार नाही. इतका या चळवळीचा मुंबईचा व नारायण मेघाजी लोखंडे यांचा हाडा-मांसाचा संबंध आहे. शेवटी नारायण मेघाजी लोखंडेंना त्यांच्या १२३ व्या स्मृतिप्रित्यर्थ विनम्र अभिवादन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.