Blog : आज माझा पहिला दिवस आहे, खूप त्रास होतोय पण..

"मासिक पाळी हे अपंगत्व नाही. त्यामुळे त्यासाठी सुटी देण्याची आवश्यकता नाही." स्मृती इराणी यांचे विधान
periods
periodsgoogle

"मॅडम, आज माझा पहिलाच दिवस आहे, मला बसायलाही त्रास होतोय पण काम आहे. त्यात आज मिनलची सुटी आहे त्यामुळे मला जास्त काम आहे" जेवणाच्या टेबलावर बसल्यावर सानिका मला सांगत होती. आज तिचा मार्गशीर्षाचा उपवास होता आणि त्यात तिच्या पाळीचा पहिला दिवस... त्यातच तिला तिच्या सरांनी एक बातमी करायला सांगितली..

ती बातमी होती स्मृती इराणी यांनी मासिक पाळी या विषयाची... "मासिक पाळी हे अपंगत्व नाही. त्यामुळे त्यासाठी सुटी देण्याची आवश्यकता नाही." असं विधान इराणी यांनी केलं होतं.. हे सगळं माझ्यासमोर घडत असतंच माझा एक पुरुष सहकारी मला म्हणाला काय ग तुझं काय मत आहे, सुटी द्यावी की नाही..?

मला त्यावेळी असं काळं किंवा पांढरं उत्तर द्यायची इच्छा झाली नाही. मला त्याला विचारायची इच्छा झाली की, तू सुटी मिळावी की नाही असा प्रश्न करण्यापेक्षा असं का नाही विचारलं की खरंच गरज आहे का गं सुटीची? तुम्हाला नेमका काय त्रास होतो? आणि इतका त्रास होतो का, की सुटी घ्यावी लागावी?

मला खरी मेख इथेच वाटते.. उत्तर देण्याची घाई करण्यापेक्षा आता बायकांचे प्रश्न समजून घ्यायची गरज आहे. मासिक पाळीत महिलांना त्रास होतो म्हणजे त्यांचे पाय दुखतात, त्यांचे पोट दुखते, थकवा येतो, अति रक्तस्त्राव होतो ही सर्वसामान्य कारणं आपल्याला माहिती आहेत. पण त्याहीपलीकडे जात त्यांच्यात हार्मोनल चेंजेस होत असतात.

त्यामुळे त्यांची खूप चिडचिड होते. नैराश्य येत असतं, कामात लक्ष केंद्रित करता येत नाही, कधी कधी आत्महत्येसारखे विचार देखील येतात. काही महिलांना स्वतःवर नियंत्रण ठेवणे अवघड होते. मासिक पाळीदरम्यान एका महिलेने लहान मुलांना विहिरीत फेकले होते हा प्रकार काहीच दिवसांपूर्वी वाचनात आला.

आता प्रश्न आला की मग या महिलांना सुटी द्यायला हवी का? तेही पगारी? पाश्चात्य देशात तर देतात. मग आपणही द्यायलाच हवी. कोणतीही गोष्ट पाश्चात्य देशांनी केली म्हणून आपणही करायला हवी याही पेक्षा आपल्याकडे त्याची तितकी संवेदनशीलता, त्याचा अभ्यास, त्यावर मोकळेपणाने चर्चा करणे या गोष्टींवर आधी काम व्हायला हवं.

पाश्चात्य देशात हा निर्णय त्या समजुतीतून झालाय. संवेदनशीलतेतून झालाय. अभ्यासातून झालाय. कोणीतरी काहीतरी म्हणतोय, कोणीतरी विरोध करतोय म्हणून झाला नाही. भारतात जोपर्यंत संवेदनशीलता निर्माण होणार नाही, यावर अभ्यास होणार नाही तोवर हा प्रश्न काळे आणि पांढरे या दोन भूमिकेतच राहणार आहे.

भारतात काही कंपन्या आहेत ज्यांच्या पदाधिकाऱ्यांना सुट्ट्यांचा निर्णय घेणे गरजेचे वाटले. नियम नसतानाही सुट्या देण्याचा निर्णय घ्यावासा वाटला यातच सगळं आलं.

पण स्मृती इराणी म्हणाल्या, हे अपंगत्व नाही. मग काय आहे? त्रास तर होतोय. इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांना त्रास होतोय, त्याचे गंभीर परिणाम देखील समोर येत आहेत. म्हणजे नक्कीच काहीतरी होतंय.

काही दिवसांसाठी होणारा शारीरिक मानसिक त्रास हा तुमच्या लेखी अपंगत्व नाहीये. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर जर महिलांना त्रास होतोय तर याला काहीतरी नाव द्यावं लागेलच नाहीतर काळ तुमचं बौद्धिक अपंगत्व सिद्ध करेलच..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com