
मध्ययुगात वसाहतवादाची सुरुवात झाली तेव्हा पोर्तुगीज सर्वप्रथम भारताच्या किनाऱ्यावर आले.
त्यानंतर आलेल्या डच, इंग्रज आणि फ्रेंच लोकांनी पण भारतात ठिकठिकाणी प्रदेश जिंकले. मात्र या देशांनी इथली आपली चंबुगबाळे एकापाठोपाठ उचलली.
सर्वात आधी आलेल्या पोर्तुगीजांनी सर्वात शेवटी म्हणजे साडेचारशे वर्षांनंतर १९६१ साली येथून आपला गाशा गुंडाळला.
भारतीय उपखंडाच्या अगदी चिमुकल्या का होईना आणि एकमेकांपासून काही शेकडे कोस दूर असलेल्या या चार प्रदेशांवर तब्बल साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांनी आपली सत्ता गाजवली.
पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को दा गामा आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर. कालिकत येथे १४९८ ला पोहोचला.
त्यानंतर युरोपमधील अनेक राष्ट्रांतील साहसी दर्यावर्दी आणि व्यापारी कंपन्यांची गलबते भारताच्या पश्चिम, दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यांवर लागली.