मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोकण शिक्षक मतदार संघात व शिंदे गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे 20 हजार 683 इतक्या मताधिक्याने निवडून आले.
Kokan MLC Election Result: कोकणात महाविकास आघाडीचे गणित चुकले की, शिक्षक मतदारांची मानसिकता बदलली?
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोकण शिक्षक मतदार संघात व शिंदे गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे 20 हजार 683 इतक्या मताधिक्याने निवडून आले. आणि महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. या मतदार संघात आतापर्यंत कधी नव्हे असे ९१.२ टक्के विक्रमी मतदान झाले होते, त्याच दिवशी शिक्षकांनी म्हात्रे यांच्या विजयाची खात्री व्यक्त केली होती.
शिक्षकाच्या अनेक ग्रूपवर तर म्हात्रे हे १८ हजारांहून अधिक फरकाने विजयी झाल्याचे ३१ जानेवारी रोजीच जाहीर केले होते. शिवाय माध्यमांनी घ्यावी तसे सर्व्हे जाहीर केल्याने या निवडणुकीत सहभागी झालेल्या प्रचारक शिक्षक मतदारांना विजयाची कल्पना अगोदरच होती. लोकसभा, विधानसभा निवडणूक निकालापूर्वी भाजपच्या अनेक नेत्यांकडून ज्याप्रकारे अगोदरच निकाल आणि किती जागा येतील जाहीर केले जायचे अगदी तसाच हा प्रकार यावेळी कोकणातील म्हात्रे समर्थक शिक्षक संघटनांमध्ये दिसून आला.
या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या एक दिवस अगोदर भाजपने म्हात्रे यांना आयात करून उमेदवारी दिली. त्यापूर्वी ते शिंदे गटाकडूनच लढणार हे निश्चित होते. मात्र भाजपमध्ये प्रवेश झाल्याने शिंदे गटाऐवजी म्हात्रे भाजपचे झाले. अन्यथा भाजपमध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या पुतण्याचे नाव निश्चित होते. म्हात्रे भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना निवडून आणण्यासाठी केवळ भाजपच नाही, तर शिंदे गटाच्या सर्वच समर्थक पक्ष संघटना मैदानात उतरल्या.
विशेष म्हणजे पहिल्यांदाच तब्बल दोन डझनहून अधिक स्थानिक आमदार अर्धा डझन मंत्री नगरसेवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांची सुमारे दोन हजाराहून अधिक जणांची फौज ठाण्यापासून सिंधुदुर्गच्या कानाकोपऱ्यामध्ये कार्यरत करण्यात आली होती. केवळ विजयाचे गणित डोक्यात ठेवून भाजपने ही निवडणूक लढवली. खरे तर हा विजय भाजपचा म्हणता येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही निवडणूक खूप मनावर घेतली होती, त्यामुळे ठाण्यापासून ते सिंधुदुर्ग त्या कोपऱ्यापर्यंत भाजप आणि शिंदे गटांच्या अनेक नेत्यांनी वैयक्तिक लक्ष घालून सभा आयोजित केल्या होत्या. शिक्षकांना काही करून मतदानासाठी घेऊन येणे आणि त्यांना आपल्या बाजूने उभे करणे यासाठीचा एक मोठा नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला होता. त्यामुळेच कोकण शिक्षक मतदार संघात पहिल्यांदाच 91.2 टक्के मतदान झाले.
भाजप शिक्षक आघाडी, शिक्षण क्रांती संघटना आणि शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या संघटनांची मोठी ताकद म्हात्रे यांच्या पाठी उभी राहिली. सुरुवातीला तर काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना जबरदस्तीने पाठिंबा देण्यासाठी भाग पाडल्याचे बोलले गेले. त्याचा मोठा लाभ म्हात्रेंना यावेळी मिळाला. परंतु ज्या मताधिक्याने ते निवडून आलेले आहेत, त्यावरून या निवडणुकीत सगळेच काही अलबेल होते असे म्हणता येणार नाही. ठाणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शिक्षकांनी अमिषाना बळी पडणाऱ्या मतदारांप्रमाणे आपले इमान राखले नसल्याच्या चर्चाही यादरम्यान जोरात सुरू होत्या. असंख्य शिक्षक एका बाजूने 5 हजार तर दुसऱ्या बाजूने तीन हजाराच्या इतक्या शुल्लक रकमांसाठी विकले गेल्याच्या चर्चाही या निवडणुकीत पाहायला मिळाल्या. त्यात दारू पार्ट्या, वेगवेगळ्या फार्महाऊसवरील पार्ट्या ह्या वेगळ्याच होत्या. त्यामुळे मतदान कसे वाढले याचा अंदाज करायला हरकत नाही.
शेकापचे बाळाराम पाटील हे इतक्या मोठ्या मताने पराभूत होतील असा अंदाज क्वचितच होता. परंतु मागील सहा वर्षाच्या काळात त्यांना अनेक संघटनांची नाराजी त्यांना भोवली असावी असा अंदाज व्यक्त केला जातो. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. बाळाराम पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असले तरी महाविकास आघाडीच्या अनेक पक्षांनी त्यांना फारशी मदत केली नाही. काँग्रेसचा एकही नेता मोठ्या ताकतीनिशी प्रचारात उतरला नाही.
राष्ट्रवादी, शेकापचे अनेक नेतेही अखेरच्या टप्प्यात गायब होते. पनवेलच्या सभेचा अपवाद वगळता बाळाराम पाटील यांच्यासाठी फार मोठ्या सभा कोकण शिक्षक मतदार संघात होऊ शकल्या नाहीत. त्यातही केवळ राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठबळ दिले होते. परंतु त्याचा फार मोठा लाभ पाटील यांना होऊ शकला नाही. आपल्या प्रचारसभा कमी पडतात हे पाटलांना अंदाज होता. म्हणून त्यांनी प्रत्यक्षात शाळांमध्ये जाऊन प्रचार केला होता. ही बाबही नाकारता येत नाही.
कोकणात भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला असला तरी हा विजय खऱ्या अर्थाने भाजप उमेदवाराचा म्हणता येणार नाही. कारण भाजपला ऐनवेळी हा उमेदवार आयात करावा लागला होता. भाजपाच्या चुकीमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेली आणि मागील 40 वर्षापासून विधान परिषदेला अनेक नामवंत शिक्षकांची फौज निर्माण करून देणारी शिक्षक परिषदेची परंपरा यावेळी खंडित झाली. कोकणात याच परिषदेच्या उमेदवाराला माघार घ्यावी लागली आणि नागपूर मध्ये दिलेली उमेदवारी भाजपाला टिकून ठेवता आली नाही. कोकणात यश आले असले तरी ते यश आयात केलेल्या उमेदवाराचे आहे. आणि नागपूर मधील आपला हक्काचा उमेदवार भाजपाने गमावला.