उन्हाळा आला... कसे राहाल कूल...?

stay cool in summer season
stay cool in summer season

    उन्हाळ्याच्या झळा दिवसेंदिवस वाढत जातील, अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत. शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जाण्याचा प्रसंग आला तर मार्चच्या प्रारंभीच थकल्यासारखे वाटू लागले आहे. आपला फिटनेस कमी पडतोय, अशी शंका तुम्हाला येईल. ते शंभर टक्के बरोबर म्हणता येईल असे नाही. कारण शहरातील वाढते प्रदूषण तुम्हाला अधिक थकवा देणारे आहे. उन्हाच्या झळा आणि त्यात प्रदूषणाची भर अशा दुहेरी कात्रीत आपण सापडलो तर थकवा निश्‍चितच जाणवतो. तुम्ही गावातून शहरात येत असाल तर तापमानाचा फरक तुम्हाला पटकन जाणवतही असेल. 

वाढत्या उन्हात तुम्ही तुमच्या शरीराचे संरक्षण केले नाही तर होणारी हानी अटळ असेल. शरीरातील पाणी, क्षार कमी होण्यापासून ते डोळे, मेंदू इथंपर्यंत त्याचा त्रास जाणवू शकतो. या सगळ्या बदलांकडे तुम्ही सजगपणे पाहिले आणि त्यानुसार तुमचे राहणीमान विशेषतः आहार ठेवला तर वाढता उन्हाळा किंवा प्रदूषण यांचे विपरित परिणाम होण्यापासून तुम्ही चार हात दूर राहू शकता. गोष्टी सोप्या असतात; फक्त त्या काळजीपूर्वक आणि सातत्यपूर्ण केल्यास त्याचे आपसूक फायदे मिळतात. आहारातील बदल तुमच्या शरीर यंत्रणेवर अनावश्‍यक ताण येऊ देत नाही. भरपूर पाणी पिण्यामुळे तुमच्या शरीराचे तपमान वाजवीपेक्षा अधिक वाढू देत नाही. तुम्हाला उष्णतेचा किंवा पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही अधिक सजग राहिले पाहिजे, हे निश्‍चित. हलका व्यायाम, व्यायामापूर्वी आणि नंतर पुरेसे पाणी आणि त्यानंतर रात्री झोपेपर्यंत तहान या गोष्टीकडे दुर्लक्ष न करणे अधिक हिताचे ठरते. 

आहाराचे म्हणाल तर हलका आहार घेणे सर्वाधिक चांगले. आपण हिवाळ्यानंतर कमी उष्मांक असलेल्या पदार्थांकडे वळतो; पण आहारातील प्रथिने कमी होणार नाहीत, याचीही दक्षता घेतली पाहिजे. दोन्ही वेळ जेवण घेतले पाहिजे. जेवण टाळू नका. उन्हाळ्याचा काळ म्हणजे पर्यटनाचा काळ असतो. अनेकजण मुलांच्या सुट्ट्यांमुळे सहलीवर जातात. येथे प्रमाणापेक्षा अधिक जड खाणे होते. तुलनेत पाणी कमी जाते. अनेकदा उघड्यावरील पदार्थांवर ताव मारला जातो. तो निश्‍चितच तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो.

उन्हाळ्याचा त्रास टाळण्यासाठी

  •   भरपूर पाणी प्या. कोणताही पदार्थ खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा.
  •   शिळे अन्न खाऊ नका. शिजवून फ्रीजमध्ये ठेवलेले तर टाळाच.
  •   काकडी, बीटचे सॅलेड आणि फळे व पालेभाज्यांचा आहारात अधिक  वापर करा.
  •   कलिंगड, द्राक्षे, टरबूज ही उपयुक्त ठरणारी फळे आहेत. 
  •   पॅकबंद अन्नपदार्थ, रासायनिक प्रक्रिया केलेली थंड पेये टाळावीत.
  •   नारळाचे पाणी, लिंबाचे सरबत गरजेनुसार आवर्जून घ्यावे.
  •   ते शक्‍य नसेल तर पाण्यात चिमूटभर साखर आणि मीठ टाकून प्यावे.
  •   ताक, दही आणि दुधाचे आहारातील प्रमाण वाढवा.
  •   तुम्ही उन्हात बाहेर पडण्यापूर्वी ताक पिल्यास ते फायदेशीर ठरते.
  •   मांसाहार प्रमाणात व ताजाच घ्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com