होऊ प्रवासी... 

witing on editor anant dikshit
witing on editor anant dikshit

गेल्या दोन-तीन दिवसांत फेसबुकवर प्रत्येक तीन ते चार पोस्टनंतर एक पोस्ट "सकाळ'चे माजी संपादक अनंत दीक्षित यांच्याविषयी लिहिली गेली. व्हॉट्‌सऍपवर अनेक ग्रुपवरून त्यांच्याविषयी उत्स्फूर्तपणे अगदी आतून लिहिलेले संदेश फिरत होते. प्रत्यक्ष मला जे जे भेटले ते आणि त्यांच्यासोबत.. त्यांच्या हाताखाली काम केलेले अनेक सहकारी त्यांच्याविषयी भरभरून बोलले. बोलताना बहुतेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्याचे पाहिले. अगदी ऑफिसबॉय, ड्रायव्हर यांनीही त्यांच्या मनात जपलेली आठवण आवर्जून सांगितली. अनेकांनी त्यांच्याविषयी बोलताना, लिहिताना भावनांना वाट मोकळी करून दिली. सर्वार्थाने चांगल्या, माणसं जोडणाऱ्या, माणसं उभी करणाऱ्या, संवादी माणसाविषयी लोकं भरभरून बोलत आहेत, लिहित आहेत हे अलीकडच्या काळातील एक दुर्मिळ उदाहरण. आयुष्यभर माणसांना प्राधान्य देत सर जगले म्हणूनच या भावना अगदी अकृत्रिमपणे व्यक्त होत आहेत....यापुढील काळात असं भावनांचं व्यक्त होणं कोणाच्या वाट्याला येईल का? हा प्रश्‍न मला सतत उत्तर विचारतो आहे आणि मी त्याचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या तरी त्याचे उत्तर मला मिळालेले नाही; मात्र माझा शोध सुरू आहे. 

किती व्यवहारी जगतो आहोत आपण सगळेच....या विचाराने माझ्या मनात काहूर माजलंय. आपल्या जगण्यामध्ये कृत्रिमता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मैत्री, प्रेम, जिव्हाळा, सहचर्य, सहकार्य या सगळ्यांमध्ये जो ओलावा असायला हवा तो हळूहळू कमी होताना दिसतो आहे. अहंकाराचा राक्षस दिवसेंदिवस मोठाच होताना दिसतो आहे. "मी'च का? या प्रश्‍नाचे वर्तुळ अधिकच व्यापक होऊ लागले आहे. या वर्तुळाच्या कक्षेत येणाऱ्यांनाही त्याची लागण होते आणि मग ते वर्तुळ आणखी मोठे होताना दिसत आहे. खरे तर या वर्तुळाच्या परिघात आपण कसे जाणार नाही यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे; मात्र गरजेपोटी म्हणा...नाईलाजाने म्हणा...ठरवून म्हणा...बहुतेकांची पावले या वर्तुळाकडेच ओढली जातानाच दिसत आहेत. परिणामी जिव्हाळा, प्रेम, माया, वात्सल्य यामधील कोरडेपणा वाढू लागल्याचे दिसत आहे. प्रेमाने, मायेने नाती जपण्याऐवजी एक व्यवहार म्हणून नाती जपण्याकडे कल वाढत आहे. कोणत्याही बंधनाशिवाय जगण्याचे सूत्र जास्तीत जास्त व्यापक होताना दिसत आहे. बंधनांमध्येही एक मौज असते ती त्या बंधनांत राहूनच घ्यावयाची असते, हेही कळणे हळूहळू धूसर होऊ लागले आहे. नात्यांच्या परिभाषा बदलताना आपल्याला दिसत आहेत. त्यांना नख लागेल असे वर्तनही झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. माध्यमांतून ते आपल्या अंगावर येत आहेत. आपण कोरडे हळहळण्यापलीकडे काहीही करताना दिसत नाही...व्हॉट्‌सऍपवर आलेले मेसेज पुढे फॉरवर्ड करण्याएवढीच ऍटॅचमेंट आपली राहिलेली दिसते. खुलेपणाने व्यक्त होण्यालाही आपण बिचकताना दिसतोय आणि कशाला व्यक्त व्हायचे असे म्हणत आपली निष्क्रियता आपणच कुरवाळताना दिसत आहे. 

असा नकारात्मकतेचा मारा सर्व बाजूंनी होत असताना जेव्हा एखाद्याबद्दल भरभरून लिहिलं जातं...बोललं जातं... तेव्हा आशेचा एक दीप आपोआप प्रज्वलित होतो. अशा दीपांमुळेच तर आपला भवताल अजून तरी एकमेकांशी कनेक्‍टेड आहे. आपणही असे दीप मनामनांत उजळण्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे. कृत्रिमतेच्या वर्तुळाचा भाग होण्यापेक्षा मिणमिणत्या पणत्यांच्या ज्योती व्हायला काय हरकत आहे. एक एक पणती तेवत जाईल आणि अंधारातून प्रकाशरेषा उमटत जाईल. या रेषेवरूनच आपण प्रवासासाठी पावले टाकत राहू. हळूहळू अनेक पावले या वाटेवर येण्याचा प्रयत्न करतील, अशी आशा धरायला काय हरकत आहे. जे गेलेत ते आपल्यासाठी वाट रेखून गेलेत...ते परतून येणार नाहीत हे नक्की...मग त्या रेखलेल्या वाटेवरून आपणही जिव्हाळा वाटण्याच्या प्रवासाला निघायला काय हरकत आहे? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com