मराठी राजभाषा, मराठी गौरव दिनाची गल्लत नको

मराठी राजभाषा, मराठी गौरव दिनाची गल्लत नको

ज्ञानपीठप्राप्त कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस राज्यभर उत्साहात झाला. मराठी भाषाप्रेमींचा उत्साह तर सर्व प्रकारच्या माध्यमातून एक दिवस का होईना ओसांडून वाहिला. शाळा, महाविद्यालय आणि मराठीचा कैवार घेतलेल्यांपासून ते अध्यापक संघ ते काही वृत्तपत्रे, सांगली-कोल्हापूर आकाशवाणीही ‘राजभाषा दिन’ म्हणत होते. शासनाचा प्रसिद्धी विभागही गेल्यावर्षीपर्यंत ‘मराठी राजभाषा दिन’ च्या जाहिराती प्रसिद्ध करीत होता. पाठपुराव्यानंतर यंदा चूक सुधारली. मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन यातील फरक, तो दिवस साजरा करण्याचे प्रयोजन माहिती व्हावं म्हणून हा खटाटोप. 

स्वातंत्र्योत्तर कालात भाषावार प्रांतनिर्मितीपूर्वी मध्यप्रदेशने भाषाविषयक धोरणात आघाडी घेतली. या राज्यानं राजभाषा म्हणून हिंदीबरोबर मराठीचाही सन्मान केला. १९५३ पासून पुढे तीन वर्षे वा अधिक काळ मराठी ही राजभाषा म्हणून मध्यप्रदेशात प्रचलित होती. राज्यघटनेत अनुच्छेद ३४७ नुसार राष्ट्रपतींना लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहे. 

एक मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. ‘राजभाषा मराठी’चा शासन व्यवहारात वापर करण्याचे धोरण राबवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागामार्फत घेतलेल्या ५ जुलै १९६० च्या निर्णयानुसार भाषा संचालनालय स्थापन झाले. ‘महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४’ नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी असेल असे घोषित झाले. तशी ती १ मे १९६० पासून होतीच. त्यानुसार सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५ राजपत्रात घोषित करण्यात आला. १ मे १९६६ पासून राज्यातील सर्व शासकीय कामकाजात मराठी राजभाषा अधिनियम लागू करण्यात आला. अमराठी अधिकाऱ्यांसाठी ‘राजभाषा परिचय’ पुस्तकही प्रकाशित करण्यात आले.

१ मे १९६० रोजी मराठी भाषकांचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यामुळे तो दिवस ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करणे अपेक्षित होते. काही काळ तो होताही. परंतु १ मे महाराष्ट्राचा स्थापना दिवस. तो कामगार दिनही असल्याने ‘मराठी राजभाषा दिन’ विस्मृतीत गेला. शासन स्तरावरही दुर्लक्ष झाले. सामान्य प्रशासन विभागाने १० एप्रिल १९९७ रोजी खास शासन
निर्णय करून ‘मराठी राजभाषा दिन’ ची आठवण करून दिली.

त्यात सुरवातीस म्हटले आहे, की दिनांक १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. त्या दिवसापासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. म्हणून १ मे हा दिवस ‘राजभाषा मराठी दिन’ म्हणून करावा असा निर्णय शासनाने घेतला आहे. म्हणून २८ एप्रिल ते ३० एप्रिल १९९७ या तीन दिवशी विविध उपक्रम आयोजित करून १ मे रोजी समारंभपूर्वक सांगता सोहळा करावा’. १ मे दिवशी ‘मराठी राजभाषा दिवस करण्याचा हा निर्णय.

पुढे कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान स्मरून त्यांना अभिवादन म्हणून काही प्रस्ताव पुढे आले. २१ जानेवारी २०१३ रोजी शासन निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा २७ फ्रेबुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून करण्याचे घोषित करण्यात आले. तसा निर्णय मराठी भाषा विभागाच्या वतीनेही तो दिवस समारंभपूर्वक करण्याचे परीपत्रक काढले गेले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० मध्ये ‘कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून करण्याचे नमूद केले आहे.

राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन्ही दिवस वेगळे असताना ते एकच समजण्याची चूक कथित नामवंत करतात. निदान २०१८ मधील १ मे हा दिवस तरी ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून  अभिमानानं साजरा केला जावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com