हे 'युद्ध' जिंकूच ; ससूनमधील बायोलॉजिकल सोल्जरना विश्‍वास

ससून रुग्णालयातील हेच ते बायोलॉजिकल सोल्जर.
ससून रुग्णालयातील हेच ते बायोलॉजिकल सोल्जर.

पुणे - कोरोनापासून स्वत:चा बचाव... कुटुंबाची काळजी आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी लढणाऱ्या ‘त्या’ म्हणजे ‘बायोलॉजिकल सोल्जर’ आहेत. अशा १८ सोल्जर दिवसरात्र ससून रुग्णालयात राहून कोरोनाबाधितांची सेवा करीत आहेत. सध्या त्या ‘रिअल हिरोज’ ठरल्या आहेत.

घरात दहा आणि तेरा वर्षांची दोन लहान मुले, ७५ वर्षांची सासू आणि पती. एकीकडे त्यांची चिंता. तर दुसरीकडे कोरोनाबाधितांच्या वॉर्डात ड्यूटी. उपचारासाठी त्यांच्याशी येणारा सततचा संपर्क. ससून प्रशासनाकडून सुरक्षिततेसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली असली, तरीदेखील मनात कायम काळजी असते, असे परिचारिका शीतल चव्हाण सांगत होत्या. गेल्या सात दिवसांपासून घरापासून आम्ही दूर आहोत. अशा अठरा परिचारिका आहेत. त्यांची राहण्याची, खाण्याची सर्व सोय ससूनकडून करण्यात आली आहे. या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आम्ही घरी जात नाही. ड्यूटी संपल्यानंतर रूमवर गेल्यानंतरच घरच्यांशी संपर्क होतो, अशा पद्धतीने आमचे दिवसरात्र काम सुरू आहे. संसर्ग झालेल्या रुग्णाचे डाएट, त्यांना द्यावे लागणारे औषधे आणि ऑक्‍सिजन आदी कामे करावी लागतात. संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाकडून आम्हाला पीपीई किट (पर्सनल प्रोटेक्‍शन किट) देण्यात आले आहे.

परंतु ड्यूटी संपल्यानंतर पूर्ण सॅनिटाइज होऊन मगच रूमवर जावे लागते. आम्हालादेखील संसर्ग झाला नसल्याची खात्री केली जाते. आम्ही काळजी घेतली नाही, तर आमच्यामुळे कुटुंबातील सदस्य आणि इतर कर्मचारी अडचणीत येऊ शकतात, याची जाणीव प्रशासनाला आहे, तशी आम्हालादेखील आहे. आज ही परिस्थिती असली, तरी आम्ही कोरोनाविरोधातील ‘युद्ध जिंकू’. कारण आम्ही आहोत ‘बायोलॉजिकल सोल्जर’ असा विश्‍वासही शीतल यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

साथरोगाच्या पातळ्यांवर एक नजर
कोणत्याही साथीचा उद्रेकाच्या सर्वसाधारण चार पातळ्या असतात. त्यात पहिली पातळी म्हणजे साथीचा उद्रेक झालेल्या एखाद्या भागातून तो रोगजंतू एका माणसाच्या माध्यमातून राज्यात प्रवेश येतो. त्याची बाधा इतरांना झालेली नसते. त्यामुळे ती साथरोगाची पहिली पातळी मानली जाते. दुसऱ्या पातळीत रोगजंतूंचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांमध्ये फैलाव होण्यास सुरुवात होते. महाराष्ट्र आणि देशही साथरोगाच्या दुसऱ्या पातळीवर असल्याचे सांगितले जाते.

तिसऱ्या पातळीत या रोगजंतूंचा संसर्ग समाजात वेगाने पसरला जातो. त्या वेळी त्या साथीचा उद्रेक होतो. परदेशात न गेलेल्या किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्क नसतानाही रोगजंतूंचा संसर्ग या पातळीत होतो. ही पातळी जाहीर करण्याचे निकष निश्‍चित केले आहे. देशातील भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआर) या पातळ्यांचे विश्‍लेषण करते. चौथ्या पातळीमध्ये रोगजंतूंचा संसर्ग नेमका कोणापासून झाला हे समजण्याच्या पलीकडे स्थिती जाते. त्यात मृत्यूंचे प्रमाण वाढते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com