आता तरी जागे व्हा... कोरोनाचे भयानक रूप समजून घ्या 

dharmendra patil
dharmendra patil

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांनी 3 हजार 798 चा आकडा गाठला आहे. कोरोनाचा उद्रेक, रूप किती भयानक आहे हे आतातरी जळगावकरांनी समजून घ्यायला हवं. जळगावकरांनो आतातरी जागे व्हा. गेल्या तिन- साडेतीन महिन्यांपासून असलेले लॉकडाऊन आपण किती स्वयंशिस्तीने पाळले; याचा विचार करा. जर पाळले असते तर आज इतकी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली नसती. असाच जर आपला मुक्तसंचार राहिला तर येत्या काही दिवसात आपण पाच हजाराचा आकडा नक्की पार करु, की जे भूषणावह नाही. 
कोरोनाला रोखणे, ही साखळी तोडणे हे समाजातील प्रत्येक घटकाच्या हातात आहे. मला काही होत नाही, मी बाहेर फिरु शकतो, किती लोक विनाकारण फिरत आहेत असे कारण नसतांना बाहेर येऊन म्हणणाऱ्यांची संख्या देखील खूप आहे. त्यामुळे कोरोना विरुध्दच्या या लढ्यात नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. "मी विनाकारण बाहेर पडणार नाही आणि कुटुंबातील सदस्याला देखील बाहेर पडू देणार नाही.' अशी प्रतिज्ञा घेण्याची वेळ आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रतिबंधात्मक उपाय आणि येणाऱ्या रुग्णांवर उपचार ह्या दोन पद्धतीने आपण लढत आहोत. परंतु प्रतिबंधात्मक उपाय कमी पडत आहेत, असे दिसून येत आहे. आत्ताच्या घडीला किमान दोन आठवडा स्वयंस्फुर्त जनताकर्फ्युची अत्यंत गरज आहे. यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी, स्वयंसेवी संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे. दोन आठवडाच्या जनताकर्फ्यु दरम्यान नागरिकांना लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि तरुण स्वयंसेवकांनी मदतीचा हात देणे गरजेचे आहे. येणाऱ्या दिवसात या जनताकर्फ्युचे फायदे आपणास नक्कीच मिळतील. कोरोना रुग्ण वाढीचा दर निश्‍चितच कमी झालेला असेल. 

ग्रामीण भागात जाणे रोखणेच ठरेल महत्त्वाचे 
कोरोना विषाणू जळगाव शहरापुरता मर्यादित राहिला नाही. अगदी खेडोपाडी देखील या विषाणूने पाय पसरविले आहेत. खेड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होणे ही आपणा सर्वांसाठी अत्यंत धोक्‍याची घंटा आहे. कारण याच खेड्यात आपला गोरगरीब वर्ग, पोशिंदा, कष्टकरी शेतकरी राहतो. त्याची काळजी घेणं आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपला पोशिंदा शेतकरी धोक्‍यात म्हणजे आपणही धोक्‍यात हे समजून घेणे गरजेचे आहे. अन्यथा हातची वेळ निघून जाईल. त्यासाठी दोन प्रकारे आपण कार्य करू शकतो. ग्रामपंचायत स्तरावर आणि दुसरे नगरपालिका, महापालिका स्तरावर. ग्रामपंचायत स्तरावर, ग्रामीण भागातून शहरात कामधंद्यासाठी जाणाऱ्यांची यादी बनवून, दर आठवड्यात त्यांची आरोग्य तपासणी करू शकतो. असे केल्याने शहरातून गावात चुकून येणारे कोरोनाचे संक्रमण आपण वेळीच जाणून घेऊ शकतो आणि संशयित रुग्णाची योग्य त्या दिशेने तपासणी करून गाव सुरक्षित ठेऊ शकतो. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सेवाकार्य करणे गरजेचे आहे. 

विचारपुर्वक निर्णय हवा 
महापालिका, नगरपालिका स्तरावर शहरात असणाऱ्या भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, रेशन दुकानदार, औषधी दुकानदार, दुग्ध व्यावसायिक यांची देखील प्राथमिक तपासणी करणे गरजेचे आहे. कारण या अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्यांकडे शहरातील सर्व लोकांचे येणे जाणे सुरू आहे. यातील एक जरी संशयिताला आपण वेळीच ओळखू शकलो; तर असंख्याना होणारे संक्रमण रोखू शकतो. तसेच भाजीपाला, किराणा दुकान, दूध डेअरी, रेशन दुकान हे औषध दुकान, दवाखान्यांसारखे रोज सुरू ठेवलेच पाहिजे का? की आपण ती एक दिवसाआड ठेऊ शकतो. यावर ही विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा. त्यासाठी नागरिकांची ग्रामीण, शहरी लोकप्रतिनिधींची प्रशासनाला खंबीर साथ मिळणे गरजेची आहे. 

डॉक्‍टर्स, नर्स लढताय... 
कोरोना विषाणूवर जगभरात अजूनही रामबाण इलाज सापडलेला नाही. कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे रुग्णसंख्या रोखू शकतो. जगभरातील डॉक्‍टर्स आपल्या अनुभवातून किंवा शासनाकडून असलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे स्वतःचे जीव धोक्‍यात घालून कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करीत आहेत. कोरोनाग्रस्त रुग्ण हा 14 दिवस रुग्णालयात असतो. तोपर्यंत आणखी अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत, मात्र सैन्यरूपी डॉक्‍टर्स आहे तेव्हढेच आहेत. युद्धाच्या काळात सैनिकांची जशी भरती करतो तशी भरती या डॉक्‍टरांची करता येत नाही. प्रशासन रुग्णांसाठी आणखी असंख्य खाटांची व्यवस्था करेलही; परंतु डॉक्‍टर्स, नर्स यासारखे मनुष्यबळ मर्यादित आहे याचा सर्वांनी विचार करायला हवा. तेव्हा आपण जागरूक नागरिक म्हणून कोरोनाची साखळी घरात राहून तोडू शकतो. आपल्या कष्टकरी, पोशिंद्याला शेतकऱ्याला संक्रमणापासून वाचवू शकतो, सैन्यरूपी डॉक्‍टर्स देखील कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत त्यामुळे आपण कठोर स्वयंशिस्त पाळून डॉक्‍टरांवरील भार कमी करू शकतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपला अनमोल जीव वाचवू शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com