Narak Chaturdashi Laxmi Puja : मनाची ऊर्जा वाढविणारा सण

दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव! प्रकाशाचा सण! दिवाळीच्या चैतन्य पर्वातील नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे महत्त्वाचे दिवस मानले जातात.
Diwali 2022 Narak ChaturdashiLaxmi Puja  diwali festival energy of mind Festival of Light
Diwali 2022 Narak ChaturdashiLaxmi Puja diwali festival energy of mind Festival of LightEsakal

- दीपाली पाटवदकर

दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव! प्रकाशाचा सण! दिवाळीच्या चैतन्य पर्वातील नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे महत्त्वाचे दिवस मानले जातात. या दिवसांसाठी वेगवेगळ्या कथा आहेत. त्यातूनच त्याबाबतचे महत्त्व अधोरेखित होते. मनाची ऊर्जा वाढविणारा हा कालखंड आहे.

दिवाळी म्हणजे हिवाळ्यातील रात्री मोठ्या होत जात असताना लावलेला आशेचा दिवा. थंडीचा आणि थंडीबरोबर येणारा अंधाराचा काळ कंठणे सोपे नसल्याने, कित्येक प्राणी सरळ २-४ महिन्यांसाठी झोपून जातात. झाडेही आपापली पाने गाळून थंडीचा सामना करायला तयार होतात. हिवाळ्यात नेमाने येणाऱ्या नैराश्याला हटवण्यासाठी थंड देशांमध्ये ‘लाइट थेरपी’चा वापर केला जातो. हिवाळ्याच्या दिवसात घरात लख्ख प्रकाश देणारे दिवे लावून ‘विंटर ब्लूज’ घालवायचा प्रयत्न केला जातो. आपल्या पूर्वजांनी कदाचित ते हेरून, दिव्यांच्या सणाची योजना केली असावी. दिवाळीची तयारी, खरेदी, स्वच्छता, किल्ले, पणत्या, आकाशकंदील लावणे इत्यादी गोष्टींमुळे आपल्या मनाला थंडीमुळे मरगळ अशी येतच नाही!म्हणून दिवाळी हा उत्साहाचा सण आहे. दिवे लावून मनाची निराशा घालवणारा, मनाची शक्ती वाढवणारा सण आहे.

दिवाळीमध्ये स्निग्ध पदार्थ खाऊन, त्वचेला तेल लावून आपण शरीराचे थंडीपासून रक्षण करतो. म्हणून दिवाळी हा थंडीमध्ये तनाची शक्ती वाढवणारा, ऊर्जा देणारा उत्सव आहे. प्रकाश म्हणजे केवळ उजेड नाही, तर ज्ञान देखील आहे. प्राचीन काळातील ऋषींनी गायत्री मंत्रात प्रकाश देणाऱ्या सूर्याला म्हटले, ‘माझ्या बुद्धीला तेज दे!’ आजही सायंकाळी देवाजवळ दिवा लावल्यावर ‘चांगली बुद्धी दे’ असेच आपण प्रकाश देणाऱ्या अग्निकडे मागणे मागतो! म्हणून दिवाळी हा बुद्धीच्या तेजाचा सण आहे.

नरकचतुर्दशीचा अर्थ

ऊर्जा आणि प्रकाशाबरोबरच दिवाळी हा पराक्रमाचाही सण आहे! नरकचतुर्दशीच्या कथेतून आपल्याला हेच सांगितले आहे. प्राकज्योतीषपूर येथे नरकासुर नावाचा दैत्य राज्य करत होता. तो जनतेला पीडा देत असे. त्याने उन्मत्त होऊन अनेक देशांतील सोळा हजार एकशे कन्यांना पळवून आणले. या मानव, देव आणि गंधर्व कन्यांना त्याने बंदी करून ठेवले होते. सज्जन लोकांनी कृष्णाकडे मदतीची याचना केली तेव्हा कृष्ण आणि सत्यभामा, सैन्य घेऊन लढाईसाठी निघाले. नरकासुराच्या विरुद्ध ही लढाई अनेक दिवस चालली. या लढाईमध्ये कृष्णाने नरकासुराच्या मुरा नावाच्या बलाढ्य सेनापतीला मारले, म्हणून कृष्णाला ‘मुरारी’ हे नाव मिळाले. अखेरीस कृष्ण आणि सत्यभामा यांनी नरकासुराचा वध केला!

नरकासुराच्या वधानंतर कृष्णाने बंदीत असलेल्या राजकन्यांना सोडवले. त्या कन्यांनी कृष्णाला विनवणी केली, ‘‘आता आमचे पुढे काय होईल? कोण आम्हाला स्वीकारेल? तूच आमचा कैवारी आहेस, तेव्हा आम्हाला यातून मार्ग सांग!’’ तेव्हा कृष्णाने या सर्व राजकन्यांशी विवाह केला. त्यांना सन्मानाने द्वारकेला नेले. तिथे त्यांच्यासाठी स्वतंत्र महाल बांधवले आणि आजन्म त्यांचा योगक्षेम वाहिला.

क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् ।

म्हणून दिवाळी हा धन-संपत्तीची उपासना करण्याचा आणि त्या मधून संपूर्ण जगाचे कल्याण इच्छिण्याचा सण आहे! दिव्यांचा, प्रकाशाचा, ज्ञानाचा, पराक्रमाचा, आरोग्याचा, धन-धान्य-धेनूंचा, ऐश्वर्य आणि समृद्धीचा, कारुण्य बाणण्याचा आणि दानाची लालसा धरण्याचा सण म्हणजे दिवाळी! या दिवाळीला दिवा लावून अग्नीदेवाला प्रार्थना - आमच्या धेनुंना आरोग्य लाभो आणि घरोघरी लावलेल्या दिव्यांच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंध:कार दूर पळून जावो!

भूदेवीचे अर्थात लक्ष्मीपूजन

दिवाळी हा ऐश्वर्य, समृद्धी, धन, धान्य आणि धेनू या संपत्तीची पूजा करायचा दिवस. अर्थात, लक्ष्मी पूजनाचा दिवस. पाऊस घेऊन येणारे प्रचंड काळे ढग, भारतीयांना आकाशात हत्तीसारखे दिसले. पावसाचे ढग म्हणजे हत्ती असे एक समीकरणच झाले. लक्ष्मी म्हणजे भूदेवी; ही धन, धान्य, पाणी देणारी सुपीक धरणी माता! पावसावर आपले आर्थिक गणित अवलंबून आहे, हे आजचे नाही, तर अगदी ऋग्वेद काळापासूनचे चित्र आहे. ऋग्वेदाच्या श्रीसूक्तामध्ये लक्ष्मीचे वर्णन ऐश्वर्य, समृद्धी, धनधान्य देणाऱ्या देवता असे केले आहे. या चित्रातील लक्ष्मी भूदेवी आहे. पृथ्वी आहे. सर्व जीवांची जननी आहे. पृथ्वीमातेवर जलवर्षाव करणारे हत्ती म्हणजे पावसाचे ढग आहेत. चांगला पाऊस झाला, की पृथ्वी सुजलाम् सुफलाम् होते. आपल्याला फळे, फुले, धान्य, पशू, गायी, गुरेरुपी धन देते. श्रीसूक्ताचे ऋषी म्हणतात, गजांनी केलेल्या जलाभिषेकाने लक्ष्मी प्रसन्न झाली, की भरपूर धान्य उगवेल आणि मग या जगातील दारिद्र्य व भूकरुपी अलक्ष्मीचा मी नाश करेन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com