Diwali Festival 2021 : दिवाळीचा पहिला दिवस, नरक चतुर्दशीचं महत्व जाणून घ्या

Diwali Festival 2021 : दिवाळीचा पहिला दिवस, नरक चतुर्दशीचं महत्व जाणून घ्या

Narak Chaturdashi 2021 : नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी-कुबेर पूजन गुरुवारी ४ नोव्हेंबर रोजी (narak chaturdashi date) आहे. नरक चतुर्दशीला चंद्रोदयापासून  ( पहाटे ५ - ४९ ) सूर्योदयापर्यंत ( ६-४१ ) अभ्यंगस्नान (narak chaturdashi puja muhurat) करावयाचे आहे. शरीराला तीळाचे तेल किंवा खोबरेल तेल, सुगंधी उटणी लावून चांगला मसाज करावा आणि सुगंधी अत्तर लावून गरम पाण्याने स्नान करावे. यालाच ' अभ्यंगस्नान ' असे म्हणतात. दिवाळीचे दिवस थंडीचे असतात. थंडीच्या दिवसात शरीराची त्वचा कोरडी पडते. अशावेळी अभ्यंगस्नान केल्यामुळे त्वचा मृदू आणि सतेज होते. तसेच शरीराचे स्नायू बलवान होतात.त्यामुळेच दिवाळीत अभ्यंगस्नान करण्यास सांगितलेले आहे. दिवाळीच्या या  दिवसात रोज अभ्यंगस्नान करावयाचे आहे.

नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी कसे?

नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी-कुबेर पूजन  हे दोन्ही सण आज एकाच दिवशी कसे आले , याविषयी प्रथम माहिती देतो. नरकचतुर्दशी ही आश्विन कृष्ण चतुर्दशी चंद्रोदय व्यापिनी हवी.  (narak chaturdashi puja time)पहाटे ५-४९ वाजता चंद्रोदय आहे आणि पहाटे ६-०४ वाजता आश्विन कृष्ण चतुर्दशी संपते म्हणून  नरकचतुर्दशी आहे. लक्ष्मीपूजनाचा दिवस ठरविण्यासाठी नियम असा आहे की ज्या दिवशी प्रदोषकाली आश्विन अमावास्या असेल , त्या दिवशी प्रदोष कालात लक्ष्मीपूजन करावे. 4 तारखेला सकाळी ६-०४ पासून उत्तररात्री २-४५ पर्यंत आश्विन अमावास्या आहे. सायं. ६-०३ पासून रात्री ८-३५ पर्यंत प्रदोषकाल आहे. आज प्रदोषकाळात आश्विन अमावास्या असल्याने आजच प्रदोषकाळात सायं. ६-०३ पासून रात्री ८-३५ पर्यंत लक्ष्मीकुबेर पूजन करावयाचे आहे.

कथा नरकासुराची...(Narakasura Vadha Story)

नरक चतुर्दशी संबंधी पुराणात एक कथा सांगितलेली आहे. नरकासुराला भूदेवीकडून ' वैष्णवास्त्र ' प्राप्त झाले होते. त्यामुळे तो बलाढ्य आणि उन्मत्त झाला होता. त्याला गर्व झाल्याने त्याने सर्व देवाना त्रास देण्यास सुरुवात केली. इंद्राचा ऐरावतही त्याने पळविला. अनेक राजांच्या आणि नागरिकांच्या एकूण सोळा हजार मुली त्याने पळवून आपल्या बंदिवासात ठेवल्या होत्या. नरकासुराच्या अत्याचारामुळे सर्वच लोक गांजले होते. त्यामुळे इंद्राने भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने नरकासुरावर स्वारी करून त्याला ठार मारले.ही गोष्ट आश्विन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी घडली.मरतेसयी नरकासुराने भगवान श्रीकृष्णाकडे वर मागितला --

"आजच्या तिथीला जो अभ्यंगस्नान करील त्याला नरकाची पीडा होऊ नये. तसेच माझा हा मृत्युदिन सर्वत्र दिवे लावून साजरा केला जावा ."यांवर भगवान श्रीकृष्णांनी " तथास्तु " म्हटले. त्यामुळे दरवर्षी आश्विन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करण्याची पद्धत पडली. तसेच त्यादिवशी पहाटे व रात्री दिवे लावून दीपोत्सव करण्याची प्रथा पडली. भगवान श्रीकृष्णाने नरकासुराला ठार करून लोकांना त्याच्या त्रासातून मुक्त केले. म्हणून या दिवशी लोक आनंदोत्सव साजरा करू लागले.

भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्यानंतर त्याच्या ताब्यातील सोळा सहस्र मुलींना मुक्त केले. त्या मुलींच्या आई वडिलांना निरोप पाठवून मुलींना घरी नेण्यास सांगितले. परंतु मुलींचे आई वडील मुलींना नेण्यासाठी आलेच नाहीत. त्या मुलींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी भगवान कृष्णाने त्यांच्याशी विवाह केल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्या सोळा सहस्र मुलींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त झाली. भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या उदर निर्वाहाचीही सोय केली.

नरकचतुर्दशीपासून अभ्यंगस्नानाला सुरूवात होते

नरकचतुर्दशीच्या दिवशी काही ठिकाणी पहाटे अभ्यंगस्नानापूर्वी नरकासुर म्हणून कारेट्याचे कडू फळ पायाखाली दाबून चिरडण्याची प्रथा आहे. आजही समाजात अज्ञान, आळस, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, गुंडगीरी, अस्वच्छता, अनीती इत्यादी नरकासुर थैमान घालीत आहेत. त्याना नाहिसे करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अवतार घेणार नाही. आपल्या प्रत्येकालाच श्रीकृष्ण बनून त्यांचा नाश करून समाजाला सुखी करावयाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com