Srimad Bhagavad Gita : मनोधैर्य...!
बालमित्रांनो,‘मी जे करायचं ठरवलं आहे ते अगदी योग्य आहे,’ असं जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत ते काम आपण आत्मविश्वासाने करू शकत नाही.
। क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ।।
बालमित्रांनो,‘मी जे करायचं ठरवलं आहे ते अगदी योग्य आहे,’ असं जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत ते काम आपण आत्मविश्वासाने करू शकत नाही. ‘हे चूक आहे की बरोबर आहे?’ असा प्रश्न पडणं किंवा, ‘माझं वागणं चूक तर नाही ना’ अशी थोडीशी जरी शंका मनात असेल तर काम चांगल्या प्रकारे होणं शक्यच नाही.
समोरून येणारा चेंडू मी टोलवू शकेन याची निश्चिती खेळाडूला वाटत नसेल, तर तो आउट होण्याची शक्यता असतेच आणि एखादा अवघड चेंडू आला तरी धाडस आणि मनोधैर्याच्या साहाय्याने खेळाडू तो सहज परतवून लावू शकतो. शंकाकुल मनस्थितीला श्रीकृष्ण येथे ‘क्षुद्र हृदयदौर्बल्य’ असे नाव देतो.
अर्जुन किती शूर आहे, किती शक्तिशाली आहे याची श्रीकृष्णाला पूर्ण कल्पना होती. अर्जुन महारथी होता. म्हणजे, तो एकटाच दहासहस्त्र धनुर्धारी विरांशी लढू शकत असे. एवढी प्रचंड क्षमता असूनही मनाच्या दुबळेपणामुळे लढण्याची शक्ती गमावून बसला होता. शरीर कितीही कणखर असलं ना तरीही मनावर झालेला छोटासा आघात त्याच्या सर्व क्षमता नष्ट करायला पुरेसा असतो. म्हणूनच श्रीकृष्णा अर्जुनाला म्हणतो, ‘‘तू भित्रेपणा दाखवू नकोस. मनाची क्षुद्र दुर्बलता सोडून उठ...’’
बालमित्रांनो, आपल्याला सुद्धा एखाद्या स्पर्धेत भाग घ्यायचा असतो आणि ऐनवेळी भीती आणि शंका यांच्यामुळे मनोधैर्य खचून जात असेल तर त्यावर विजय मिळवून खंबीरपणे पुढे जायला शिकले पाहिजे...
- श्रुती आपटे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.