खिलार, गीर गोपालनासह पूरक उद्योगाची जोड

शिराळ (ता. माढा, जि. सोलापूर) येथील अजिंक्य दिगंबर लोकरे यांनी दहा वर्षांपूर्वी खिलार कपिला आणि गीर कपिला गाईंच्या संगोपनातून सेंद्रिय शेतीला चालना दिली.
Business
BusinessSakal

शिराळ (ता. माढा, जि. सोलापूर) येथील अजिंक्य दिगंबर लोकरे यांनी दहा वर्षांपूर्वी खिलार कपिला आणि गीर कपिला गाईंच्या संगोपनातून सेंद्रिय शेतीला चालना दिली. उत्पन्नवाढीसाठी दुग्धजन्य पदार्थ आणि पंचगव्य औषधी निर्मितीवर भर दिला. यातून त्यांनी परिसरात वेगळी ओळख तयार केली आहे.

सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभूर्णीपासून अवघ्या आठ किलोमीटरवर शिराळ हे गाव. या गावात सुतारवस्ती परिसरात अजिंक्य दिगंबर लोकरे यांची दहा एकर शेती आहे. बारावीपर्यंत शिकलेले अजिंक्य सातवीत असल्यापासून शेती करतात. अवघ्या दोन आठवड्यांचे असताना त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर आई सुनंदा यांच्यावरच घराची सर्व जबाबदारी आली. अजिंक्यसह मोठ्या दोन मुली सारिका आणि अर्चना यांना सुनंदाताईंनी चांगले शिकवलं. अजिंक्यला शेती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे इच्छा असतानाही बारावीनंतर शिकता आले नाही. प्रतिकूल परिस्थितीतही सुनंदाताईंनी सारिकाला एम.एस्सी. (कृषी) आणि अर्चनाला कॉम्प्युटर इंजिनिअर केले. अजिंक्यने मात्र शेतीची वाट धरली आणि त्यात प्रयोगशीलता, नावीन्यपूर्णता जपली.

देशी गोवंशाचा गोठा

दहा वर्षांपूर्वी अजिंक्य लोकरे हे सेंद्रिय शेतीच्या प्रसारात काम करणारे निवृत्त पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम यांच्या संपर्कात आले. सेंद्रिय शेती, देशी गाईंच्या संगोपनाचे महत्त्व त्यांना पटले. त्या वेळी त्याच्याकडे दोन दुभत्या म्हशी होत्या. परंतु सेंद्रिय शेतीच्या दृष्टीने त्यांनी तीन खिलार गाई घेतल्या. त्यातही कपिला गाईंकडे त्याचा सर्वाधिक ओढा राहिला. आज त्यांच्या गोठ्यात आठ खिलार, तीन कपिला खिलार, सहा गीर कपिला, चार वासरे आणि एक कपिला गीर खोंड (नंदी) आहे. जनावरांच्या व्यवस्थापनासाठी चार गुंठे क्षेत्रावर मुक्त संचार गोठा आहे. अजिंक्य यांच्या प्रयोगाचे नानासाहेब कदम तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी कौतुक केले आहे. त्यांच्या ‘सीताई’ प्रकल्पातही अजिंक्य यांनी सहभाग घेतला आहे.

देशी खिलार आणि गीरमध्ये विशेषतः कपिला गाईचे महत्त्व वेगळे आहे. त्यामुळे कपिला गाईंचे संवर्धन करण्याचा निर्णय अजिंक्य यांनी घेतला. आज त्यांच्याकडे सर्वाधिक कपिला गाई आहेत. तसेच गीर कपिला खोंड आहे. त्याचा वापर ते रेतनासाठी करतात. जातिवंत गोवंश पैदासीसाठी त्याचा उपयोग होतो, त्यातूनही उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत तयार केला आहे.

सेंद्रिय निविष्ठा वापरावर भर

पिकांसाठी पूर्णपणे सेंद्रिय निविष्ठांच्या वापरावर अजिंक्य यांनी भर दिला आहे. आज त्यांच्याकडे ऊस, तैवान पिंक पेरू, नारळ, मोसंबी आणि चारा पिकांची लागवड आहे. या सर्व पिकांना शेण, गोमूत्रापासून बनविलेली स्लरी दिली जाते. शेणखताच्या बरोबरीने गोवऱ्यांची राख, जिवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क आदींचा वापर पिकांमध्ये केला जातो. सेंद्रिय पीक उत्पादनामुळे शेतीमालाला चांगला दर मिळत आहे.

पंचगव्य प्रशिक्षण

देशी गाईंचे महत्त्व जाणल्याने अजिंक्यच्या आई सुनंदाताई यांनी २०१७ मध्ये येरमाळा येथे डॉ. नवनाथ दुधाळ यांच्याकडे पंचगव्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. विविध उत्पादनांना सुरुवात केली. त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान अवर्णनीय आहे.

पंचगव्य प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अजिंक्य आणि त्यांच्या आई सुनंदाताईंनी देशी गाईच्या दुधापासून तुपासह विविध पंचगव्य उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली. यामध्ये नस्य, बाम, धूपकांडी, साबण, दंतमंजन आणि गोवऱ्यांचा समावेश आहे. नस्याचा उपयोग सर्दी, पडसे, केस गळणे, डोळ्याचे विकारावर केला जातो. बाम डोकेदुखी, गुडघेदुखीवर वापरले जाते. अमृतधारेचा वापर सर्दी, पडसे यासाठी केला जातो. दंतमंजन, साबण, तसेच अग्निहोत्रासाठी गोवऱ्या आणि धार्मिक विधीमध्ये वापरण्यासाठी धूपकांडीची निर्मिती केली आहे.

तुपाला सर्वाधिक मागणी

अजिंक्य प्रामुख्याने कपिला गाईंचे संवर्धन करतात. रोजचे १५ लिटर दूध संकलन आहे. यापासून तूपनिर्मिती केली जाते. गाईचे दूध, गोमूत्र आणि तुपाला सर्वाधिक मागणी आहे. त्यातही तुपाला चांगला उठाव आहे. तुपाची प्रतिकिलो तीन हजार रुपये दराने विक्री होते. टेंभुर्णी परिसरासह पुणे, मुंबई आदी शहरांतूनही खास ग्राहक खरेदीसाठी तयार झाला आहे. अमृतधारा, नस्य, बाम, धूपकांडी, गोवऱ्या, दंतमंजनसारख्या पंचगव्य उत्पादनाची परिसरासह अन्य भागांतही चांगली मागणी आहे. उत्पादने आणि तूप विक्रीतून खर्च वजा जाता दर महिन्याला निव्वळ १५ हजार रुपयांचा नफा मिळतो.

पुरस्काराने सन्मान

  • आत्मा प्रकल्पांतर्गत २०१८ मध्ये प्रगतिशील शेतकरी म्हणून सन्मान.

  • मराठा सेवा संघाकडून सेंद्रिय उत्पादक शेतकरी म्हणून गौरव.

(अजिंक्य लोकरे - ९४२२६ ५३८२२)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com