पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार; तृणमूल-भाजपमध्ये शाब्दिक हाणामारी

 पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार; तृणमूल-भाजपमध्ये शाब्दिक हाणामारी

कोलकता : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या आणि सातव्या टप्प्यासाठी पश्‍चिम बंगालमध्ये आज झालेल्या मतदान प्रक्रियेला हिंसाचाराचे गालबोट लागले. दोन ठिकाणी मतदान केंद्रांवर क्रूड बॉंब फेकण्यात आल्याच्या घटना घडल्याचे सांगण्यात आले. तर काही ठिकाणी हिंसक झालेल्या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी सुरक्षा दलांना लाठीचार्ज करावा लागल्याचे वृत्त आहे.राज्यातील हिंसाचाराला भाजप जबाबदार असल्याचा आरोप तृणमूल कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे; तर भाजपने हिसाचाराचे खापर "तृणमूल'वर फोडले आहे. 

तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे पश्‍चिम बंगालमधील नऊ मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया सकाळी धीम्या गतीने सुरू होती. काही ठिकाणी ईव्हीएम यंत्रे काम करत नसल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या. मथुरापूर लोकसभा मतदारसंघामध्ये रायडिघी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर क्रूड बॉंब फेकण्यात आला. तर भातपारा मतदारसंघातही विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांवर क्रूड बॉंब फेकल्याचे सांगण्यात आले. 
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या सर्वच टप्प्यांवेळी पश्‍चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला होता. राज्यात आज झालेल्या मतदानावेळी अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या. 

केंद्रीय सुरक्षा दले हटवू नका : भाजप

नवी दिल्ली : निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत पश्‍चिम बंगालमधून केंद्रीय सुरक्षा दलांना हटवू नये, अशी मागणी भाजपकडून आज निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर काही ठिकाणी "तृणमूल'कडून हल्ले करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. भाजपच्या काही उमेदवारांना "तृणमूल'च्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा दावा केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. 

हिंसाचाराला भाजप जबाबदार : "तृणमूल'

पश्‍चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आलेल्या केंद्रीय सुरक्षा दलांकडून मतदारांचा छळ करण्यात येत असून, मतदारांना मतदानापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप तृणमूल कॉंग्रेसकडून करण्यात आला. भाजप नेत्यांच्या इशाऱ्यानुसार केंद्रीय सुरक्षा दले काम करत आहेत, असा आरोपही "तृणमूल'कडून करण्यात आला.

राज्यातील मतदानाची प्रक्रिया शांतेत पार पडावी, अशी आमची इच्छा आहे, मात्र भाजपला शांतता नको आहे, असा आरोप "तृणमूल'चे खासदार डेरेक ओब्रायन यांनी केला. कमळाला मत द्या, अन्यथा ठार करू, अशा धमक्‍या केंद्रीय सुरक्षा दलांच्या जवानांकडून मतदारांना दिल्या जात असल्याचे ओब्रायन यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com