Air Pollution : उत्तरेत हवेचा दर्जा सुधारला तर दक्षिणेत घसरला; ला निनाचा परिणाम

हिवाळ्यातील हवेचा प्रदूषण ही चिंतेची बाब झाली आहे. हवेचा दर्जा खराब होत असल्याने आरोग्याच्याही अनेक तक्रारी निर्माण होत आहेत.
Air Pollution
Air Pollutionsakal

नवी दिल्ली - हिवाळ्यातील हवेचा प्रदूषण ही चिंतेची बाब झाली आहे. हवेचा दर्जा खराब होत असल्याने आरोग्याच्याही अनेक तक्रारी निर्माण होत आहेत. मात्र, प्रशांत महासागरातील ‘ला निना’ सलग तीन वर्षे सक्रिय राहण्याची दुर्मीळ स्थिती निर्माण झाल्याने महासागरांसह जगभरातील हवामानावर परिणाम झाला.

भारतात २०२२-२३ च्या हिवाळ्यात उत्तरेत हवेचा दर्जा सुधारला तर दक्षिणेत मात्र हवेचे प्रदूषण वाढले, असा दावा एका नव्या आंतरराष्ट्रीय संशोधनात करण्यात आला आहे. हवामान बदलामुळेच २०२० ते २०२३ दरम्यान सलग तीन वर्षे ला निना सक्रिय राहिला, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीजचे प्रमुख प्राध्यापक गुरफान बेग यांच्या नेतृत्वाखाली वैज्ञानिकांनी हे संशोधन केले. स्थानिक कार्बन उत्सर्जनाखेरीज वेगाने बदलणाऱ्या हवामानामुळे हवेच्या दर्जावर परिणाम होत असल्याचेही संशोधकांनी अधोरेखित केले. संशोधकांनी नव्याने विकसित केलेल्या एनआयएएस- सफरच्या हवेच्या दर्जाच्या अंदाजाचा वापर केला.

यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या स्वदेशी प्रणालीचा वापर केला आहे. ‘एल्सेव्हियर जर्नल’ या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे. ला निनाच्या सलग तीन वर्षे सक्रिय राहण्याचा भारतातील हवामानावरही परिणाम झाला. विशेषत: २०२२-२३ च्या हिवाळ्यात देशातील उत्तरेकडील भागात हवेच्या दर्जात सुधारणा झाली.

उत्तर भारतात हवेचा दर्जा हिवाळ्यात घसरत असताना या वर्षी मात्र नेमके त्याउलट घडले. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरात हवेचे प्रदूषण ३३ टक्क्यांनी कमी होऊन हवेचा दर्जा सर्वाधिक सुधारला. दक्षिण भारतात मात्र हवेचे प्रदूषण नेहमीपेक्षा अधिक होते. मुंबईत हवेतील पीएम २.५ कणांची पातळी सर्वाधिक ३० टक्क्यांनी वाढली.

उत्तर भारतातील अनेक शहरांनी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत घेतलेले पाच वर्षांचे उद्दिष्ट या वर्षी गाठले. ही एवढी प्रगती अगदी थोड्या कालावधीत कशी झाली, याचे कोडे संशोधकांनाही पडले होते. भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेतील वैज्ञानिक आर. एच.कृपलानी म्हणाले, की भारतातील २०२२-२३ च्या हिवाळ्यावर सलग तीन वर्षे सक्रिय असलेल्या ला निनाच्या शेवटच्या टप्प्याचा परिणाम झाला. ही २१ व्या शतकातील पहिलीच अशी घटना आहे.

हवामान बदलामुळे ला निनाची सक्रियता वाढली. त्यामुळे, हवेच्या प्रवाहावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. उत्तर भारतातील स्थिर हवामान रोखून हवेचा दर्जा सुधारण्यात या बदललेल्या हवेच्या प्रवाहाने महत्त्वाची भूमिका बजावली. याउलट दक्षिण भारतातील शहरांत थंड वातावरण निर्माण झाल्याने प्रदूषणात वाढ होऊन हवेची गुणवत्ता ढासळली.

उत्तरेकडे उंचीवरून वाहणाऱ्या वाऱ्यांनी दक्षिणेकडे पृष्ठभागाजवळ तुलनेने मंद गतीने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या सोबत प्रवाह निर्माण केला. या स्थितीतून दक्षिण भारतात प्रदूषित घटकांची संख्या वाढून पीएम २.५ कणांचे केंद्रीकरणही वाढले. याउलट, हवेचे अनोखे प्रवाह, पावसाची तसेच ढगांचीही गैरहजेरी तसेच जलद वायुवीजन नसल्यानेही उत्तर भारतात हवेच्या दर्जात सुधारणा झाली, असेही त्यांनी नमूद केले.

भारतातील २०२३-२४ च्या हिवाळ्यातील हवेचा दर्जा सामान्य होता, यावरून आमच्या संशोधनाची पुष्टी होते. हवेच्या प्रदूषणात असामान्य किंवा टोकाची परिस्थिती निर्माण होण्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्य हवामान बदलाशीच संबंध आहे. त्यामुळे, आपण आतातरी जागे होण्याची गरज आहे. मानवनिर्मित उत्सर्जन कमी करण्यासाठी आपण दीर्घकालीन धोरणावर लक्ष्य केंद्रित करण्याची गरज आहे.

- गुरफान बेग, संशोधक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com