"मिथुन चक्रवर्ती नक्षलवादी, ED ला घाबरुन केला भाजप प्रवेश"

Mithun Chakraborty
Mithun Chakraborty

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत, तशे शाब्दिक हल्ले होताना दिसत आहेत. कोलकाताच्या ब्रिगेट परेड मैदानात अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तृणमूलने मिथुन चक्रवर्तींना नक्षलवादी म्हटलं आहे. शिवाय त्यांनी ईडीला घाबरुन भाजपसोबत हात मिळवला आहे, असा आरोप टीएमसीने केला आहे. तृणमूलचे वरिष्ठ नेता सौगत रॉय म्हणाले की, मिथुन आधी स्टार होते, पण आता नाहीत. ते मुळ रुपात नक्षलवादी होते. त्यांनी सीपीएममध्ये प्रवेश केला, त्यानंतर ते टीएमसीमध्ये आले आणि राज्यसभा खासदार बनले. भाजपने त्यांना ईडीची भीती दाखवली आणि त्यांनी राज्यसभा सोडली. आता ते भाजपमध्ये सामिल झाले आहेत. मिथुन चक्रवर्ती यांची कोणतीही विश्वासार्हता नाही. तसेच त्यांचा लोकांवर कसला प्रभावही नाही. 

मिथुन चक्रवर्ती यांच्या भाजप प्रवेशामुळे टीएमसीकडून जोरदार टीकास्त्र सोडले जात आहेत. टीएमसी प्रवक्ता कुणाल घोष यांनी म्हटलं की, मोठे अभिनेते अनेक प्रोडक्शन हाऊससोबत जोडले गेले असतात. मिथुन चक्रवर्तीही तेच करत आहेत, ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. चक्रवर्ती म्हणतात त्यांना लोकांसाठी काही करायचं आहे, मग ते इंधन दरवाढीबाबात का बोलत नाहीत. 

सीपीआयनेही मिथुन चक्रवर्ती यांच्यावर टीका केली आहे. वरिष्ठ नेते सुजन चक्रवर्ती म्हणाले की, ते मिथुन चक्रवर्ती यांच्यासारख्या दलबदलू लोकांवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना भाजप प्रवेशाचा कोणताही फायदा होणार नाही किंवा याचा प्रभाव लोकांवर पडणार नाही. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार राहिलेले अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी 2016 मध्ये आपले राज्यसभा सदस्यत्व सोडलं होतं. राज्यसभा सदस्यत्व सोडण्यामागे त्यांनी आरोग्याचे कारण दिले होते. 

पश्चिम बंगालमध्ये भाजप जोर लावत असली, तरी प्रचाराची सर्व भिस्त पंतप्रधान मोदी यांच्यावर आहे. पंतप्रधान मोदी 8 टप्प्यातील मतदानासाठी जवळपास 1 डझनहून अधिक सभा घेण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये यश मिळवण्याची भाजपला आशा आहे. मोदींच्या सभेचा शेड्यूल अजून तयार झालेला नाही, पण पक्षाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार ते प्रत्येक टप्प्यातील मतदानापूर्वी दोन वेळा लोकांना संबोधित करतील.  पश्चिम बंगालमध्ये 27 मार्चपासून आठ टप्प्यात मतदान होईल, ज्याचा निकाल 2 मे रोजी लागेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com