Bihar Election 2020: राजदची बेरोजगारी, भाजपचे ‘मंदिर’

Bihar Election 2020: राजदची बेरोजगारी, भाजपचे ‘मंदिर’

नवी दिल्ली - कोरोना संसर्ग, लॉकडाउन, स्थलांतरित कष्टकरी, आर्थिक संकट, वाढती गरीबी आणि बेरोजगारी या राष्ट्रीय मुद्यांपैकी रोजगाराचा मुद्दा बिहार निवडणुकीत ठळकपणे समोर आला, पण इतर मुद्दे पिछाडीवर गेलेले दिसले. त्याचप्रमाणे भाजपतर्फे पंतप्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी राममंदिर आणि परकी नागरिकांची(मुस्लिम) हकालपट्टी व बाहेरच्या हिंदूंना नागरिकत्व देण्याच्या परंपरागत मुद्यांवर प्रचारात भर देण्यात आला. 

बिहार निवडणुकीतील भाजपच्या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले जात आहे. पक्षाचे ‘चाणक्य'' मानल्या जाणाऱ्या अमित शहा यांच्या गैरहजेरीत मोदींनी एकट्याने प्रचाराची धुरा सांभाळली आणि भाजपला विजयपथावर पोहोचविले. बिहारचा विजय भाजपसाठी अत्यावश्‍यक होता, कारण पुढील वर्षी होणाऱ्या बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी याचा उपयोग होणार आहे. तसेच कोरोना संसर्ग, लॉकडाउन आणि स्थलांतरित कष्टकऱ्यांच्या समस्येच्या पार्श्‍वभूमीवर झालेली ही निवडणूक मोदी सरकारच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली कारण मतदारांनी त्यांना दिलेली मते पाहता हे मुद्दे भाजपपेक्षा नितीशकुमार यांच्याविरोधात अधिक गेले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नितीशकुमार यांच्याविषयी राग व्यक्त
बिहारमध्ये कोरोना लागण आणि त्यामुळे उत्पन्न परिस्थितीची हाताळणी करण्याबाबत नितीशकुमार यांना आलेल्या अपयशाची शिक्षा मतदारांनी त्यांना देऊन राग प्रकट केला. परंतु भाजपने त्यांच्या प्रचाराची भिस्त मुख्यतः राम मंदिर, परदेशी हिंदूंना नागरिकत्व आणि योगी आदित्यनाथ यांनी विशिष्ट समाजाचे नाव न घेता त्यांना देशाबाहेर काढण्याचा केलेला प्रचार प्रभावी ठरला. त्याचप्रमाणे भाजपच्या प्रचारयंत्रणेने राष्ट्रीय जनता दल प्रणीत ‘महागठबंधन’चे सरकार म्हणजे पुन्हा जंगलराज येण्याचा केलेला प्रचार व तेजस्वी यांना मिळणाऱ्या प्रतिसाद पाहून भाजपचा कट्टर मतदार खरोखरच जंगलराज पुन्हा येईल, या भीतीने अधिक पक्का आणि विस्तारत गेला. हे भाजपच्या प्रचारयंत्रणेचे यश होते की त्यांनी जंगलराज्याची भीती यशस्वीपणे चलनात आणली व मते मिळवली. त्यामुळे भाजपच्या प्रचारपद्धतीत अद्याप बदल झालेला नसल्याचे या निवडणुकीने स्पष्ट केले. 

राहुल यांना सूर गवसला नाही
कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांचा करिष्मा या वेळीही फारसा चालू शकला नाही. त्यांना प्रचाराचा सूरच गवसला नाही. तेजस्वी यादव हे रोजगाराचा मुद्दा उपस्थित करीत असताना ते लडाखमधील चिनी आक्रमणाबद्दल मोदी सरकारला जाब विचारत होते. त्यामुळे त्यांचा प्रचार प्रभावी ठरला नाही. थोडक्‍यात, कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व बिहारमध्ये फारसा प्रभाव टाकू शकले नाही. कॉंग्रेसने हट्टाने सत्तर जागांवर निवडणूक लढवली होती परंतु वीसच्या पुढे त्यांना मजल मारता आली नाही आणि गेल्या वेळेपेक्षा त्यांना सात जागांचा फटका बसला. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘महागठबंधन’ च्या टक्केवारीत वाढ
वरवर पाहण्यास भाजपला पक्ष म्हणून मिळालेले यश उल्लेखनीय आहे आणि राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने भाजपला राज्यसभेत आपले संख्याबळ वाढविण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. परंतु किंचितसे सखोल निरीक्षण केले असता भाजपच्या मतांच्या टक्केवारीत घट झालीच आहे आणि ‘महागठबंधन’च्या टक्केवारीत वाढ झालेली दिसते. राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने ही निवडणूक विरोधी पक्षांचे नीतिधैर्य वाढविणारी ठरलेली आहे हे निश्‍चित व पक्ष म्हणून भाजपलाही त्याचा आगामी काळात फायदेशीर ठरणारी आहे. कदाचित कोरोना व लॉकडाउनमुळे जनता नाराज नसल्याचा निष्कर्ष यावरुन काढला जाऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com