भाजपा Action मोडमध्ये; तावडे,मुंडे, जावडेकरांकडे या राज्याची जबाबदारी

केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने १५ राज्यांतील पक्षप्रभारी म्हणजेच प्रमुखांची नावे शुक्रवारी संध्याकाळी जाहीर
Bjp Vinod Tawde Prakash Javadekar Pankaja Munde politics Responsibility of state
Bjp Vinod Tawde Prakash Javadekar Pankaja Munde politics Responsibility of statesakal

नवी दिल्ली - केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने १५ राज्यांतील पक्षप्रभारी म्हणजेच प्रमुखांची नावे शुक्रवारी संध्याकाळी जाहीर केली. हरियाणाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेले विनोद तावडे यांच्याकडे आता भाजपच्या हातून निसटलेल्या बिहारची त्याहून महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना केरळची तर राष्ट्रीय महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडे राजस्थान प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आहे त्या जबाबदाऱया काढून घेतल्यावरही पक्ष किंवा नेतृत्वाबद्दल किंचितही कुरकूर न करता पक्षकार्यात शांतपणे झोकून देणे, हे भाजपच्या मराठी नेत्यांचे वैशिष्ट्य मानले जाते.

दरम्यान पंकजा मुंडे यांच्याकडे मध्य प्रदेशाचे सहप्रभारीपद देण्यात आले आहे. त्यांना पी मुरलीधर राव यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल. भाजप नेतृत्वाने सध्या सारा जोर लावलेल्या तेलंगणाचे प्रभारीपद दिल्लीतील तेजतर्रार नेते तरुण चुग यांच्याकडे तर सहप्रभारीपद अरविंद मेनन यांच्याकडे देण्यात आले आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांची पंजाबमध्ये ‘बदली‘ करण्यात आली आहे. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री विप्लव देव यांनी तेथील नवे मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांच्या मार्गात येऊ नये यादृष्टीने त्यांना थेट हरियाणात आणण्यात आले आहे. पक्षप्रवक्ते संबीत पात्रा यांच्याकडे आसाम-त्रीपुरा वगळता सारा ईशान्य भारत देण्यात आला आहे. पुढील वर्षी निवडणुका असलेल्या छत्तीसगडच्या प्रभारीपदी ओम माथूर तर पश्चिम बंगालच्या प्रभारीपदी मंगल पांडेय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय व महिला नेत्या आशा लकडा हे पांडेय यांचे सहप्रभारी असतील. भाजप पक्षसंघटनेत राज्यांच्या प्रमुखांचे (प्रभारी) स्थान महत्वाचे असते. राज्यातील पक्षसंघटना व केंद्रीय नेतृत्व यांच्यातील समन्वयाची व त्याच वेळी जेथे सत्ता नाही तेथे भाजपचे बस्तान बसविण्याची कामगिरी त्यांच्याकडे असते.

महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाच्या कथित नाराजीमुळे तावडे यांना राज्य सोडावे लागले. मात्र हरियाणात त्यांनी चमकदार कामगिरी केली. त्यामुले त्यांच्याकडे आता बिहारचे प्रभारीपद देण्यात आले आहे. नितीशकुमार यांनी अलीकडेच तेजस्वी यादव यांच्याशी पुन्हा दोस्ती करून भाजपचा सत्तेतून ‘दे धक्का‘ चा प्रयोग यशस्वी केला. त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व बिहारबाबत ‘संतप्त' मनस्थितीत आहे. तावडे यांना बिहारमध्ये पाठवून त्यांच्याकडे आणखी एक अवघड कामगिरी देण्यात आली आहे. ‘ आपल्याला महाराष्ट्र, तेथील मंत्रिपद सोडावे लागले याचा विचारच आपण मनातून काढून टाकल्याने व पक्ष देईल ती जबाबदारी सारी शक्ती लावून यशस्वी करण्याकडे लक्ष दिल्याने विनाकारण मनस्ताप होत नाही,‘ अशी भावना तावडे यांनी नुकतेच अनौपचारीकरीत्या निवडक पत्रकारांजवळ व्यक्त केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी आपल्या टीमवर जी ‘केमोथेरपी‘ केली त्यात जावडेकर यांचेही केंद्रीय मंत्रिपद गेले होते. पाठोपाठ ६-कुशक रस्ता हे प्रशस्त निवासस्थानही त्यांना सोडावे लागले होते. त्या लाटेत मंत्रीपद गमावलेल्या काही भाजप नेत्यांची कुरकूर अजूनही सुरू असताना जावडेकर यांनी ‘इदं न मम' ही वृत्ती कायम ठेवली व आता त्यांच्याकडे केरळचा अवघड घाट सर करण्याची अतिशय अवघड कामगिरी पक्षनेतृत्वाने दिली आहे. केरळमध्ये बस्तान बसविण्याची धडपड संघपरिवार व भाजप गेली कित्येक वर्षे करत आहे. मात्र राज्यातील भाजपचा जनाधार १० टक्क्यांच्या पुढे जाण्यास तयार नाही. कॉंग्रेस व डाव्या पक्षांच्या भक्कम कब्जात असलेल्या केरळची आव्हानात्मक जबाबदारी जावडेकरांवर आली आहे. त्यांनी यापूर्वी कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडूत या ना त्या नात्याने भाजपचे काम केले असले तरी केरळात त्यांच्या संघटनकौशल्यचा कस लागणार आहे.

आगामी वर्षात निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राजस्थानातील सहप्रभारीपद रहाटकर यांच्याकडे सोपवून भाजप नेतृत्वाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखविला आहे. भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयाचे प्रमुख अरूण सिंह यांच्या नेतृत्वाखाली त्यांना राजस्थान सांभाळावा लागणार आहे. यापूर्वी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष असताना रहाटकर यांनी राजस्थानातही भक्कम ‘संपर्क सूत्रे' स्थापित केली होती. या राज्यात पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. तेथे भाजपला अनुकूल वातावरण सध्या दिसत असले तरी वसुंधरा राजे विरूध्द केंद्रीय नेतृत्वाचे मानले जाणारे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांच्यातून विस्तव जात नाही. या परिस्थितीत रहाटकर यांना राजस्थानाची जबाबदारी देऊन त्यांच्या हसतमुख व मनमिळाऊ स्वभावाची परीक्षा घेण्याचा पक्षनेतृत्वाला इरादा दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com