Budget 2023 : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Budget 2023 President Draupadi Murmu

Budget 2023 : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

- मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : स्वातंत्र्याचा अमृतकालचा आगामी २५ वर्षांचा कालखंड म्हणजे स्वातंत्र्याचे सुवर्ण शतक आणि विकसित भारत घडवण्याचा काळ असून ही २५ वर्षे आपल्या सर्वांसाठी आणि देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या कर्तव्याचा परमोच्च बिंदू दाखविण्यासाठीची संधी आहे. आम्ही असा भारत बनवू, ज्यामध्ये गरिबी व भ्रष्टाचाराला थाराच नसेल, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी केले.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभबिंदू असलेल्या आपल्या अभिभाषणात राष्ट्रपती मुर्मू यांनी सेंट्रल हॉलमध्ये भाषण करताना, देशाच्या नौदलाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले प्रतीक चिन्ह मिळाले याचा विशेषोल्लेख केला.

नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या ९ वर्षांतील ठळक योजनांचा उल्लेख असलेल्या या अभिभाषणाच्या जवळपास प्रत्येक वाक्यावेळी सत्तारूढ संसद सदस्यांनी बाकांचा गजर केला. आज भारतामध्ये स्थिर, निर्भय, निर्णायक आणि मोठ्या स्वप्नांसाठी काम करणारे, प्रामाणिकपणाचा सन्मान करणारे सरकार आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या.

भ्रष्टाचार हा लोकशाही आणि सामाजिक न्यायाचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे माझ्या सरकारचे स्पष्ट मत असल्याचे सांगताना राष्ट्रपती म्हणाल्या की गेल्या काही वर्षांपासून भ्रष्टाचाराविरुद्ध सातत्याने लढा सुरू आहे. व्यवस्थेत प्रामाणिकांना सन्मान दिला जाईल, याची आम्ही काळजी घेतली आहे. याआधी कर परताव्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागत होती. आज आयटीआर दाखल केल्यानंतर काही दिवसात परतावा मिळतो. आज जीएसटीच्या माध्यमातून पारदर्शकतेसोबतच करदात्यांच्या प्रतिष्ठेचीही खात्री केली जात आहे.

जगासमोर आज अनेक आव्हाने असताना भारत असा देश म्हणून समोर आला की सध्याच्या विभाजित जगाला जोडतो असे सांगताना राष्ट्रपती म्हणाल्या की, जागतिक पुरवठा साखळीला मजबूत करणाऱ्या भारताकडे जग आशेने पहात आहे. जी-२० शिखर परिषदेचे नेतृत्व यंदा भारताकडे आले असताना ‘एक पृथ्वी, एक कुटुंब' धोरणाअंतर्गत जागतिक आव्हानांचे उत्तर शोधण्याचा भारताचा प्रयत्न आहे जी-२० परिषद भारताच्या सामर्थ्याला जगासमोर प्रदर्शित करण्याची ही मोठी संधी आहे.

आशिया- पॅसिफिक क्षेत्राच्या शांततेसाठी भारताचा पुढाकार राहिल्याचे सांगताना राष्ट्रपती म्हणाल्या की अफगाणिस्तान, श्रीलंकेतील संकटात भारताने सर्वप्रथम मदत केली. युक्रेनमध्ये अडकलेल्या विदेशी नागरिकांचीही भारताने मुक्तता केली. दहशतवादाच्या विरोधात भारताचे कठोर धोरण जगाने समजून घेतल्याने प्रत्येक जागतिक व्यासपीठावर भारताचे म्हणणे गंभीरपणे घेतले जात आहे. आम्ही सैन्यदलांच्या आधुनिकीकरणावर सतत भर.

राष्ट्रपतींनी सांगितले की, लोकशाहीला भारताने मानवी संस्कार म्हणून विकसित केले. यापुढे भारत मानवीय सभ्यता-संस्कृतीची जपणूक. देशाची लोकशाही यापुढेही समृध्द होत राहील. भारतीय ज्ञानविज्ञान, अध्यात्म, आदर्श व मूल्ये यापुढेही जगाला प्रकाश दाखवत राहील. भारताची ओळख भविष्यातही अमरच रहाणार असा विश्वास व्यक्त करताना आम्ही कठीण वाटणारी आव्हानेही पेलण्यास सक्षम ठरू यासाठी संसदेत प्रयत्न व्हावेत असे राष्ट्रपतींनी सूचकपणे सांगितले. राष्ट्रनिर्माणासाठी आपण सारे मिळून वाटचाल करू, या अर्थाच्या ‘सं गच्छत्वं, सं वदत्वं....‘वेदवचनाने राष्ट्रपतींनी अभिभाषणाचा समारोप केला.

अभिभाषणातील प्रमुख मुद्दे-

- २०४७ पर्यंत असा भारत आपल्याला बनवायचा आहे की ज्यात युवा व नारीशक्ती आपल्या पूर्ण सामर्थ्यानिशी योगदान देतील.

- देशवासीयांचा आत्मविश्वास आज शिखरावर आहे व जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे.

- ज्या सुविधांसाठी दशकानुदशके मोठ्या लोकसंख्येने प्रतीक्षा केली त्या सुविधा त्या वर्गाला प्रत्यक्ष मिळत आहे.

- कोरोना महामारीतून बाहेर पडून आज देशाने जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत.

- शतकातून एकदाच येणाऱया कोरोना महामारीच्या काळात सराकरने असे निर्णय घेतले ज्यामुळे कोट्यवधी लोकांना दारिद्र्य रेषेच्या खाली जाण्यापासून वाचविले.

- ३०० हून जास्त योजनांचा पैसा थेट लाभार्थींच्या खात्यात जमा होत आहे. २७ लाखाहून जास्त रक्कम लाभार्थींपर्यंत पोहोचटवली गेली.

- आयुष्मान भारत व जनऔषधी योजनांतून ५० कोटींहून जास्त नागरिकांना लाभ देण्यात आला. त्यांचे उपचारावरील ८० हजार कोटी रूपये व एकूण १ लाख कोटींहून जास्त पैसे वाचले.

- ‘हर घर जल' अंतर्गत केवळ ३ वर्षांत ११ लाख लोकांना नळाद्वारे पाणी मिळाले. त्याआधी ७० वर्षांत ही संख्या केवळ ३ कोटी होती.

- ‘हा आपला हा परका‘, हा विचार सोडून या सरकारने प्रत्येक वर्गासाठी काम केले.

- कोरोना काळात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेत आतापावेतो साडेतीन लाख कोटींचा खर्च.

- पदपथांवरील फेरीवाले, छोटे व्यावसायिक आदी ४० लाख जणांना पंतप्रधान स्वनिधी योजनेद्वारे प्रोत्साहन कर्ज दिले.

- सुमारे ३ कोटी छोट्या शेतकऱयांना पंतप्रधान शेतकरी योजनेत सव्वादोन लाखांची मदत केली. यात महिला शेतकऱयांना ५४ हजार कोटींची मदत.

- पहिल्यांदाच पशुपालक व मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्टांशी जोडले.

- ३६ हजारांहून जास्त आदिवासी गावांचा, ३ हजारांहून जास्त वन धन विकास केंद्राचा विकास सुरू.

- १०० हून जास्त विकासापासून वंचित जिल्हेही इतर जिल्ह्यांच्या बरोबरीने विकासाच्या स्पर्धेत उतरले.

- पंतप्रधान आवास योजनेत महिलांच्या नावावर घरांची नोंदणी करण्यास सुरवात.

- आज ८० लाखांहून जास्त महिला बचतगटांत ९ कोटी महिला सहभागी-कार्यरत., त्यांना सरकारतर्फे लाखो कोटींची मदत दिली जात आहे.

- प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवरे निर्मितीचे काम सुरू व त्याच वेळी शेकडो वंदे भारत रेल्वे गाड्या सुरू.

- गुलामीची प्रत्येक निशाणी मिटवून टाकण्यासाठी सरकार प्रयत्नशील. कर्तव्य पथ व त्यावरील नेताजींची प्रतिमा हे त्याचे अभिमानास्पद उदाहरण.

- अंदमान निकोबार बेटांवर २१ बेटांचे नामकरण परमवीर चक्र विजेत्यांच्या नावाने.

- भारत आज जगातील मोबाईल फोनचा मोठा निर्यातदार .

- खेळण्यांच्या आयातीत ७० टक्क्यांनी वाढ, निर्यातीत ६० टक्क्यांनी वाढ.

- संरक्षण सामग्रीची निर्यात ६ पटींनी वाढली.

- खादी ग्रामोद्योग क्षेत्रातही १ लाख कोटींची भरीव उत्पन्नवाढ व खादीची विक्री चार पटींनी वाढली.

- रोज ५५ हजार गॅस कनेक्शन, मुद्रा अंतर्गत रोज ७०० कोटींहून जास्त कर्ज, प्रत्येक महिन्यात एका वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती.

-केवळ २ वर्षांत २०० हून जास्त करोना लसीकरण.

- २००४ ते २०१४ मध्ये १४५ वैद्यकीय महाविद्यालये होती. मागील ९ वर्षांत ही संख्या २६० झाली. वैद्यकीय पदवीधरांची संख्या दुपटीने.

- ३०० हून जास्त नवीन विद्यापीठे, ५००० हून जास्त महाविद्यालये.

- पंतप्रधान ग्रामीण रस्ते योजना २०१४ पर्यंत ३ लाख ८१ हजार किमी , ९ वर्षांत हे जाळे ६० लाख किमी वाडले.

- राष्ट्रीय महामार्गांचे जाळे ५५ टक्क्यांनी वाढले. भारतमाला अंतर्गत लवकरच ५५० जिल्हे राष्ट्रीय महामार्गांना जोडले जाणार.

- विमानतळांची संख्या १४७ पर्यंत वाढली. जगातील तिसऱ्या क्रमांकाचा विमान उत्पादक.

- रेल्वे देशाच्या दुर्गम भागांपर्यंत पोहोचली. जगातील सर्वांत मोठे इलेक्ट्रॉनिक रेल्वे नेटवर्क बनण्याकडे वाटचाल.

- मेट्रो जाळे तिपटीने विस्तारले. आज २७ शहरांत मेट्रो सुरू

- मागील ८ वर्षांत सौरउर्जा निर्मिती २० टक्क्यांनी वाढली. हरित ऊर्जा निर्मितीत जगातील चौथ्या क्रमांकावर.

- १०० हून जास्त जलमार्गांचा विकास सुरू.