कोणी काहीही म्हणू द्या, मुख्यमंत्रीपद भाजपचाच! 

CM of Maharashtra will be from bjp only says leader of bjp
CM of Maharashtra will be from bjp only says leader of bjp

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार असल्याचा ठाम विश्‍वास पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने पुन्हा व्यक्त केला आहे. "महाराष्ट्र में अभी वाली व्यवस्थाही बनी रहेगी'', असे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सुस्पष्टपणे पत्रकारांना सांगितले. त्याचबरोबर राज्यात भाजपकडून नेतृत्व बदलाची शक्‍यता अजिबात नाही असे सांगताना या नेत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीबद्दल प्रशंसोत्गार काढले. 

काश्‍मीरमधील ऐतिहासिक चूक असलेले कलम 370 रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतल्यावर मोदी सरकार व एकूणच भाजपमध्ये सध्या "हाय जोश' चे वातावरण आहे. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंडच नव्हे तर शंभर टक्के शहरी मतदार असलेल्या राजधानी दिल्लीतील निवडणुकीतही या एका मुद्यामुळे भाजपच्या झोळीत भरभरून मतांचे दान पडणार याची जवळपास खात्री पक्षनेत्यांना वाटते. पक्षाच्या मुख्यालयात नुकत्याच झालेल्या अनौपचारीक वार्तालापात सरकारकडून संघटनेकडे असा प्रवास झालेल्या या वरिष्ठ नेत्याने महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचाच, असे अतिशय विश्‍वासाने सांगितले. मात्र आज-घडीला भाजप युतीत निवडणूक लढविणार हे ठरलेले असल्याने "अब की बार ढाई सो पार' अशा घोषणांकडे फारसे गंभीरपणे बघू नये असेही त्यांनी सांगितले. "कोणी काहीही म्हणू द्या, संसदेबाहेर काहीही बाईट देऊ द्या,' ज्या पध्दतीने निकाल लागणार आहेत, ते पाहता यापुढील मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्रजीच होणार अशा प्रकारचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

पंजाबात अकाली दल युतीचा मोठा भाऊ आहे व महाराष्ट्रात भाजप त्याच भूमिकेत आहे; तेव्हा यात बदलाचा सवालच उद्भवत नाही असे सांगून या नेत्याने असेही नमूद केले की लोकसभेत भाजप व शिवसेनेत ज्या पध्दतीने जागावाटप झाले होते त्याच पध्दतीने विधानसभेसाठीही होणार आहे. लोकसभेवेळी भाजपने 25 व शिवसेनेने 23 जागा लढविल्या होत्या. 
दरम्यान राज्यातील महायुतीचे रिपब्लिकन पक्ष (आठवले) यासारखे घटकपक्षही 15-15 जागा मागत आहेत, याकडे लक्ष वेधले असता या नेत्याने, कोणी काय बोलावे हे भाजप इथे बसून थोडेच ठरवतो? आमच्या नेत्यांपुरते आम्ही सांगू शकतो, असे हसतहसत सांगितले. मात्र घटक पक्षांसाठी दोन्ही पक्षांना जागा सोडाव्या ालागतील. ती काही एकट्या भाजपची जबाबदारी असू शकत नाही असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे घटकपक्षांना किती जागा द्यायच्या हे राज्य भाजप सुकाणू समिती व निवडणूक प्रभारी, खासदार भूपेंद्र यादव मिळून योग्य वेळी ठरवतील असेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com