मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई द्या

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मागणी
राहुल गांधी
राहुल गांधीsakal
Updated on

नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आता मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधींनी आता शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. सरकारने चूक मान्य केली असल्याने आता ही भरपाई द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी आज केली. राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. ते म्हणाले, की कृषी विधेयक रद्द करण्यासाठीच्या भाषणात पंतप्रधानांनी चूक झाल्याचे मान्य केले होते. आता आंदोलनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळायला हवी. ते म्हणाले, की तीन कायदे सरकारला मागे घ्यावेच लागतील, असे आपण म्हटले होते.

देशातील तीन चार भांडवलदारांपुढे शेतकऱ्यांची ताकद कमी पडू शकत नाही. ज्याप्रकारे कायदे रद्द करण्यात आले आणि संसदेत त्यावर चर्चा होऊ दिली नाही, ते पाहता सरकार घाबरले आहे हे दिसून येते. आपण चूक केली असल्याचे सरकारला कळले आहे, हे त्यातून कळते. आंदोलनात हुतात्मा झालेल्या लोकांबद्दल, शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे बनविण्यामागे कोणती शक्ती होती, याबद्दल चर्चा करायची आहे. एमएसपीला कायदेशीर हमीची व लखीमपूर खिरीबद्दलही चर्चा करायची आहे, मात्र सरकारने ते होऊ दिले नाही. शेतकऱ्यांना गरीबांना दडपले जाऊ शकते, असे सरकारला वाटले मात्र ते शक्य झाले नाही, असाही टोला गांधींनी लगावला.

हा केंद्राचा पळपुटेपणाच : सुळे

‘‘कें द्र सरकारने कोणतीही चर्चा होऊ न देता तिन्ही कृषी कायदे मागे घेतले असून हा सरकारचा पळपुटेपणा आहे.’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली. सुळे म्हणाल्या, ‘‘ शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा व्हावी, असे वाटत होते. आम्ही वेलमध्ये गेलो नाही तरीही त्यांनी चर्चा होऊ दिली नाही. त्यांना या विषयावर चर्चा होऊच द्यायची नव्हती, म्हणून त्यांनी चर्चेविना हे कायदे मागे घेतले. हम करे सो कायदा ही सरकारची वृत्ती आहे. ’’

‘‘केंद्र सरकार लोकांच्या विषयांवर चर्चा होऊ देणार नसेल, विरोधकांचे ऐकून घेणार नसेल, तरी आम्ही जबाबदारी म्हणून लोकांचे विषय मांडत राहू. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत विरोधी पक्षांमध्ये वेग- वेगळी मते असण्याचे कारण नाही. अगदी भाजपमधीलही काही लोकांचे मत हे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत असंवेदनशील आहे, असेच आहे. ही बाब दुर्दैवी आहे. या सगळ्याची फार मोठी किंमत या सरकारला चुकवावी लागेल.’’ असे सुळे म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com