Coal scarcity causes power crisis in delhi
Coal scarcity causes power crisis in delhisakal

देशात ‘कोळसा’कारण पेटले!

दिल्लीत वीज कपातीचे संकट तर, केंद्राच्या मते पुरेसा साठा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांत वीज कपातीचे संकट ओढवले आहे. परंतु, देशात पुरेसा कोळसासाठा असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच कोळशाअभावी एकही ऊर्जाप्रकल्प बंद पडणार नाही, अशी ग्वाही केंद्राने दिली आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाना, उत्तराखंड, बिहार, झारखंड, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश, तमिळनाडू या राज्यांमध्ये वीजेचे संकट गडद झाले आहे. देशातील बहुतांश औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये पुरेशा प्रमाणात कोळसा उपलब्ध करून देणयासाठी सरकारने कोळशाच्या पुरवठ्यासाठी मालगाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याचा आणि त्यासाठी पॅसेंजर गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रकल्प बंद पडणार नाही

या वीज संकटावर केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी वीज निर्मिती प्रकल्प बंद पडण्याची शक्यता फेटाळली आहे. औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये २१ दशलक्ष टन कोळशाचा साठा आहे. हा साठा दहा दिवस पुरेल. कोल इंडियाकडे असलेला साठा गृहीत धरल्यास भारताकडे एकूण ३० लाख टन कोळसा आहे. हा साठा ७० ते ८० दिवसांपर्यंत पुरेसा आहे. सध्या २.५ अब्ज युनिटच्या दैनिक खपाच्या तुलनेत ३.५ अब्ज युनिट वीजेचे उत्पादन होते. मागील काही दिवसांपासून उष्णता वाढीसोबतच विजेची मागणीही वाढली आहे, असेही कोळसा मंत्र्यांचे म्हणणे आहे.

केजरीवाल आक्रमक

राष्ट्रीय राजधानी दिल्लीवरही वीज कपातीचे संकट ओढवले आहे. ‘आप’ सरकारने मेट्रो, रुग्णालय, महत्त्वाच्या संस्थांना २४ तास वीज पुरवठा करण्यात असमर्थता व्यक्त केली आहे. दिल्लीतील वीज टंचाईवरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आक्रमक झाले असून संपूर्ण देशात वीजप्रश्न गंभीर झाला असल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये कशीबशी परिस्थिती सांभाळली आहे. परंतु देशात स्थिती गंभीर आहे. सर्वांनी मिळून यावर उपाय शोधायला हवा. या समस्येवर मात करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

दिल्ली सरकारचे ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून मेट्रो, रुग्णालय तसेच महत्त्वाच्या संस्थांना २४ तास वीज पुरवठा करणे शक्य नसल्याचे कळविले आहे. दिल्लीला वीज पुरवठा करणाऱ्या ऊर्जा प्रकल्पांना पुरेशा प्रमाणात कोळसा उपलब्ध करून दिला जावा, अशी मागणीही केली आहे. दरम्यान, दिल्लीतील कोळसा उपलब्धतेबाबत ‘एनटीपीसी’ने (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन) माहिती दिली आहे. दिल्ली नजीकच्या दादरी आणि उचाहार येथील अनुक्रमे सहा तसेच पाच युनिट पूर्ण क्षमतेने सुरू असून नियमित कोळसा पुरवठा सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे १.४० मेट्रिक टन आणि ९५ मेट्रिक टन कोळसा उपलब्ध असून आयात केलेला कोळसा देखील लवकरच येथे पोचेल, असे ‘एनटीपीसी’च्या ‘ट्विट’मध्ये म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com